Sunday 31 January 2016

झिका व्हायरस - नैसर्गिक आपत्ती का मानवनिर्मीत आपत्ती?

डेंग्यु, चिकन गुनिया ह्या सारख्या जीवघेण्या आजारांच्या विळख्यातून कोठे जग बाहेर पडत नाही पडत तोच ईबोला व्हायरसने लोकांना ग्रासले होते. जवळपास एक वर्षाआधी आफ्रिकी देशांमध्ये ईबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याची नोंद दाखल झाली आणि त्यात ११,३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. सिएरा लिओन, गिनीया ह्या देशांना ’ईबोला" चा स्रवात जास्त फटका बसला होता आणि  त्यावेळेस जवळपास २८,६०० लोक ह्या विषाणू (व्हायरस)च्या संपर्कात आले होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

आफ्रिकेमधील "लायबेरिया" ह्या देशात ईबोलाचा एकही रूग्ण न आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization - WHO) अधिकृत रीत्या ईबोला ह्या जगाला हादरवून सोडणार्‍या "संक्रमक आजार" पसरवणार्‍या व्हायरसपासून संपूर्णत: मुक्ती मिळाल्याची घोषणा केली होती. त्या दरम्यान रशियाने सुध्दा "ईबोला" वर वॅक्सिन मिळाल्याचा दावा केला होता. भयमुक्त जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला नाही तर आता पुन्हा झिका व्हायरस नावाच्या नव्या राक्षसरूपी विषाणूने आपले वर्चस्व वाढवायला सुरुवात केले असल्याच्या बातम्या एका मागोमाग एक येऊन धडकत आहेत.   

Wednesday 27 January 2016

सत्यसंकल्प प्रभु - सुंदरकांड - अद्वितीय प्रेमप्रवास !

सुंदरकांड पठण करताना माझे मन नेहमी ’राम सत्यसंकल्पप्रभु सभा कालबस तोरी।’ ह्या ओवीभोवती घुटमळायचे. खरेच परमात्मा हा जेव्हा जेव्हा मानव रुपात ह्या वसुंधरेवर म्हणजेच आपल्या ह्या पृथ्वीतलावर अवतरतो तेव्हा किती अपार कष्ट सहन करतो आणि आम्हाला "त्या"च्या लेकरांना सत्य, प्रेम, आनंद ह्या त्रिसूत्रीला आचरून मर्यादा पुरुषार्थ कसा साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टीतून असो वा नातेसंबंध जपताना असो आचारणात आणावयाचा ह्याचे उत्तम उदाहरण देऊन वास्तववादी आदर्शच घालून देतो जणू ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

                                                           

रावणाच्या भरदरबारात त्याचा सख्खा भाऊ बिभीषण हा त्याला श्रीराम प्रभुंच्या पत्नी सीतामाईंना आदरपूर्वक परत पाठविण्याचा व आपल्या राक्षस वंशाचा समूळ संहार होण्यापासून रोखण्याचा यथोचित सल्ला देतो. तेव्हा अंहकाराने उन्मत्त झालेला, रागाने बेभान झालेला रावण बिभीषणाला लाथेने धुडकावतो, तेव्हा श्रीरामांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे, गुणसंकीर्तन करताना बिभीषण उद्गारतो की  हे रावणा, माझे प्रभु श्रीराम हे सत्यसंकल्प प्रभू आहेत आणि तुझी सभा ही काळाने ग्रासलेली आहे.

राम सत्यसंकल्प प्रभु आहे असे बिभीषण रावणाला सांगतो कारण राम हाच एकमेव सत्यसंकल्प आहे , अर्थात फक्त रामाचाच संकल्प सत्यात परिवर्तित होऊ शकतो. ह्या अखिल जगतात जेव्हा काहीच नव्हते , तेव्हा परमेश्वराने केवळ "त्या"च्या " एकोsस्मी बहुस्याम " ह्या संकल्पनेनुसार सर्व जग उत्पन्न केले, म्हणजेच ज्याने केवळ स्वत:च्या कल्पनेच्या सहाय्याने अवघे विश्व उत्पन्न केले, त्या परमात्म्याची कल्पनाशक्ती ही एक शक्ती आहे. त्यामुळे फक्त "त्या" एकाचाच संकल्प सत्यात उतरतोच उतरतो. आम्ही मानव आहोत , आम्हाला मानवांना हे जाणून घ्यावे लागते की कल्पनाशक्तीच्या सहाय्याने आम्हाला क्षणिक आनंद मिळू शकतो, परंतु आम्हाला खराखुरा नित्य आनंद, वास्तविक सुख, खरे वैभव, खरी ताकद, खरे बळ ह्या क्षणभंगुर कल्पनेतून नाही मिळू शकत. त्यासाठी परमात्म्याने आम्हाला निरीक्षण शक्ती दिली आहे  आणि तिच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न करून , पुरुषार्थ करून आम्हाला हवे ते उचित प्रकाराने मिळवू शकतो. 

Tuesday 12 January 2016

आण्विक युध्द- अणुबॉम्बचे पुढचे पाऊल हायड्रोजन बॉम्ब!!!

७ जानेवारी २०१६च्या दैनिक प्रत्यक्षमधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी ! आणि जगात खळबळ उडविणार्‍या ह्या बातमीने हायड्रोजन बॉम्ब हा एवढा संहारक, अणु बॉम्बपेक्षा महाविनाशकारी का बरे मानला जात असावा ह्याची मनात अपार उत्सुकता दाटली.
  

उत्तर कोरियाने बुधवारी ६ जानेवारी २०१६ रोजी तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता अणुचाचणी केंद्रानजीक अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने, आंतरराष्ट्रीय सर्वच स्तरांवर प्रचंड खळबळ माजली आहे. ह्या चाचणीने उत्तर कोरियातील भूकंप केंद्राने ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे. 

जागतिक शांतता धोक्यात आणल्यावरून उत्तर कोरिया हा फक्त जागतिक टीकेचा विषय बनला नसून त्याला आणखी कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी उत्तर कोरियाने २००६ , २००९ आणि २०१३ मध्ये अणु चाचणी घेतली होती. 

हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अधिक प्रमाणात संहार करण्याची क्षमता असलेला मानला जातो. उत्तर कोरियाने आपले आण्विक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल सर्व जगाला चिंता व्यक्त करण्यास का भाग पाडत आहे ? ह्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करताना काही माहिती मिळाली ती देण्याचा हा प्रपंच !!

आता आपल्याला साहजिकच असे वाटू शकते की आपल्या सारख्या सामान्य माणसाला काय करायचे हे हायड्रोजन बॉम्ब किंवा अणु बॉम्ब असे  सगळे समजून घेऊन ? आणि दुसरे म्हणजे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे मग आम्हाला कशाला चिंता ?  

"तिसरे महायुध्द" हे डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांचे पुस्तक वाचनात आले आणि लक्षात आले की आपला हा विचार किती चुकीचा असू शकतो. ह्या पुस्तकात आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती करून देताना डॉक्टर जोशी म्हणतात माहिती करून घेणे ह्याचा उपयोग नक्कीच आहे कारण अज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम टाळू शकते.

Saturday 9 January 2016

अंतराळ युध्द - आधुनिक शस्त्रात्रे आणि प्रभाव !

नुकत्याच दैनिक प्रत्यक्ष मध्ये वाचनात आलेल्या एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले होते ती बातमी होती - चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून लष्कराला सज्जतेचे आदेश. काय विशेष असे होते या बातमीत? तर सैनिकांची संख्या कमी करण्याबरोबर पुढील पाच वर्षात चीनच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणावर भर देण्यात येणार असून यामध्ये अंतराळ युध्दाची तयारी म्हणून ’स्पेस फोर्स’ तयार करण्यात येणार आहे. 



हे वाचल्यावर अंतराळ युध्द म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची मनात अपार जिज्ञासा दाटली. त्या वाचनातून हाती आलेली काही माहिती येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

Sunday 3 January 2016

क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले !!!!



एक मेणबत्ती हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करू शकते आणि तरी तिला तिचे स्वत:चे आयुष्य कधीच उणे भासत नाही " 
महात्मा गौतम बुध्द ह्यांचे हे उद्गार वाचताना डोळ्यासमोर साकारते ती क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ! 

जोतिबा फुले हे आधुनिक भारताचा शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतिसूर्य तर त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून निरंतर सावली बनून ५० वर्षांहून अधिक काळ त्यांना अविरत साथ देणारी सहचारिणी , कार्यकर्ती अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलणारी सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतिज्योतीच होय !


Friday 1 January 2016

भगवंताची भाषा शिकून चला भगवंताशी नाते जोडू या ....

आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. सर्वचजण एकमेकांना नव-वर्षाच्या शुभेच्छा देण्यात गुंग असतात. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशेचा सूर्योदय ! नवीन ध्येयाचा, नवीन सुबत्तेचा , नवीन विचारांच्या धारेचा , नवीन सळसळत्या चैतन्याचा, नवीन जोशाचा ,नवीन ताकदीचा , नवीन सामर्थ्याचा , नवीन आविष्कारांचा , नवीन प्रार्थनांचा एक गुलदस्ताचा जणू ! ह्या शुभेच्छा , प्रार्थना आणि सदिच्छांतून अवघे प्रेमच अव्याहतपणे भरभरून वाहत असते. पण ह्या सर्वाचा मूळ स्त्रोत असणारा भगवंत , परमेश्वर ह्याची आम्हाला आठवण येते का ? आम्ही "त्या" अनंत करूणामयी परमेश्वराला, भगवंताला "त्या"नेच हे सारे आम्हाला दिले म्हणून कधीतरी कृतार्थ भावाने धन्यवाद देतो का? कधीतरी आभार मानतो का? तर कदाचित उत्तर देणे कठीण होऊन बसेल नाही? आम्हाला "त्या" भगवंताची स्मृती तरी असते का? हाच मुळात प्रश्न आहे, चला तर मग आज नवीन वर्षाच्या औचित्याने "त्या" भगवंताशी नाते जोडायला शिकू या ... 

आता कोणाशी नाते जोडायचे म्हणजे मला त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा आणि संवाद तर तेव्हाच साधता येतो जेव्हा मला त्या व्यक्तीला माहीत असलेल्या भाषेत बोलता येते किंवा मला ठाऊक असलेली भाषा त्या दुसर्‍या व्यक्तीला पण माहीत असते. आता येथे तर साक्षात भगवंताशीच मला नाते जोडायचे आहे म्हटल्यावर मला भगवंताची , परमात्म्याची भाषा येते का? हा प्रश्न उद्भवतो साहजिकच, नाही का बरे? 

आम्ही साईसच्चरितात वाचतो की कृष्णाचे वचन " संत माझ्या सचेतन मूर्ती ! " म्हणजेच संत ह्या परमात्म्याच्या, भगवंताच्या सचेतन मूर्ती आहेत. आणी "जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी " ह्या न्यायाने प्रत्येक मानव हा कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्या परमात्म्याची अंशत: मूर्ती असतोच. आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर परमेश्वराने , त्या भगवंताने आमच्या पित्याने आम्हाला त्याची सगळी ताकद कमी-अधिक प्रमाणात दिलेली आहेच. म्हणजेच आम्हाला "त्या" परमात्म्याची, परमेश्वराची, त्या भगवंताची भाषा नक्कीच समजू शकते , जर आम्ही त्या दिशेने प्रयास केले तर !!! 

आम्हाला कधी प्रश्न पडला की परमेश्वराला कुठली भाषा कळते. तो एकच राम वा तो एकच कृष्ण वा तो एकच साई , मग त्याला आम्ही मराठीतून आळवतो, गुजराती मधून आळवतो, तमिळ , कन्नड , मल्याळी, बंगाली मधून आळवतो तरी सगळ्यांची भाषा "त्या"ला पोहचतेच ना, सारे काही "त्या" ला कळतेच ना ? कारण ती असते "प्रेमाची" भाषा ! 

रामाचे, कृष्णाचे, साईबाबांचे भक्त वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते आणि आज ही आहेत, तरी सगळ्यांची भाषा "त्या" ला कळतेच. हे "त्या"चं वैशिष्टय आहे. ही "त्या"ची विशेषता आहे. पन मग आम्हाला "त्या"ची भाषा कळते का? परमात्म्याची, "त्या" प्रेमळाच्या प्रेमळ , दयानिधीची भाषा शिकणे हेच सगळ्यात विशेष आहे माणसासाठी असे मला वाटते.         

परमेश्वराने आम्हाला "त्या"ची भाषा दिलीय, वाणी (वाचा - बोलण्याची देणगी) दिलीय आणि त्या परमेश्वराची भाषा शिकायची सोयही करून ठेवलीय. पण आम्ही कधी तिचा वापर करतो का? 



प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog