Sunday 26 July 2015

२६ जुलै- कारगील विजय दिन - शहीद हुतात्म्यांना व भारतीय सैन्याला मानवंदना !!!

आजपासून १६ वर्षांपूर्वी आपल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी कारगिल युध्दात टायगर हिलवर आपल्या भारतमातेचा तिरंगा ध्वज फडकवून आपला यशाचा, विजयाचा गौरव साजरा केला होता. आपण त्या महान , थोर भारतमातेच्या सुपुत्रांना नतमस्तक होऊन त्रिवार प्रणाम करू या आणि भाव-सुमनांजली अर्पण करून आजच्या दिवशी त्यांची विजय गाथा स्मरू या. 


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. जोझीलापास पासून द्रास-कारगील, बटालीक सेक्टर, टायगर हिल व तोलोलिंग शिखर  -  सगळीकडे ऊंचावर शत्रू आणि पायथ्याला आपले सैनिक. शत्रू कुठे दडलाय, त्यांचे किती संख्याबळ आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र कोणती आहेत आणि किती ताकदीची आहेत याचा काहीच थांगपत्ता नसताना लढून जिंकलेलं हे युद्ध म्हणूनच खूप खडतर होते. 

Friday 24 July 2015

आली आषाढी एकादशी..चला करू पंढरीची वारी ... माझी विठ्ठल रखुमाई !!!

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.



लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना "माउली-माउली" ची हाक देतात, हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणार्‍यांचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Friday 17 July 2015

हेल्मेट / कार सीट बेल्ट - सुरक्षेची हमी !!!

नुकतीच १५ जुलै २०१५ ला ठाणे - पोलिसांनी देशाचे भवितव्य असलेल्या युवा वर्गाला आपलेसे करण्याची नवी मोहीम आखली आहे अशी एक अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2015/07/15023056/youth-protection-campaign.vpf  ह्या स्थळावर वाचनात आली. ह्या बातमीत युवा सुरक्षा अभियानांतर्गत मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०० हेल्मेटची वाटप केली. यावेळी पोलीस सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होते.

ठाणे शहर वाहतूक विभाग यांच्यामार्फत मंगळवारी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात युवा सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यासाठी बायोस्केप या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, कलाकार स्पृहा जोशी, विजू माने आणि मंगेश देसाई आदींनी रस्त्यांवर नियम पाळणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तर सहआयुक्त लक्ष्मीनारायण यांनी तरुणाईला शिस्त लावण्याची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून अन्य महाविद्यालयातही असे कार्यक्रम राबवणार असल्याचे स्पष्ट केले.

ह्यात पोलिस सहाआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनाराय़ण ह्यांनी तरूणाईने हेल्मेट वापरून सुरक्षा नियम आपल्या अंगी बाणवणे किती जरूरीचे आहे ह्याबाबत माहिती दिली. कलाकार स्पृहा जोशींनी ह्या पोलिसांनी सुरु केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यामुळे पोलिस आणि जनता ह्यांमध्ये जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते स्थापन होण्यास हातभार लागेल असा आशावाद व्यक्त केला. रवी जाधव ह्यांनी आपला हेल्मेट असल्यामुळे जीवघेण्या अपघातातून कसा जीव वाचला आणि जरी दुसर्‍या चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असला तरी हेल्मेट घातले नसते तर त्यांच्या स्वत:च्या जीवाला किती मोठा धोका उद्भवला असता हे स्वानुभवाचे बोल सांगून तरूणाईशी संपर्क साधला. 

खरेतर ही बातमी खरोखरीच एक स्तुत्य उपक्रम आहे ह्यात शंकाच नाही. परंतु त्याच वेळी आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आपण किती बेपर्वाईने वागतो, किती बेजबाबदारीचे वर्तन करतो, अपघातात आपणच आपल्य़ा चुकांमुळे किती मोठे संकट ओढावून घेऊ शकतो आणि ह्या प्रकारच्या दिसाय़ला लहानशा वाटणार्‍या एका चुकीने वेळप्रसंगी आपण आपला लाखमोलाचा जीव कसा गमावूही शकतो ह्या सर्वाची जाणीव होऊन मन अगदी बेचैन झाले. 


खरेच आपण स्वत:ला सुजाण , सुशिक्षीत म्हणवतो खरे , पण आपल्या स्वत:च्याच जीवावर उदार होऊन असे बेजबाबदारीचे आयुष्य जगण्यात काय मोठेपणा मानतो, कसली धन्यता मानतो ह्याची मनाला बोचक जाणीव "आता तरी " आपल्याला झाली पाहिजे ना? 


Thursday 16 July 2015

श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे पुण्यस्मरण !!!


।। ॐ द्रां दतात्रेयाय नम: । अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ।।

आज आषाढ शुध्द प्रतिपदा - श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ह्यांची १०१ वी पुण्यतिथी !
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हटले की पटकन आठवते ते घोरकष्टोध्दरण स्तोत्र, दत्तमालामंत्र, करुणात्रिपदी आणि असंख्य स्तोत्र !

घोरकष्टोध्दरणस्तोत्र   
श्रीपाद श्रीवल्ल्भ त्वं सदैव श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।१।।
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सदगुरुस्त्वम् ।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्र्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।२।।
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराऽशु त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।४।।
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । 
 भावासक्तिं चाखिलाऽनन्दमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।५।।
श्लोकपंचकमेतदयो लोकमंगलवर्धनम् ।
य: पठेत् प्रयतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।
।। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्रीमदवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।  

श्री दत्त महाराजांच्या इच्छेनुसार श्री प. प. नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगांवी झाला. तो अवतार अर्थातच श्री गणेशभट्ट व सौ. रमाबाई यांच्या पुत्ररुपाने १८५४ साली अवतरला असे वाचनात आले. वासुदेवशास्त्री टेंबे म्हणजेच संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज , जे थोरले महाराज म्हणून सुध्दा ओळखले जातात.



Wednesday 15 July 2015

१५ जुलै - श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंताचे पुण्यस्मरण !!!


आज १५ जुलै ! ८६ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करू या, 
हेमाडपंताच्याच शब्दांत मांडायचे तर - 
ज्यांचेनि पावलों परमार्थातें । तेचि कीं खरे आप्त भ्राते । सोयरे नाहींत तयांपरतें । ऐसें निजचित्तें मानीं मी ।।

Tuesday 14 July 2015

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता ( SWARM INTELIGENCE) - 2

जीवसृष्टीतील अनेक लहान -मोठे जीव आपण आपल्या सभोवताली वावरताना पहातो. छोटे-मोठे किडे, मुंगी, डास, झुरळ, पाल हे तर आपल्या घरात जणू काही  "हे माझे घर " अशा थाटाने न बोलावता सुध्दा हक्काने येऊन आपल्यासोबतच राहतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व अगदी नकोसे आणि त्रासदायक वाटते. त्यांना आपल्या घरातून बाहेर हाकलण्यासाठी आपण कीटकनाशके फवार, औषधी पावडरी वापर , प्रतिबंधक रेषा मार असे नाना उपायही अवलंबतो. परंतु त्यांना आपल्या घराबाहेर करणे किती कष्टाचे आणि अशक्यप्राय आहे याची जाणीव बहुधा आपल्या सर्वांनाच चांगल्याच माहितीतली आहेच. 

या जीवांपकी 'मुंगी' हा स्वत:मध्ये अफाट सामर्थ्य घेऊन जीवन जगणारा अतिसामान्य कीटक आहे असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटू शकते. परंतु मुंगीचे अभ्यासक व संशोधक मात्र वेगळेच मत मांडतात. त्यांच्या मते मुंगी आणि तिचे संपूर्ण विश्व , तिचे सामाजिक जीवन , तिची जीवननिष्ठा आणि जगण्यातील शिस्त, जगण्याची कार्यप्रणाली, संरक्षणप्रणाली आणि युद्धनीती, सफाई पध्दती, अन्नशोधपद्धती, संदेशवहन, तिच्या वसाहती, बुरशीची शेती करण्याची त्यांची पारंपरिक पद्धती, मावापालन, किडय़ांचा सांभाळ करणारी गोशाळा, तेथील स्वच्छता, कामविभागणी असे सारेच थक्क करून सोडणारे विश्व आहे.

विल्सन आणि हॉलडॉब्लर ह्या दोन महान संशोधकांनी तर आपले अवघे जीवन मुंग्याचा अभ्यास करण्यात वेचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोघांनी लिहीलेले " द ऍन्ट्स " हे पुस्तक ह्या त्यांच्या संशोधनाचा आढावा घेण्यास खूप मोलाचा हातभार लावते.

चला तर मग फेरफटका मारू या ह्या अद्भुत अशा मुंग्याच्या विश्वात -

Tuesday 7 July 2015

बायोइंजिनिअरिंग- वाळा- खस गवताची लागवड - Landslideसाठी प्रतिबंध

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला , पूर येऊ लागले की त्याच्या सोबतीने भूस्सखलन होणे, दरडी कोसळणे , भूघसरण होणे म्हणजेच Landslide होणे ह्या प्रकारच्या आपत्तीही तोंड वर काढू लागतात.

नुकतीच वर्तमानपत्रात सोमवारपासून उत्तर बंगालमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दार्जिलिंगमधील कलिम्पोंग आणि मिरिक येथे भूस्खलन झाले. दार्जिलिंग - सिक्कीमला देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (एनएच) 55 वर देखील दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली आहे. संततधार पावसामुळे जमिनीची धूप होऊन दार्जिलिंग परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी रात्री १जुलै २०१५ ला सुमारे ३८ जणांचा बळी गेला आहे. दार्जिलिंगमध्ये २५ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १० व ५५वरील वाहतूक विस्कळ‌ित झाली. ही बातमी वाचली. आणि त्यानंतर NIDM ( National Institue of Disasater Management) मधील Geo Hazards भागाचे मुख्य आणि अध्यापक (Professor) असणार्‍या तञ व्यक्तीचे मत वाचण्यात आले ज्यात त्यांनी Landslide होण्यामागची कारणमिमांसा केली होती आणि Landslide थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून Vetiver grass ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते ज्यामुळे मनात जिज्ञासा दाटली की निसर्गाच्या प्रकोपाला एक साधेसुधे गवत कसा काय प्रतिकार करून थोपवू शकते. 

पण त्याआधी दरड कोसळणे किंवा Landslide होण्यामागची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. साधारणपणे ढोबळमानाने डोंगर किंवा टेकडी ही त्रिकोंणी आकाराची असते. ह्यातील भूमध्य  स्थिती नीट असते तोवर घसरण होण्याची शक्यता नसते. पण जेव्हा कोणत्याही बाजूच्या पायाकडची जमीन किंवा माती ही पकड सैल झाल्याने घसरू लागते तसे भूमध्याची जागा बदलते आणि संपूर्ण वरचा भाग खाली कोसळू लागतो.

भूस्सखलन होणे म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूघसरण होणे . धो धो पडणार्‍या पावसात साचलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहते आणि पाण्याच्या जोराच्या वेगाने तेथील भुसभुशीत झालेली मातीही वाहू लागते. अशा वेळी मातीची पकड कमकुवत वा ढिली पडली की मोठा भूभाग घसरून पडण्याची शक्यता वाढते , ज्यामुळे मातीचे ढिगारे वा दरडी कोसळून पडण्याची भीती वाढते, ज्याच्या प्रचंड द्बावाखाली लोक चेंगरून मरू ही शकतात. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते.

आपण सारे जाणतो की आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इत्यादींवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी जमिनीची धूप होण्याबाबत अत्यंत संवेदनानशील आहेत.

मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा परिस्थीतीत Vetiver grass ची लागवड केल्यास landslide म्हणजेच दरडी कोसळणे ह्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालता येऊ शकतो हे वाचून मोठे कुतुहल दाटले आणि Internet search केले असता चक्क आ वासण्याची परिस्थीती झाली.

Vetiver grass म्हणजे चक्क आपले वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाणारे गवत बरे का !!!


Saturday 4 July 2015

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता( Swarm Inteligence)

सुटीसाठी ८-१० दिवस बाहेरगावी जाऊन परत घरी आले आणि दार उघडून आत प्रवेश केला तर भरपूर ठिकाणी मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती आटाटी करतो, किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे. आपण ह्याचा शोध काढला पाहिजे. एकीकडे वाटत होते की Internet लावून शोध घ्यावा आणि दुसरीकडे वाटत होते की काय कटकट ? आता सारी साफसफाई करायला हवी पहिल्यांदा. द्विधा अवस्थेत मनाची कोंडी चालू होती. पण भुकेने पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे तूर्तास तरी पोटापाण्याची सोय करणे हेच आद्य कर्तव्य होते आणि जे अत्यंत निकडीचे होते. आता मात्र त्या मुंग्याच्या रांगाना पळवून लावणे आणि किचन , किचन मधील ओटा साफ करणे हेच माझे उद्दीष्ट होते . म्हटले आधी स्वत:च्या पोटात पाडू आणि मग त्या मुंग्या कशा स्वत:चे पोट भरतात ह्याकडे वळू.

अन्न पोटात गेले आणि मग बुध्दीची भूक जागी झाली , म्हटले चला एकदा शोध घेण्याचा प्रयत्न तर करू या आणि हाती खूपच अद्भुत , विलक्षण  अशा मुंगीच्या विश्वाची माहिती मिळाली असे मला वाटते.

Swarm Inteligence हा शब्द तसा जास्त परिचयाचा नसावा असे मला वाटते. माझ्याही माहितीतला नव्हता. आता ह्या Swarm Inteligence चा आणि मुंग्याचा काय संबंध असे तुम्हाला वाटले असेल ना, पण थोडे थांबा . आपण त्याचा अर्थ आणि संबंध दोन्ही जाणून घेऊ या.

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog