Sunday 26 April 2015

आमच्या घराचा हरवलेला (?) आनंद - आपत्ती व्यवस्थापनाचे पहिले वास्तविक पाऊल !!!

संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.

काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.

त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्‍यांवरून उडी मारू शकतो.

दुसर्‍याने त्याला तोंड वेंगाडून दाखवत चिडवले हे त्यात काय एवढे मोठे सांगतोस तू. मी तर ना ३ पायरीवरून पण उडी मारतो.

प्रत्येक जण आपण किती उंचावरून उडी मारू शकतो हे अगदी तावातावाने रंगवून सांगत होता.

तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली त्यात काय ? तुम्ही कोणी गच्चीवरून खाली उडी माराल का?

आधी जरा सगळे घाबरले आणि गोंधळले.

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला त्यात काय ते टी.व्ही.वर दाखवतात ना तसे पोटाला दोरी बांधून मारायची उडी.

एका भित्र्या मुलाने विचारले आपण पडून हात पाय मोडले तर? आई-बाबा किती मारतील, झोडूनच काढतील बघ...

त्या प्रश्न विचारणार्‍या चिमुरडीने सांगितले  फक्त उडी मारायच्या आधी suicide note लिहून ठेवायची ...

अग ते suicide note काय असते ? ह्या श्रावणीचे तर काही तरी नवीनच असते बाबा....

आता आश्चर्याने अवाक होऊन तोंड वासायची पाळी  माझी  होती . एव्हाना तेथे असलेल्या काही जणांची बाचाबाची सुरु  झाली... ह्या एवढ्या लहानशा चिमुरडीला कसे काय माहिती?

एक वयस्क बाई म्हणाल्या हे सारे त्या टी. व्ही. वरच्या नको नको त्या मालिका, सिरीयल्स पाहण्याचे परीणाम. किती वेळा सांगून आई - बापांना कळत नाही. लहान मुले जे बघतात ते करायला बघतात. त्यात चांगले काय , वाईट काय हे त्यांना कुठे कळते. म्हणून तर त्यांना वेळ द्यावा लागतो.
दुसरी कडाडली हल्लीच्या आई-बापांना वेळ असतो का मुलांना द्यायला. कामावरून आले तरी कोठे लक्ष असते घरात... लहान मुले एकतर बिचारी वाट पाहून पाहून दमतात आणि आई बाबा नाही लक्ष देत असे दिसले की मुकाट्याने टी.व्ही. म्हणा., Computer म्हणा नाहीतर ते मोबाईल , व्हिडीओ गेम्स घेऊन बसतात आणि शिकतात मग हे असले नको ते...

Friday 24 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ भाग - २ !!!

आता जाणून घेऊ  या  आदिमातेचे लाभेवीण प्रेम  ….


जगन् मात: मातस्तव चरणसेवा न रचिता 
न वा दत्तं देवि द्रविणम् अपि भूयस्- तव मया ।
तथा अपि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।।

आई तुझ्या चरणांची सेवा मी कधीच केलेली नाही , तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही गं ! तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस.


Wednesday 22 April 2015

श्री आद्य शंकराचार्यविरचितं श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌ !!!

आज श्री आद्य शंकराचार्य जंयती.

श्री आद्य शंकराचार्यांनी अखिल मानव समाजाला श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र ह्या सारखी आदिमातेची अनेक स्तोत्रे देऊन आदिमातेच्या अनिर्वचनीय रूपाला शब्दबध्द करून जणू काही साक्षात तिचे प्रत्यक्ष दर्शनच घडवले आहे असेच वाटते.

आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या १८ हातांमध्ये शस्त्रे असतात म्हणून काही लोक भोळ्या, भाबड्या भक्तांना घाबरवतात की हे देवीचे उग्र रूप आहे , तिच्या सर्व हातांत तर शस्त्रे आहेत , मग ती तुम्हाला मदत कशी करणार, ती सदैव उग्र रूपच धारण करते. त्या सर्व प्रश्नांना अगदी सोप्या पध्दतीने उत्तर देऊन शंकराचार्य निरुत्तर करतात. आदिमाता एवढी अपार करुणामयी आहे , तिची करुणा आपल्या लेकरांसाठी कशी सदैव भरभरून वाहते ह्याचे एवढे सुंदर वर्णन अजून तरी कोठे वाचनात नाही आले. आदिमाता उग्र रूप धारण करते , हातात शस्त्रे धारण करते ते दुष्ट . असुरांचा नि:पात करायला, त्यांनाचे निर्दालन करून श्रध्दावानांचे संरक्षण करायला , अन्यथा ती सर्वतोपरी प्रेमळ आणि प्रेमळच आहे, तिच्या इतुकी क्षमाशील अन्यत्र कोठेही सापडणे केवळ अशक्य...आदिमाता कशी आपल्या बालकाच्या अपराधाला पोटात घालून सदैव क्षमा करण्यास तत्पर असते हे जाणून घेऊ या , शंकराचार्यांच्या ह्या महान स्तोत्रातून ...      

चला तर मग आज त्यांच्या जंयतीच्या निमीत्ताने ह्या स्तोत्रांची आठवण करून त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करू या आणि आदिमातेच्या प्रेमात आकंठ अवगाहन करू या...
मूळ संस्कृत स्तोत्र पुढीलप्रमाणे आहे-

।। श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्‌।।

न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि न च जाने स्तुतिकथा।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्‌।।1।।
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्‌।
तदेतत्‌ क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।2।।
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।3।।
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4।।
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्‌।।5।।
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6।।
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्‌।।7।।
न मोक्षस्याकाङ्‌क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयि अनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।9।।
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10।।
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।11।।
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु।।12।।

।। एवं श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्‌।।




Monday 20 April 2015

परशुराम चरणौ पादसंवाहने नमामि ...






सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । 
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥ 
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । 
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

आज परशुराम जंयती. दशावतारांची आरती म्हणताना आपण महाविष्णूच्या ह्या सहाव्या अवताराची महती गातो तो हा भगवान परशुराम !

Friday 17 April 2015

अनंत अनंतात तादात्म्य पावले.....


आरती अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था 
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा || धृ ||

नृसिंहसरस्वती अवतारा संपविले
कर्दळीवनात जाऊनि तपाचरण केले 
नवरुपां धारण करूनि प्रगट पुन्हा झाले 
नाना नामे घेऊनि देशभ्रमण केले || १ || 

योगसिध्दीप्रभावे लीला तू करिसी 
धर्मा संरक्षूनि जनांसि उध्दरसी 
वाटे ब्रम्ह प्रगटले ह्या भूमीवरती |
दर्शन घेता मिळते चिरसुख मन:शांती || २ || 

आर्त भाविक साधक तुजसी शरण येता 
मार्गदर्शन करूनि होसी त्या त्राता 
सर्वांभूती ईश्वर बघण्या शिकविला 
अनन्यभक्तां रक्षिसी आश्वासन देता || ३ || 

परब्रम्ह गुरुदेवा कृपा करी आता 
शरण तुजसी मी आलो तारी अनाथा 
भुक्ति-मुक्ति सद्गति देई भगवंता 
गुरुराया अवधूता अवतारी दत्ता || ४ || 

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्था 
जय जय गुरुअवतारा पदीं ठेवी माथा ||

Tuesday 14 April 2015

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा शैक्षणिक दृष्टीकोन




मध्य प्रदेशातल्या महू गावी १४ अप्रिल १८९१ रोजी भारतमातेने आपल्या एका महान थोर , मानवतेला पूजणार्‍या सुपुत्रास जन्मास घालून आपल्या कुशीची धन्यता मानली जणू काही. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे ते भारतमातेचे महान सुपुत्र ज्यांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा आजीवन जोपासली होती. त्यांचा सेवेचा वारसा आजही आम्हा भारतीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. 

Monday 13 April 2015

आपत्ती व्यवस्थापन आणि जन जागृती.

आपत्ती व्यवस्थापन आणि जन जागृती. 

आपती व्यवस्थापनात जनजागृती आणि पर्य़ायाने जन सहभाग हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

स्थानिक पातळीवर आपत्ती व्यस्थापनाची गरज -

ढोबळमानाने, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. पूर , भूकंप , त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती ह्या  विशेषत: हवामानातील बदलामुळे आकस्मिकपणे उदभवतात. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता ही अधिक मोठ्या प्रमाणावर संभवते. आपण सर्वसाधारणपणे रोजच्या धावपळीत ही अनुभवतो की कापणे , चिरणे, भाजणे असे घरगुती स्वरूपाचे अपघात असो वा आगी लागणे, वाहनांचे अपघात होणे असे अपघात असो,  कोणत्याही अपघातात प्राथमिक उपचार (First-aid) तात्काळ केले गेले तर अपघातग्रस्त वा जखमी व्यक्तीला कमी इजा होऊ शकते. म्हणजेच माणसाच्या त्या अपघाताला प्रतिसाद देण्याच्या कृतीवर होणारे नुकसान हे कमी वा अधिक स्वरूपाचे असू शकते. "एकमेंका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " ह्या न्यायाने म्हणा वा माणसुकीच्या कळवळ्यापोटी म्हणा जेव्हा एक माणूस दुसर्‍या संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जातो तेव्हा त्या संकटात सापडलेल्या, घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या , आक्स्मिक संकटाने , अपघाताने खचलेल्या, भेदरलेल्या जीवाला नक्कीच दिलासा मिळतो, उभारी मिळते, आणि आपण एकटे नाही आहोत, कोणी तरी आपल्या मदतीला आले आहे आणि आपण ह्यातून नक्की वाचू शकतो हा आत्मविश्वास माणसाला खूप मोठा मानसिक , भावनिक आधार मिळवून देतो, ज्याच्या बळावर तो धैर्याने त्या अपघातावर, संकटावर मात करू शकतो.
आणि  म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे.

Friday 10 April 2015

एक होता कार्व्हर - 3 - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

वीणा गवाणकर ह्या पुढे पुस्तकात अमेरीकेलाही  पहिल्या आणि  दुसर्‍या महायुध्दाचा सुध्दा  कसा  तडाखा बसलेला ह्याचे स्पष्ट चित्र नजरेपुढे साकार  करतात , त्यांच्या समर्थ लेखनशैलीतून !

पहिल्या महायुद्धात डॉ. कार्व्हरांच्या रताळ्यांनी लोकांची आणि सैनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठया प्रमाणावर `निर्जलीकरण प्रकल्प' उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली होती-पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुध्द यावं लागलं.म्हणजे वीस वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे निर्जलीकरणाच्या योजनेचे, तिच्या मागच्या कल्पनेचे श्रेय डॉ. कार्व्हरना द्यायला लोक विसरून गेले होते. डॉ. कार्व्हरना मात्र त्याचे वैषम्य वाटत नव्हते. श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला थोडाफार उपयोग झाला याचेच त्यांना समाधान . किती हा मनाचा उदारपणा ! कोठेही मान-सन्मानाची , प्रतिष्ठेची मनी आस नव्हती .

भुईमूगाच्या टरफलापासून जमीन भुसभुसीत बनवणारे खत तयार करता येते. त्या टरफलापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. तिची प्रत सुधारते. हा आश्चर्य जनक  शोध डॉ. कार्व्हर ह्यांच्या  अफाट बुद्धीमत्तेतून लागला. एवढेच नव्हे तर  टरफलापासून बनवलेल्या कंडीशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती अधिक असून नायट्रोजन, पोटॅश,फॉस्फेट यांचेही प्रमाण त्यात अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या पिटमॉस (Peat Moss) पेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे.' हा शोध तर  खूप मोठे दान पदरात टाकता झाला त्यांच्या देशाच्या !

१८९९ सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मंडली होती. वनसंपत्तीची राखण व वृद्धी करणे आवश्यक कसे आहे हे सांगितले होते. परंतु ही योजना प्रत्यक्षात उतरायला `ग्रेट डिप्रेशन' ची आपत्ती यावी लागली. त्यानंतर सरकारने ती योजना १९३२-३३ काळी ती हाती घेतली.

पुढे सारे जग दुसऱ्या (१९४० च्या ) महायुध्दात गुंतलं होतं. विघातक शक्तीनी अवघ्या मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल  पार ढासळला होता, आभाळच फाटले तर ठिगळ लावायचे तरी कुठे कुठे? असा अटीतटीचा प्रसंग सामोरे उभा ठाकलेला तरीही आपल्या प्रयासांनी आणि संशोधनाने हा तोल साधण्याचे कार्य डॉ कार्व्हर यथाशक्ती , यथामती पार पाडीतच होते, जराही विचलीत न होता, जराही न डगमगता ...

ह्या भयावह कालातही डॉ. कार्व्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवीत होते.तिच्याशी आपले नाते घट्ट बांधायला, जवळीक साधायला शिकवीत होते ! अलबामातील त्यांच्या बांधवांजवळ म्हणायला गेले तर तसे काहीच नव्हते. काही मिळवायचं म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधने सुध्दा हाताशी उपलब्ध नव्हती. त्यांच्या जवळ होत्या भरपूर `गरजा' जी काही तुटपुंजी साधने जवळ होती त्यांचाच उपयोग करून, त्या गरजांचा मागोवा घेत, डॉ. कार्व्हरनी किमया केली. हे सारं कुठून मिळवलं ?  

फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून कापूस साम्राज्याला शह दिला होता. भुईमूगा आणि रताळी यांनी !


येथे आठवतो तो जॉर्ज वॉशिंगटन ह्यांचा एक प्रसिध्द quote आहे -

 " Start wherever you are, with whatever you have, make something out of it , never be satisfied."


खरेच किती सत्यात उतरवले त्यांनी हे बोल नाही. म्हणूनच म्हणतात "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले."

त्या काळी अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या तणातणीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले. अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळले. अशा वेळी डॉ. कार्व्हरनी `वनस्पतीजन्य ' रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली.

२९ पकारच्या वनस्पतींच्या पाने,फळे,खोडे,मूळ भागांपासून ५०० प्रकारचे रंग तयार करण्याचा भीम-पराक्रम त्यांनी केला. हे रंग (Dyes) कापूस, लोकर, रेशीम,लिनन,चामडे यांवर वापरण्यासाठी होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊही !  आणि मग साहजिकच रंग बनविणाऱ्या एका मोठया कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम पाहून, आपल्या उद्योगसमूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती केली. सुसज्ज प्रयोग शाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत एक `कोरा' चेक ! अनेक वेळा घडले तेच याही वेळी घडले आणि फक्त परमेश्वराचीच बांधिलेकी मानणार्‍या कार्व्हर ह्यांनी चेक साभार परत गेला. सोबत रंगाच्या पाचशे सत्तावीस कृती चक्क फुकट - विनाशुल्क !

त्यांची नजर द्रष्टयाची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं असे म्हणटले तर चुकीचे ठरणार नाही असेच पुस्तक वाचताना जाणवते. त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूच्या लोकांमुळे .पण ज्या वातावरणात ते जगत होते, त्याने त्यांच्या आचरणाचे खरी किंमत होत नव्हती  भोवतालची परिस्थिती साथ देणारी नसली की, प्रतिकूल असली की `असामान्य कर्तृत्व' लोकांच्या नजरेसमोर यायला काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉ. कार्व्हर यांचं झालं होतं. अफाट मेहनतीनंतर डॉ. कार्व्हर यांनी त्यांच्या "डियर प्रयोगशाळेत " `कृत्रिम रबर' जन्माला घातले. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोडांकडं पाहण्याच कारण उरले नाही.

अशा प्रकारे  अनेक धडे घेतल्या नंतर मात्र " या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारे जपा. वेळेवर त्याचा उपयोग होतो" या प्रा. कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेनेच पाठपुरावा केला.

१९३७ च्या सुमारास प्रा. कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांची भेट झाली. जणू काही रथी-महारथींची भेट होती. एक होता उपेक्षित, दलित निग्रो समाजातला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव टाकून असलेला धनाढ्य कोट्याधीक्ष ! तसे पाहिले तर एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव . परंतु एका समान धाग्याने दोघेही बांधले होते तो म्हणजे -  दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता. प्रयत्नावर श्रध्दा होती.

`शाश्वत मूल्य पैशांच्या मोबदल्यात मिळत नसतात, किंबहुना पैशाच्या बदल्यात जे विकत घेता येतं त्याला `शाश्वत मूल्य म्हणत नाहीत.'
हेन्री फोर्ड यांच्या या विधानाचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर !

मराठीत आपण एक म्हण वापरतो की "लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून" म्हणजे दोन्ही साठी भरपूर पैसा खर्चावा लागतो आणि येथे तर कार्व्हर ह्यांना पैशाचा संग न भावणारा ...

कार्व्हर पगार वाढ घेत नाहीत. संशोधनाचं मानधन घेत नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटे. डॉ. कार्व्हरांना मात्र लोकांना याचं का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे.
 
ते म्हणत, "ईश्वरदत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं ?" यावर "पैशाच्या मागे धावणारे आणि पैसा हेच सर्वस्व मानणारे "अर्थाचे दास"  म्हणत ""तुम्ही जर असे पैसे घेतले असलेत तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी नसता का करता आला ?"

त्यावर कार्व्हरांचे उत्तर त्यांची पैशाविषयीची असंग्राह्य वृत्ती दाखविते "मी पैशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो असतो..."

थोडक्यात काय तर समाजाचे ऋण, बांधिलकी पुढे पैसा कार्व्हर ह्यांना दुय्यम दर्जाचा वाटे , त्यांच्या निष्ठा , देशावरचे प्रेम , मातृभूमीशी बांधिलकी ही अत्यंत घट्ट आणि उच्च प्रतीची होती. आणि म्हणूनच अशा ह्या मित्राला हेन्री फोर्ड  यांनी तसाच नजराणा भेट दिला.

उत्तमातील उत्तम वापरून `ग्रीनफील्ड' येथे `कार्व्हरभवन ' उभारलं गेलं. डॉ. कार्व्हरना किती आनंद झाला होता ! एक साधी इच्छा पूर्ण व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या ऐंशीच्या वर्षी कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्यांचे डोळे पाणावले होते ह्या महान विभूतीचे....किती हे मातृप्रेम !!!

१९३८ साली एका सभेत डॉ. कार्व्हरांचे व्याख्यान होते, एकाने डॉ. कार्व्हरांशी ओळख करून दिली.- "सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, तो म्हणत असे की, मला एवढचं माहीत आहे की, मला काहीच माहीत नाही. आज त्या कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉ. कार्व्हर ! त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडिलच काय, पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत मते एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना ज्ञान प्राप्त होते,"

 हे उद्गार सुचक आहेत ते जनमानसांत रुजलेल्या डॉ. कार्व्हरांविषयीच्या आदरभावाचे प्रतिक ! 
खरं म्हणजे कार्व्हर ह्यांची विचारसरणी पाहताना असे जाणवते की त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वतिहासाचे काहीच वैषम्य वाटत नव्हते. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्यादास्यत्वातून-आर्थिक, शैक्षणिक अशा विवीध स्तरांवर काही अंशी तरी मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्यांना ना स्वत:च्या पूर्वजांचा ठाव ठिकाणा माहीत होता ना त्यांचं स्वत:चे नाव , कारण ते तरी स्वतःचं कुठं होतं ? पण भविष्यकाळ मात्र उज्ज्वल होता , "तो  " अनंत करूणामयी परमात्मा जणू ही उणीव भरून काढणार होता. इतिहासात त्यांना अढळस्थान मिळवून देऊन, त्यांच्या अफाट मेहनतीचे चीज करून !

रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचे जीवनमान उन्नत केले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून १९३९ साली त्यांना `रूझवेल्ट पदक' अर्पण करण्यात आले. 

१९४० साली फ्रँकलीन डी. रूझवेल्ट यांनी टस्कगीला भेट दिली. त्या वेळी वृद्ध कार्व्हरना ते म्हणाले-
"तुम्ही एक थोर `अमेरिकन' आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली. शक्ती मिळाली.

खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देवपण राखलं होतं. असे वीणा गवाणकर कौतुकाने उद्गार काढत्या झाल्या आहेत. खरेच मनापासून दाद द्यावी असे कुणाला वाटणार नाही सांगा बरे?  

त्यांच्याच शब्दातील हे मन विदीर्ण करणारे -
महानिर्वाण -

कशाचीच आस नव्हती. एका परेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती. एका भूमीखेरीच कोणाशीच जवळीक नव्हती. अखंड पोरके-पणानं त्यांची सावली सारखी सोबत केली होती....


स्वतःचं `काहीच' नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता पंचत्त्वात निघाला होता.

टस्कगीनं मातीचं सोनं करणाऱ्या कार्व्हर ह्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जून 1943.


मन सदगदीत होते - जो जन्मानंतर काही काळ मरणोसन्न अवस्थेत होता, ज्याच्या जगण्याची यत्किचींत आशाही जगाला नव्हती, ज्याला सुरुवातीचा काही काळ वाचाही नव्हती अशा त्या जीवाचा परमेश्वरावरील अचल , गाढ विश्वासाने किती अप्रतिम, शब्दातीत प्रवास भगवंतच "त्या"च्या अकारण कारुण्याने घडवून आणतो - अगाध तुझी
लीला -परमेश्वरा - धन्य तू आणि धन्य तुझा हा भक्त - शब्दातीत असणे वा अवाक् होणे काय हे शब्दश: अनुभवले वारंवार ---

खरेच प्रत्येकाने अवश्य वाचावे, आवर्जून एकदा तरी वाचावे असे हे अविस्मरणीय पुस्तक - "परमेश्वराने आम्हाला काहीच दिले नाही " अशी सतत अवास्तव ओरड करत फिरणार्‍या अभागी जीवाला जणू कार्व्हर ह्यांचे जीवन उत्तर देऊन सांगते "मानव जन्म हेच परमेश्वराचे अगाध देणे आहे , त्याची अपार लीला अनुभवून तर बघ , मातीचे सोने करणारा कर्ता , करविता "तो" एकच आहे , आता "त्या" ने दिलेल्या उपहाराचे "सोने" करायचे "त्याच्याच " कृपेने की "माती" म्हणून पायी तुड्वाय़चे हे तुझ्या हाती आहे. "
 डॉ. कार्व्हर - अखिल मानवजातीसाठी मानवी जीवन ही परमात्म्याने दिलेली  सर्वोच्च अमूल्य देणगी आहे आणि ती कशी स्विकारावी ह्याचे परखड पण वास्तव प्रात्यक्षिक देणारा - दीपस्तंभ !!!

Wednesday 8 April 2015

एक होता कार्व्हर - 2 - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

येथवरचा  डॉक्टर कार्व्हर ह्यांचा खडतर प्रवास आपण पाहिला, आता पुढची जिज्ञासावर्धक कहाणी पुस्तकातून वाचल्यास वीणा गवाणकरांच्या अफाट अभ्यासालाही दाद मिळेल असे  मला  प्रामाणिकपणे वाटते. 

वीणाताईंचे काही बोल अगदी मनाला भिडतात -  

"प्रा. कार्व्हरांना स्थलकालाचं मुळी भानच उरलं नव्हतं. `सिंप्सन' वाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार वा संगीतकार झाले नव्हते. ते झाले होते एक `दक्षिणी शेतकरी' एका छोटया पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर ! आणि रंगारीही ! ! हे त्यांचे अपयश म्हणायचं का ?
एका उजाड ओसाड माळाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. खरोखरीच जणू कायापालट केला होता.
लोकांच्या डोळ्यावरच्या डॉलर्सच्या पटटया काढून त्यांना `बघायला' शिकवलं होतं. आणि ते लोकही आता डॉक्टर कार्व्हरप्रमाणे चिखलात,मुळ्यात, पाना-फुलात `देव' शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. उजाड,वैराण माळ दिसामासांनी फळत-फुलत होता. 
याला अपयश म्हणायचं का ?.... 

तरीही एवढे करूनही कार्व्हर ह्यांना  वाटत होतं, ही तर नुसती सुरूवात आहे. अजून खूप मजल मारायची आहे. 
किती हा विनम्र भाव ….
उत्तरेकडचा हा अबोल, विनम्र संशोधक किती कर्तृत्ववान आहे, हे इथवरचा प्रवास दर्शवितो. आजवर डॉ. कार्व्हरनी जे जे कार्य हाती घेतलं होतं, त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यशाला घातलं होतं ह्याची पुरेपुर प्रचिती येते.

आपण वर्षानुवर्षे यशाच्या किती चुकीच्या मोजपट्या वापरतो नाही का? प्रवाहात तर सर्वच जण पोहतात, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहायला मात्र खरे कसब आणि वाघाचे काळीज लागते म्हणतात ते उगीच नाही.

येथे आठवतात आपल्या पावन भारतभूमीतले " संत सावता माळी" ह्यांनी सुध्दा असाच निसर्गात , आपल्या शेतातच आपला देव पाहिला होता नाही बरे? " कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी " असे गात कधीही पंढरीची वारी ही न करणार्‍या, आणि विठ्ठलाच्या दर्शनालाही पंढरपूराला कधीच न जाणार्‍या ह्याच सावतामाळ्याच्या घरी , दारी आणि शेतात "तो" पळपुट्या विठ्ठल पाटील दडून बसला होताच ना कारण सावता माळींनी त्याला आपल्या हृदयरुपी शेतात मेख मारून अढ्ळ केले होते.

Monday 6 April 2015

एक होता कार्व्हर - दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

आज-काल वृत्तपत्र उघडावे तर कोठे ना कोठे तरी शेतक्र्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचायला मिळतात आणि मन उदास होऊन जाते, नैराश्याने ग्रासून जाते आणि वाटते की कोणी तारणहार नाहीच का आमच्या बळीराजाला ? कोण काढणार आमच्या ह्या "माय-बाप- बंधू" अशा शेतकरी वर्गाला, ह्या विनाशाच्या गर्तेतून खेचून बाहेर आणि राखेतून उभारी घेणार्‍या फिनीक्स पक्ष्याप्रमाणे उंच आकाशात भरारी घ्यायला शिकविणारा आहे का कोणी खरेच? मानवाच्या अन्न-वस्त्र-निवारा ह्या मूलभूत गरजांचा खर्‍या अर्थाने पुरवठा कोण करतो ? तर हा शेतकरी - म्हणूनच "तो बळीराजा" आपला "माय-बाप- बंधू" आहे अगदी उचित आणि यथार्थ भूमिकेतून ....

पर्यावर्णाचा दिवसेंदिवस होत चाललेला र्‍हास, जमिनीचा शून्यावस्थेकडे झुकणारा कस, भरपूर पिकाच्या व उत्पादनाच्या हव्यासापायी केला गेलेला अनाठायी आणि अवास्तव रासायनिक खतांचा वापर, वेळी- अवेळी मनमानी करणारा पर्जन्यराज म्हणजेच पावसाची अवकृपा ह्या सार्‍या अनाकलीय परिस्थितीने शेतकरी पार हवालदील होतो आणि त्याच्या पिकाचा योग्य मोबदला न मिळाल्याने , पोटाची खळगी भरण्यासाठी  शेवटी कर्जाच्या अवाढ्व्य डोगराखाली पुरता पिचून जातो. माय जेवू घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशा विचीत्र कोंडीत हा " बळीराजा" सापडतो आणि शेवटी "आत्महत्या" हे त्याच्यावरचे उपाय नाही जे जाणूनही , केवळ हतबल, अगतिक होऊन त्याच वाटेवर पाऊल टाकतो--

हे असेच चालत राहणार का ? आज ह्या विनाशाला आपण सारेच एका अर्थाने जबाबदार नाही आहोत का ? आज अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, संपूर्ण मानव जातच एका विचित्र वळणावर येऊन ठेपली आहे. कोठे तरी ह्या निसर्गावर कुरघोडी करून , निसर्ग-संपत्तीचाच विनाश करणार्‍या आत्मघातकी मार्गावरून परत मागे फिरायलाच हवे नाही का?  खरे तर मुळात आपली भारत भूमी ही कृषी प्रधान संस्कृतीची ! आपल्या थोर , विद्वान ऋषी-मुनींनी ह्या निसर्गाची शास्त्र-शुध्द पध्द्तीने जोपासना केली होती , त्याच आपल्या पूर्वजांनी दाखविलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण अशी मूल्ये चोखाळणार्‍या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करणे हाच एकमेव रामबाण उपायही आणि अंतिम तरणोपाय ही असावा असेच वाटते.

परंतु असे काही थोर भूमीपुत्र असतात , ज्यांना परिस्थितीपुढे हात टेकणे किंवा "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा " हे तत्त्व तर मुळीच मान्य नसते. उलट मानवाची जीजीविशा ही मानवाला सुखी, समृध्द जीवनाकडे नेणारी खरी गुरुकिल्ली आहे, "गरज ही सर्व शोधांची जननी आहे" हेच त्यांना ठाऊक असते. "अशक्य" हा शब्दच मुळी त्यांच्या शब्दकोशातच लिहायला जणू देव विसरला असतो. आणि असे हे महान जीवात्मेच मानव जातीला उध्दाराचा मार्ग दाखवितात आणि अलगद हाताला धरून बिकट वाटणारा यमघाट सहज , सोपा करूनही देतात - त्यांच्या परमात्म्यावरील अविचल श्रध्देने, अटळ, अडिग विश्वासाने - त्यांना संपूर्ण भरोसा असतो "तो कधीच आपल्या लेकरांना टाकीत नाही" आणि म्हणूनच ते आपल्या अथक प्रयासांनी मानवजातीला आशेचा किरण दावितात -
 "फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश, दर्‍या-खोर्‍यांतून वाहे एक प्रकाश -प्रकाश !!!

अशाच समस्त मानव जातीला वरदान ठरलेल्या, ज्यांचे स्वत:चे आयुष्य संजीवनीदायक ठरावे असे भव्य-दिव्य ! उत्तुंग यशोगाथा आणि  कीर्तीगाथा ह्या शब्दांनाही जेथे मर्यादा पडाव्यात असे संशोधनांचे जनक म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे ते डॉक्टर जॉर्ज कार्व्हर ! "राजहंस प्रकाशन" तर्फे प्रकाशित झालेले आणि  " वीणा गवाणकर लिखीत - "एक होता कार्व्हर" हे पुस्तक खरेच मला इतके प्रेमात पाडते ना की कितीही वेळा त्याचे वाचन केले तरी नव्याने ते अधिकच भावते, अधिकच नव-नवी दालने उघडून देते.



Saturday 4 April 2015

प्रेम आणि प्रेमरस ! कैवल्य आणि अनन्यभाव !!!


श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात प्रेम आणि प्रेमरसाची भेट !
श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात कैवल्याची व अनन्यभावाची भेट !!
श्रीराम-हनुमंत म्हणजे साक्षात चैतन्याची व महाप्राणाची भेट !!!




आज चैत्र पौर्णिमा म्हणजेच श्रीहनुमान पौर्णिमा ! आजच्या परमपावन दिवशी श्रीहनुमंताला जगत जननी सीतामाईचे पहिले दर्शन झाले अशोकवनात . हनुमंताला माता जानकीचा चरणस्पर्श लाभला आणि जो काया-वाचा -मनाने फक्त श्रीरामांचा दास झाला आहे अशा हनुमंताला जानकीमातेने "अष्ट सिध्दी नौ निधी के दाता " व्हाल असा आशीर्वाद दिला जे आपण हनुमान चलिसा मध्ये म्हणतो ही -
अष्ट सिध्दी नौ निधी के दाता ।  अस बर दीन जानकी माता ।
राम रसायन तुम्हरे पासा ।  सदा रहो रघुपती के दासा । । 


श्रीतुलसीदासविरचित "सुंदरकांड" म्हणजे तर फक्त प्रेम , प्रेम , प्रेम आणि प्रेमच !!!
  
            तुलसीदासांचे श्रीहनुमंतावरचे आणि हनुमंताचे त्याच्या श्रीरामावरचे प्रेम अगदी ओतप्रोत भरभरून वाहताना आढळते.

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog