Sunday 14 February 2016

तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम...

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....
जीवनावर मनापासून प्रेम करणारे आणि त्याच बरोबरीने आपल्या सहजसोप्या कवितांतून महाराष्ट्रातील मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याची प्रेरणा , नवचैतन्य देणारे महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण मंगेश पाडगांवकरांचे हे अजरामर शब्द ....

तसे पाहता नरजन्म हा अत्यंत दुर्मिळ , चौर्‍याऐंशी लक्ष योनींचा फेरा फिरल्यानंतरच प्राप्त होणारा हा मानवी जन्म ! त्यामुळेच ह्या जन्मावर , ह्या जगण्यावर प्रेम कितीही केले तरी कमीच ..म्हणूनच मानवाला पाडगांवकर देखिल आवर्जून सांगतात की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....

सत्य, प्रेम आणि आनंद ह्याच त्रिसूत्रीचा आविष्कार असलेला "तो" परमात्मा वा परमेश्वर म्हणजे तर प्रेम , प्रेम आणि प्रेमच.. सतत अव्याहतपणे , निरंतर , अखंडीत, अबाधित असे ज्याचे प्रेम असते तो एकमेवाद्वितीय "अनन्यप्रेम्स्वरूप" मग कुणी त्याला राम म्हणेल, कुणी शाम म्हणेल, कुणी कृष्ण कन्हैया म्हणेल, कुणी त्याला सदगुरु रूपात साईनाथ तर कुणी स्वामी समर्थ आजोबा रूपात अनुभवेल...

सर्वसामान्यपणे आपल्या मानवी जीवनात आपल्या संसारात आपली पत्नी, पती, मुले-बाळे , आई-वडील हे आपल्या प्रेमाची जागा घेणारे हक्काचे आपले आप्त असतात. पण तरीही कुठेतरी , कधीतरी त्या प्रेमालाही मर्यादा पडतातच ना? परंतु आपल्यावर "अनिरुध्द" अशा प्रेमाचा वर्षाव करणारा "तो" एकमात्र आणि एकमेवच असतो , कारण "त्या" एकाचेच प्रेम हे लाभेवीण असते. 

मानवी पातळीवर कधी आपल्या प्रेमाची परिमाणे ही पैशात , महागड्या चैनी वस्तूंमध्ये , आकर्षक भेटवस्तूंमध्ये, मौल्यवान हिरे-माणके, सोन्यांच्या दागिंन्यात असू शकतात. परंतु कधीही साथ न सोडणारा आपला एकमेव जिवाभावाचा साथीदार केवळ "तो" भगवंत वा सदगुरुच अस्तो , हे मात्र १०८%  त्रिकालाबाधित सत्य आहे, जे कुणीच नाकारू शकत नाही. 

"राजा रंक भेद नहीं पाई " म्हणजेच सर्वासाठी मुक्त हस्ताने , मुक्त कंथाने प्रेम उधळणारा .... मग "त्या" परमात्म्याला, "त्या" भगवंताला मी त्याच्यावर प्रेम करतो किती ह्याची गणतीच नसते, भले मी "त्या" भगवंतावर, परमात्म्यावर थोडे फार काम्य भक्तीने (माझे काम होण्या पुरते) का होईना प्रेम करो वा रात्रंदिवस "त्या"चे नाम उराशी कवटाळून त्याला आळवू, खरेच "त्या"ला मात्र त्या कशाने यत्किंचीतही फरक पडत नाही. ही गोष्ट सामान्य माणसाला विश्वास ठेवायलाही अवघडच आहे ना? कसे काय बाबा , हे तर मुळीच शक्य नाही , आपण काय़म प्रेमात सुध्दा मोजमाप लावत बसतो, जणू प्रेमाच्या तराजूत तोलत असतो , ह्याचे प्रेम जास्त की त्याचे प्रेम जास्त... पण अनंत हस्तांनी प्रेमाची उधळण सदोदीत करणार्‍या "त्या" अनन्यप्रेमस्वरूपाला मुळी आपल्या कडून कशाची म्हणजे कशाचीच अपेक्षा नसते. फक्त प्रेमाने तुम्ही काही द्या , मग ते भले पान असो, फुल असो, फळ असो की फक्त पाणी असो , "तो" भुलतो फक्त प्रेमाला, प्रेम भावाला ...

गीतेच्या नवव्या अध्यायातील २६ व्या श्लोकात साक्षात भगवान श्रीकृष्ण ह्याची ग्वाही देतात की -
पत्रं पुष्पं फलं तोयं मे भक्त्या प्रयच्छति  तदम भक्त्युहृतमश्रामि प्रयत्मामन: 
ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भगवंत कृष्णाच्या जीवनात कंसाच्या आज्ञेनुसार पुतना राक्षसी ही लहानग्या बालकृष्णाला जीवानिशी मारण्यासाठी विषाचे स्तनपान करविते. म्हणजे कृष्णाच्या प्राणांवर बेतले असते ते विष, परंतु अशा स्वत:च्या जीववार उठलेल्या पुतना राक्षसीचा सुध्दा कृष्णाने अव्हेर न करता तिला माता म्हणूनच आदराने गौरविले होते. 

महाभारत युध्दानंतर आपल्या १०० पुत्रांचा वध हा श्रीकृष्णाच्या कारस्थानानेच पांडवांना करता आला हे पूर्णपणे जाणणारी आणि जीवनभर कृष्णाची पूजा करणारी गांधारी मातृप्रेमाने विवश होऊन सूडाच्या भावनेने , अविवेकाने कृष्णाला त्याच्या यादव कुळाचा समूळ नाश होईल असा शाप उच्चारते तरीही भगवान कृष्ण तिच्यावर जराही न रागावता त्या शापाचाही स्विकार तर करतातच पण पुढील जन्मात तिच्या वंशाला वाचवण्याचे अभयवचनही देतात. 
म्हणजेच काय तुम्ही "त्या" प्रेमळा भगवंताला प्रेमाने काही द्या वा काही पण देऊ नका , "त्या"च्या अनाकलनीय प्रेमापुढे कशानेच फरक पडत नाही , हेच खरे, प्रेमाने, भक्तीने तुम्ही राजा आहात की रंक (भिकारी) आहात , "तो" मात्र फक्त प्रेमच करतो आणि प्रेमच लुटवित राहतो अव्याहतपणे...

म्हणूनच संत तुलसीदासजी "सुंदरकांड" ह्या अपौरूषेय ग्रंथात साक्षात महाप्रभु हनुमंताच्या मुखातून भक्तीस्वरूपा जानकी मातेला श्रीरामांच्या अगाध प्रेमाची खूण पटविताना म्हणतात " तुम ते प्रेमु रामू के दुना" माते तुझे जे श्रीरामांवर प्रेम आहे त्याच्या दुप्पट प्रेम श्रीराम तुझ्यावर करतात. तुलसीदासजी सांगतात सीतामाईच्या सारखेच प्रभु श्रीराम आपल्यावरही आपण करू त्याच्या दुप्प्ट प्रेम करतात. 

ह्याच श्रीरामांनी लंकेला पोहचण्यासाठी सेतू बांधण्याचे काम चालू असताना आपल्या परीने स्वत:चे अंग वाळूत लोळवून वानरांनी फेकलेल्या मोठाल्या दगडांमधील भेगा बुजवायचे काम करीत राहणार्‍या इवलुशा खारूताईच्या श्रमांची नोंद घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमाने आपला हात फिरविला होता , ज्याची खूण म्हणून ती श्रीरामांची बोटे आजही समस्त खारींच्या पाठीवर आपण पाहतो. 


ह्या प्रभु श्रीरामांना तर अगदी राज्याभिषेक होण्याच्या ऐन वेळीस स्वत:च्या अटींची मागणी करून , वचनांमध्ये दशरथ राजाला अडवून १४ वर्षांचा वनवास घडविला होता ती कैकयी कोण बरे विसरेल ? सामान्य माणूस अशा एखाद्या स्वत:च्या जीवनातील बहूमूल्य काळ उध्वस्त करण्याला कोणाला कधीतरी माफ करू शकेल का? साधी कल्पना देखिल सहन होत नाही ना? पण श्रीरामांनी स्वत: तर कैकयीला उदार अंत:करणाने माफ केलेच , पण तिच्या स्वत:च्या पुत्राने भरताने तिला झिडकारले, धिक्कारले असून देखिल भरताला परत माता म्हणून तिचा स्विकार करण्यास भाग पाडले होते. 

आपण कथा-पुराणांमध्ये वाचतो की भगवान विष्णूने तर स्वत:च्या छातीवर भृगू ऋषींनी रागाने मारलेली लाथ सुध्दा "वत्सलांछन " म्हणून प्रेमाने मिरवली होती. 

विष्णू असो की प्रभु श्रीराम असो वा भगवान श्रीकृष्ण असो ह्यांच्या जीवनातून आपण अनुभवतो की हा अपार वात्सल्य, प्रेमाने ओतप्रोत भरलेला परमेश्वर , भगवंत एकमेव आहे जो आमच्यावर फक्त लाभेवीण प्रेम करतो, "अनन्य" ज्याला दुसरी कशाचीच उपमा देता येऊच शकत नाही असे अनन्य प्रेम करतो. "त्या" च्या त्या अनन्य प्रेमापोटी "तो" कधी कबीराचे शेले विणतो कौत्स्ल्येचा राम बनून, तर कधी "झाला महार पंढरीनाथ " बनून दामाजीला वाचवायला महाराचे रूप धरतो तर कधी जनाबाईला गोवर्‍या वेचायला, धुणी धुवायला, जाते दळून पिठ काढायला , हातभार लावायला धाव घेतो....  

संत तुलसीदासजी आपल्याला एक सोपा उपाय दावतात "प्रेम गली अति सांकरी तेमा दुजा न समाय, तू है तो मै नाही "  म्हणजेच हृदयरूपी प्रेमाच्या गल्लीत एकतर "तो" भगवंत राहतो किंवा मी म्हणजेच माझा अंहकार. आपण "त्या" परमेश्वराला आपल्या हृदयात निवास करायला सांगू म्हणजे "त्या"चे प्रेम आपल्याला आपसूक मिळेलच. 

आपण साधी माणसे आपल्या आप्तांवर प्रेम करूयाच पण "त्या" अनन्यप्रेमस्वरूप भगवंताला, परमेश्वरालाच साद घालू या की हे माझ्या बाप्पा तुझ्या अनन्य प्रेमाचा आम्हाला तू अंश तरी दे , केवळ तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, तुझ्या चरणांवर तुझ्याच कृपेने निरंतर प्रेम करीत राहण्यासाठी, तुझ्या चरणांवरचे आमचे प्रेम असेच नित्य वाढत राहो... "त्या"च्या प्रेमाने मग आपण खरोखरीचे ह्या जन्मावर , जगण्यावर प्रेम करायला नक्कीच शिकू या... गरज आहे ती फक्त "त्या" अनन्यप्रेमस्वरूपाशी आपली नाळ जोडून घट्ट करायची ...

अवचित स्मरल्या त्या  माझ्या मनाला खूपच भावलेल्या काही पंक्ती - 
न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरूध्द प्रेमसागरा  थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या  
किती यथार्थ बोल आहेत ना, प्रेमाचा सागर असणार्‍या परमेश्वराच्या अनिरुध्द प्रेमाचा एक थेंब सुध्दा मला अवघे न्हाऊ -माखू घालायला अगदी पुरेसा असतो.  "तो" प्रेमाचा सागर आहेच आणि "त्या "च्या अनंत प्रेमाचा एक थेंब सुद्धा माझी तृषा भागवायला पुरेसा आहेच… मला तहान लागायला तर हवी ना "त्या "चे प्रेम प्यायला    
हेच सांगत असावे ह्या गीताचे बोल - तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम...      

संदर्भ: 
१. संत तुलसीदास- "सुंदरकांड" 

          

Wednesday 10 February 2016

माघी गणेशोत्सव - श्रीगणेश जंयती - ब्रम्हणस्पती व अष्टविनायक पूजनाची पर्वणी !

गणेशोत्सव म्हटले की पटकन आठवतो तो भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव. ह्या भाद्रपद गणेशोत्सवाबरोबर आपल्या भारतवर्षात माघी गणेशोत्सव सुध्दा साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्यामागची भूमिका बहुधा आम्हाला माहितच असते की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या महान रणझुंझार,लढवय्या, खंबीर नेतृत्वाने सन १९८३ मध्ये घराघरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहुर्तमेढ रोवून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनजागृती करून भारतीय देशवासियांना सुसंघटीत करण्याचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर आजपावेतो हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. 

आता माघी गणेशोत्सवामागची संकल्पना बघू या- 
"मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्:" ह्या ग्रंथात वाचनात आले की आपल्या भारतवर्षात प्राचीन काळी जेव्हा गुरुकुलांची परंपरा होती तेव्हा अत्री ऋषिंनी यज्ञसंस्था आखीवरेखीव व नियमबध्द केली होती आणि ते अगस्त्य , वसिष्ठ, मृकंड ऋषिंच्या सहाय्याने शुभ विद्यांची गुरुकुले स्थापन करीत होते आणि अत्रि ऋषिंची पत्नी माता अनसूया ऋषिंना, ऋषिपत्नींना तसेच राजांना व राजपत्नींना धर्मपालन व भक्ती ह्यांचे महत्त्व आणि त्यांचे नियम समजावून सांगण्याचे कार्य करीत होती. ही कार्ये करीत असताना अत्रि ऋषि व माता अनसूयेच्या लक्षात आले की कर्मस्वातंत्र्याचा वापर करून मानव द्रव्यशक्तीचा अनुचित वापरच जास्त करीत आहे व त्यामुळे ह्या विश्वाचा घनप्राण मनुष्य़ास सहाय्यभूत होण्याऐवजी त्याच्यावर क्रोधित होऊन मनुष्याच्या कार्यशक्तीस अटकाव करू लागला आहे. 

घन म्हणजे स्थूल थोडक्यात सोप्या भाषेत बघायचे तर घन म्हणजे ज्याला अस्तित्त्व आहे अशा दिसू शकणाऱ्या  गोष्टी. 
घनप्राण म्हणजे द्रव्यशक्तीच्या वापरातून त्रिविध मनुष्यदेहात (भौतिक, प्राणमय आणि मनोमय) व निसर्गात उत्पन्न होणारी स्थूल स्तरावरील कार्यशक्ती. 

तेव्हा त्यावर उपाय योजण्यासाठी अत्रि ऋषि व माता अनसूयेने ह्या विश्वातील मूळ द्रव्यशक्ती (पदार्थशक्ती) असणाऱ्या पार्वतीमातेस बोलावून घेतले व सांगितले की ह्या सामान्य मानवांची बुध्दी त्यांच्या मनापुढे अबला ठरत आहे. अशाने मानवास त्याचा अभ्युदय करून घेणे व परमात्मप्राप्ती करून घेणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आता तू तुझ्यापासूनच उत्पन्न होणाऱ्या  ह्या घनप्राणास पुत्ररूपाने धारण कर.

अशा प्रकारे माता अनसूयेच्या आज्ञेनुसार पार्वती मातेने कैलासावर जाऊन विश्वाच्या घनप्राणास आपला पुत्र म्हणून साकार केला तो दिवस म्हणजे माघ शुध्द चतुर्थी. पार्वती मातेने आपल्या पुत्राचे ’ब्रम्हणस्पती’ तर परमशिवाने ’गणपति’ व कार्तिकेयाने ’ हेरंब’ असे नामकरण केले असले तरी सर्व शिवगण मात्र त्यास ’गणेश’ ह्या कौतुकाच्या नावाने संबोधू लागले. म्हणून हा माघ शुध्द चतुर्थीचा दिवस "श्री गणेश जयंती" म्हणून ओळखला जातो आणि माघ महिन्यात येत असल्याने "माघी गणेशोत्सव " म्हणून साजरा केला जातो. तसेच काही ठिकाणी माघी महिन्यातील श्री गणेश जयंतीला " तिळकुंद  चतुर्थी " ह्या नावाने सुध्दा ओळखले  जाते,

सर्वसामान्यपणे लग्न झालेल्या विवाहित स्त्रीला माहेरी नेऊन नेहमी तिचे व तिच्या अपत्यांचे लाड केले जातात म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान शिवशंकराच्या पत्नीला पार्वतीमातेला माहेरवाशीण म्हणून अत्यंत प्रेमाने भाद्रपद महिन्यात घरी आणले जाते आणि तिचे व तिच्या पुत्राचे गणपतीचे नातू म्हणून स्वागत केले जाते तो दिवस म्हणजे भाद्रपद शुध्द चतुर्थी - भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव !

ब्रम्हणस्पती - ऋगवेदातील गणपती स्वरूप 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog