Friday 29 July 2016

चला स्वावलंबी बनू, आत्मनिर्भर होऊ या ...

नुकताच २६ जुलै हा "कारगिल दिवस" हा भारतीयांनी अत्यंत अभिमानाने साजरा करीत आपल्या शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांच्या व असीम पराक्रम गाजविणार्‍या भारमातेच्या सुपुत्रांचा, वीरांचा उदो उदो केला. परंतु ह्याच कारगिलच्या युध्दात नामर्दपणे भेकड छुप्पे हल्ले चढविणार्‍यांवर यश मिळवायला अनेक जवानांना आपले रक्त सांडावे लागले आणि धारातीर्थी पडलेल्या आपल्या निधडया छातीच्या शूर लढवय्या वीर पुत्रांच्या बलिदानावर भारतमातेला आसवे ढाळावी लागली ती काही बाबतीत आपल्या मातृभूमीची आत्मनिर्भरता , आपली स्वावलंबी वृत्ती कमी पडल्याने असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
त्यावेळी भारताची स्वत:ची नेव्हीगेशन सिस्टीम नव्हती आणि शत्रूंच्या चौक्या हुड्कायला त्याची तर नितांत गरज होती. मैत्रीचा हात पुढे करणार्‍या अमेरीका ह्या मित्र देशाकडे आपण मागणी केली खरी , पण ती मदत नाकारली गेली. अर्थात आपल्या जवानांनी प्राणांची पर्वा न करता बाजी मारली खरी, पण स्वावलंबी असण्याची फार मोठी किंमत मोजावी लागलीच ! स्वावलंबी होण्याचा निर्धार करून मग भारताने स्वत:ची "नाविक जीपीएस यंत्रणा " विकसित केली आणि जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
                                                                    
संसार असो वा अध्यात्म माणसाने नेहमी आत्मनिर्भर असावे, स्वावलंबी असावे. "आपला हात जगन्नाथ" ही म्हण बहुधा ह्याच करीता प्रचलित झाली असावी. दुसर्‍यावर अवलंबून राहिल्याने आपल्याला अनेकदा तोंडघशी पडावे लागते, खूप मोठ्या नाचक्कीला कधी सामोरे जावे लागते. म्हणूनच खरा सदगुरु आपल्या शिष्याला, भक्ताला नेहमीच स्वावलंबी होण्याचा , आत्मनिर्भर होण्याचा कित्ता गिरवायला शिकवतो आणि तेही स्वत:च्या आचरणातून !
माणूस कोणतीही गोष्ट समोरच्या माणसाच्या कृतीतून , वागण्यातून पटकन , सहजरीत्या शिकू शकतो, पण तीच गोष्ट वाचून किंवा ऐकून समजणे कठीण बनते. म्हणूनच सदगुरु जेव्हा जेव्हा देहधारी असतात तेव्हा ते आपल्या स्वत:च्या वागण्यातून , चालण्या-बोलण्यातून ,सहज साध्या आचरणातून एखादी शिकवण आपल्या लेकरांच्या गळी सहज उतरविताना दिसतात.
आपल्या महात्मा गांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली आणि आपल्या देशातील बनलेल्या खादी म्हणा सुती म्हणा कपड्यांवर भर देताना पहिल्यांदा स्वत: हातात चरखा घेऊन सूत कातले आणि मग इतरांना त्याचा मंत्र दिला होता असे इतिहास सांगतो.
तसेच आपल्याला आपले सदगुरु स्व आचरणातून शिकवण देतात.
भगवंत कृष्णाने गीतेत सांगितलेल्या "उध्दरेत आत्माना आत्मानं " ह्याचा अर्थ सदगुरुंच्या मार्गदर्शनानुसार स्वत:चा उध्दार स्वत: करावा असाच असावा.
सदगुरु साईनाथ आपल्या स्वत:च्या कृतीतून आपल्या भक्तांना अनेक शिकवणी सहजगत्या शिकवीत, कोणतेही काम ते आधी स्वत: करीत , मग दुसर्‍यांना करायला लावीत. श्रीसाईसच्चरीत ह्या ग्रंथाचे नावच मुळी साईबाबांचे आचरीत आणि त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या भक्तांनी केलेले आचरण आहे असे दर्शविते.
हेमाडपंत ह्या अपौरूषेय ग्रंथातील प्रत्येक अध्यायांतून साईबाबांच्या ह्या लीला सहज सुंदर , सोप्या कृतीतून उलगडून दावतात. अगदी प्रथम अध्यायांत देखिल साईनाथ गहू दळायला स्वत: बसतात आणि स्वावलंबी होण्याचा, आत्मनिर्भर बनण्याचा महान संदेश स्वत:च्या आचरणातून देतात. खरेतर ह्या पहिल्या वहिल्या अध्यायांत एवढे गुपित , बाबांच्या लीलेमागील सखोल अर्थ जाणायला मी य:कश्चित पामर खरेतर समर्थ नव्हतेच. आंतरजालाच्या अजीबो गरीब गारूड्याच्या पोतडीतून अशी दुर्मिळ रत्ने कधी कधी हाती लागतात , सैरसपाटा करताना, तशीच माझी गत झाली.
श्रीसाईसच्चरीतातील साईनाथांच्या अद्भुत शिकवणीचा सखोल अर्थच लेखकाने समोर प्रस्तुत केला आणि समोर सदगुरुंच्या घरचे गारूड  उकलले गेले. उध्द्वा अजब तुझे सरकार !
ह्या सरकारची लीला लई न्यारी बघा . सत्य, प्रेम, आनंदाच्या कृपेच्या अमृताचा एखादा तरी थेंब चाखला तरी जीवन सुमधूर होते..    ह्या गुरुमाऊलीचे रूप न्याहाळायला, त्याचे रसपान करायलाच हवे नाही का बरे?
चला तर मग-
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part38/

Tuesday 19 July 2016

गुरुपौर्णिमा -बापूवीण नाही कुणी रे,बापू नाम हाचि श्वास रे !

हरि ॐ
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । 
तूच बंधू  पिता रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। धृ ।।
गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
गुरुवीण नाही कुणी रे ।  दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची ।
तूच बंधू तू पिता रे ।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरुवीण नाही कुणी रे। दत्त नाम हाचि ध्यास रे ।
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।


किती समर्पक शब्दांत गुरुरायाचे, सदगुरुमाऊलीचे गुणसंकीर्तन मांडले आहे ना? मनीची आर्त, सदगुरु चरणींची ओढ अधिकच दाटून , भावविव्हल करते ती कधीही न शमणारी अनन्य पिपासा ! सदगुरु चरणी सदैव अनन्य शरणागत होण्याची , गुरु हाच श्वास बनण्याची , जीवनयज्ञाची एममेव समिधा !

गुरुपौर्णिमा  म्हटले की आपोआप मनी उमटतो ते अचिंत्यदानी गुरुमाऊलीचे अनंत , अमाप , अगणित प्रेम , प्रेम आणि बस्स फक्त प्रेमच !
गुरुची कृपा हीच गुरुपौर्णिमा हो ।
प्रतिक्षणी आम्हा अनुभव लाहो ।।
गुरुच्या ऋणांचे अखंड स्मरण राहो ।
गुरुमाऊलीच्या ऋणी मी बुडालो।।33।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सद्गुरु श्री अनिरुद्ध ऋणज्ञापक स्त्रोत -डॉ. योगीन्द्रसिंह  जोशी ह्यांचे शब्द काळजाला स्पर्शून जातात.

माणसाचे जीवन हे सुख दु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. परंतु "सुखाचिया काळी जमती आप्त सारे , वेदनेत माझ्या मी एकलाची राही " ही प्रत्येक माणसाची दुखरी , खुपरी बाजू असते. आणि मग अशा असहाय्य, बिकट , एकाकी परिस्थीतीत कुणाचा तरी नि:स्वार्थी प्रेमाचा , मायेचा हात लाभावा , कुणीतरी आपले भेटावे , कुणीतरी माझे दु:ख , माझी वेदना समजून घेणारे , फक्त माझे आणि माझे असावे अशी किमान अपेक्षा प्रत्येकाच्या मनी असतेच आणि अगदी तसाच कोणत्याही लाभेवीण प्रेम करणारा , मला कधीही एकटे न सोडणारा, माझ्या सुखाने आनंदीत होणारा, माझ्या दु:खाने माझ्यापेक्षा अधिक कळवळणारा, कोणत्याही परिस्थितीत मला सदैव साथ देणारा , माझा खराखुरा एकमेव आप्त म्हणजे माझा सदगुरु ! कारण "तो "फक्त माझा आणि माझा आणि माझाच असतो अनंत काळासाठी, अनंत जन्मांसाठी. म्हणूनच संत तुकोबा "त्या" चे वर्णन करताना सदगदीत होऊन म्हणतात - जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , चालविशी हाती धरोनिया । बोलो जाता बरळ करीसी ते नीट मेली लाज धीट झालो देवा । 

गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । तूच बंधू  पिता रे ।।

लहान बाळाचे लालन -पालन , प्रेमाने संगोपन त्याची आईच करते . लहान बाळाचे बोबडे बोल तीच प्रेमाने ऐकून घेते आणि त्याला नीट बोलायला शिकविते. तसे माझा गुरु माझी माऊली, माझी माय बनून मला प्रत्येक पावलावर सांभाळतोच , पण मी चुकीने जरी काही वेडेवाकडे बरळलो , चुकीचे काम केले, वागलो तरी माझ्या अनंत अपराधांना क्षमाच करून मला पोटाशी अत्यंत मायेने कवटाळतो, उरी मला घट्ट धरून ठेवतो. 
हेमाडपंत सदगुरु साईनाथांबद्दल हेच श्रीसाईसच्चरीतात आपल्याला दावतात -
नऊ महीने होताच आई आपल्या बाळाला जन्म देऊन आपली नाळ तोडते पण ही गुरुमाऊली मात्र आपल्या बालकास , आपल्या लेकरास सदैव आपल्या पोटातच म्हणजेच तिच्या गर्भगृहातच सांभाळून ठेवते आणि बाळाने कितीही हट्ट केला , वेडेपणा केला तरी देखिल आपली गर्भनाळ कधीही तुटून देतच नाही मुळी. म्हणूनच ती आणि फक्त तीच ग्वाही देऊ शकते "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " किंवा "मी तुला कधीच टाकणार नाही."  
आपला जन्मदाता , आपला पिता हा आपल्या देहाला जन्म देण्यास कारणीभूत असतो , परंतु  त्या नाशिवंत देहापाठी मरण हे लागलेलेच असते, जे कुणालाच चकवता वा टाळता येत नाही. 
परंतु सदगुरु हा एकमेव असा अद्वितीय पिता आहे की जो जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून आपल्या लेकराला निर्दाळू शकतो, पैल तीरावर नेऊ शकतो सुखनैव ! 
हे सामर्थ्य "त्या " एकाचेच , कारण असे जगावेगळे कनवाळूपण "त्या"चे च असू शकते. 
संसाराच्या त्रिविध तापांनी तापलेल्या , दमलेल्या जीवाला सदगुरु माऊलीच सावली देते . आत्महत्येसारख्या अक्षम्य वातेवरून परत माघारी फिरविते मग ती कधी स्वामी समर्थ रूपाने वामनबुवा बडोदेकरांना बडोद्याच्या सुरसागरात जलसमाधी घेण्यासाठी भर रात्री धावून जाते, तर कधी विहीरीत जीव द्यायला तयार झालेल्या गोपाळ नारायणआंबडेकरांना वाचवायला सगुण खानावळवाल्याच्या रूपाने साईबाबा बनून धाव घेते. 
मग तो जीव मानवयोनीतच असायला पाहिजे असेही नाही , मागील जन्मातील ऋण-वैर-हत्या ह्या सूडाच्या दुष्टचक्रातून न सुटलेल्या आणि पुनश्च: शेळी बनून जन्मलेल्या क्लांत जीवाला दोन शेरभर डाळ चारण्यासाठी धाव घेणारी साईमाय बनते, तर कधी दुर्धर व्याधीनने पछाडलेल्या ,साखळदंडानी जोखडलेल्या , मृत्यूच्या अंतिम घटका मोजणार्‍या वाघाला संतदृष्टीपुढे मरण देऊन  मुक्ती देते. 

गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
कसायाच्या हातून आपल्या वासराला वाचविण्यासाठी जशी गाय त्या तान्हुल्यावर आपले स्वत:चे शरीर कवच बनवून पसरविते स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, अगदी त्याही पेक्षा अधिक कनवळ्याने गुरू ही आपल्या लेकरांसाठी धाव घेते व प्राणांचे रक्षण करते. 
स्वामी समर्थ अक्कलकोटला निवास करत असताना त्यांचा एक भक्त लक्ष्मण कोळी हा समुद्रांत भीषण तुफान वारा, पाऊस ह्यांत फसला होता आणि स्वामींचा सतत धावा करीत असताना दयाघन स्वामी ओळंबले आणि लक्ष्मण कोळ्याला त्यांनी बुडत्या नांवेतून वाचविले आणि जीवनदान दिले अशी कथा स्वामींच्या बखरीत आढळते. 
हरीभाऊंना स्वामी समर्थांनी स्वमुखाने जेव्हा सांगितले "तू माझा सुत आहेस" व स्वत:च्या पादुका दिल्या तेव्हा स्वामीसुतांची भावना - चकोर मी होतां , देवा तू चांदणे अशीच झाली असावी. 
कारण साक्षात परब्रम्ह श्रीकृष्ण स्वमुखे ग्वाही देतात उध्दवाला की 
 "सदगुरु तोचि माझी मूर्ती " । कृष्ण बोले उध्दवाप्रती । 
ऐसा सदगुरु भजावा प्रीती । अनन्य  भक्ति या नाव ।। ५ ।। ( श्रीसाईसच्चरित , अध्याय २५ )     
शिरडीत अस्मानी पावसाचे संकट उभे ठाकले आणि सारा गाव आता वाहून जातो असी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली तेव्हा सर्व गुरे-ढोरे, भणंग-भिकारी, शिरडीवासी ह्यांना साईनाथांच्या द्वारकामाईतच निवारा लाभला होता. सदगुरुचे चरण हाच अखिल जगतातील एकमेव शाश्वत निवारा आणि सदगुरुची कासवीची दृष्टी हीच पैलतीराहून राहूनही आपल्या बाळकाला चारा पुरविणारी , शांती ,तृप्ती, समाधान देणारी  करूणामयी दृष्टी - समस्त कृपेचा चारा !
गुरु हा माझा श्वास रे ।।
चोळाप्पाच्या मुलास कृष्णाप्पा महामारीचा उपद्रव होऊन अंत झाला आणि घरची सर्व मंडळी आक्रोश करू लागली असतां करूणार्णव , कृपासिंधु स्वामी समर्थांनी " अरे नीळकंठा , ऊठ, ऊठ ! आमच्याबरोबर दोन शब्द बोल.  " म्हणून हांक मारू लागतांच  , श्रींचे अमृततुल्य वचन ऐकतांच कृष्णाप्पा डोळे उघडून पाहू लागला व उठून बसला होता.
मुंबईच्या पितळे नावाच्या गृहस्थाच्या लहानग्या मुलास साईबाबांच्या दर्शनास शिरडीला नेले असतां तो कुमार साईंची दृष्टादृष्ट होतांच दोळे फिरवून अवचिता बेशुध्द होऊन पडला व त्याच्या तोंडातून भरपूर फेस जाऊन , सर्वांगास घाम फुटला आ णि त्याच्या जीविताची आंस सरली असतां, केवळ साईबाबांनी आश्वासन देतां - "मुलास घेऊनि जा बिर्‍हाडी । आणीक एक भरतां घडी  ।सजीव होईल तयाची कुडी । उगीच तांतडी करूं नका " ।। आणि मग त्या कुमार मुलास वाड्यांत नेतांच तो तात्काळ शुध्दीवर आला व माता-पित्यांचा घोर फिटला.
गुरु हा माझा श्वास रे ।। ह्याची जिवंत अनूभूती !         

गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
थकल्या भागल्या पांथस्थांना, वाटकरूंना जसे रस्त्यावरील वृक्ष आपल्या शीतल छायेत निवारा देतात, त्यांच्या श्रमाचा परिहार करतात, तसेच सदगुरु आपल्या संसाररूपी भवसागरात गंटागळ्या खाणार्‍या जीवाला चैतन्य देतात, नव-संजीवनी देतात . 
बाळाप्पा हा स्वामींचे श्रीचरणी शरण जाण्याआधी व्यापार धंदा करीत असताना. तीन वर्षे आधी त्याच्या  व्यापारातील भरभराटीमुळे एका द्वेष्ट्याने त्याला कानवल्यातून विष खाऊ घातले होते. एकदा अचानक बाळप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागला व तो फार आजारी झाला होता. तेव्हा स्वामी कृपेने एकदा फारच रक्त वाहू लागले आणि कांही वेळाने त्यातून एक कागदाची पुडी निघाली , ज्यात कांही काळा पदार्थ होता. त्यानंतर रक्तस्त्राव थांबून बाळाप्पास आराम झाला. " ही सारी स्वामी समर्थांच्या नावाचीच छाया होती असे आढळते. 
गुरुचें नाम मायेच्या पसार्‍यातून भक्ताला बाह्य जगतात तारून नेते. 
श्रीसदगुरु नाम पवित्र । हेंचि आमुचे वेद्शास्त्र । ’साईसमर्थ’ आमुचा मंत्र । यंत्रतंत्रही तें एक ।। ६२ ।। 
                                                                                                       - ( श्रीसाईसच्चरित , अध्याय १ )
गुरु नाम घेता , अनेक भागोजी शिंदे ( साईबाबांचा एक सेवेकरी भक्त ), ठाकूरदासबुवा (श्वेतकुष्ठ झाला असता स्वामी समर्थांछ्या कृपेने व्याधीमुक्त झाला)  सारख्या कुष्ठ्यांचे कोड दूर झाले ,महामारीसारख्या जीवघेण्या व्याधीतून मुक्तता लाभली , कोणाअंधाला नेत्रप्राप्ती झाली, तर कोणाचा पोटशूळ गेला. 
म्हणजेच सदगुरुचे नाम अत्यंत पुण्यप्रद, पावन असते जेणे भक्तांची काया शुध्द होते , हे १०८ % निर्विवाद सत्य !

जेव्हा माझ्या जीवनी मी सदगुरुंच्या चरणी शारण्यभाव ठेवतो आणि भक्ती करू लागतो तेव्हा माझ्या जीवनगाण्याला  सुमधुर सूर सदगुरुच प्रदान करतो आणि सुखाचा, आनंदाचा पूरच जणू माझ्या जीवन नदीला व्यापून टाकतो.   

म्हणूनच कोरड्या चरणें भव तरून जाण्यासाठी  मला सदगुरुलाच माझ्या जीवनाचा नाविक करायला हवे , आणि माझ्या जीवनाचे वल्हे त्याच्या हाती बिनधास्त सोपवायला हवे. 
आज माझ्या सदगुरु बापूंना एवढेच सांगावे वाटते - बापूवीण नाही कुणी रे, बापू नाम हाचि श्वास रे ... 
(हे सदगुरुराया  मी फक्त तुझाच आणि तू फक्त माझाच . 
I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER ! ) 
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सदैव तुझ्याच चरणी तुझा एक दास बनून , तुझ्या चरणी बापूज्ञ , अंबज्ञ बनव ! 



आजच्या पुण्यप्रद पावन दिवशी माझ्या जीवनाची नाव अलगद लीलया सांभाळणार्‍या माझ्या सदगुरु श्री अनिरूध्द बापूंच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि हेमाडपंताच्या शब्दांत एकच मागणे -
मी तो केवळ पायांचा दास  नका करू मजला उदास। जोवरी ह्या देही श्वास। निजकार्यासी साधूनि घ्या ।।

हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ.



  

Friday 15 July 2016

विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला

मुख दर्शन व्हावे । आता तू सकल जगाचा त्राता ।।
घे कुशीत या आता । ठेवितो पाऊली माथा ।।
माऊली माऊली ।  पुंडलिका वरदे हारी विठ्ठल ।।

आज आषाढी एकादशी , वारकर्‍यांचा अवर्णनीय आनंदाचा जल्लोष , त्यांच्या विठू माऊलीला भेटण्याची अनिवार ओढ , सर्व सुख-द:खांना पाठीशी टाकून एकमेव लाडक्या प्राणांहून प्रिय अशा सख्याला , जीवीच्या जिवलगाला भेटायसाठी उरी लागलेली अनामिक आर्तता , सदैव अमृतातेही पैजा जिंकी असे अवीट माधुर्याचे रसपान करणारी विठू माऊलीच्या चरणांची पिपासा आणि चंद्रभागेच्या तटी बेधुंद होऊन टाळ, मृदंग , वीणा, झांजाच्या तालावर थिरकणारी पावले ! 

जणू सारी संसाराची बंधने झुगारून , नाती झिडकारून  फक्त "त्या" एकमेव सावळ्या विठ्ठलाची आस उरी बाळगून  "तो " वारकरी वारी करत असतो...
म्हणूनच पंढरपूरच्या वेशीला लागताच , चंद्रभागेत "त्या"च्या प्रेमाने न्हाऊन निघता निघता वारकरी त्याच्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनाने धन्य धन्य होतो , सुखावतो , आंतर्बाह्य ! तेव्हा देहभान हरपलेल्या ह्या जीवाला विठ्ठलाचे दर्शन भले ना होवो देवळात गाभार्‍यात भले न जाता येवो पण त्याच्या जीवनाचे सार्थक होते तो पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराचा कळस पाहूनच !
खेळ मांडीयेला वाळंवटी काठी  नाचती वैष्णव गाती रे  
होतो जयजयकार गर्जत अंबर  मातले हे वैष्णव विरळे 

आणि म्हणूनच संत तुकोबा म्हणतात "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे " 

संत तुकोबा, ज्ञानोबा, मानदेव, एकनाथ, जनाबाई, मीराबाई, कबीर , चोखामेळा , सोयराबाई अशी सारी संताची मांदियाळी एक्मुखाने, एकरवाने गर्जून "विठू माऊली" च्या नामाचा अगाध महिमा, तिच्या भक्तीप्रेमाच्या ऐश्वर्याचा गोडवा गाताना थकत नाही . हा भवसागर विना सायास तरून जाण्यासाठी सोपा एकमेव उपाय म्हणजे "त्या" च्या नामाचा !
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हणून दर्शन न घेताही सुख मानणारा आणि विठ्ठल मंदीराची पायरी ही न शिवू शकणारा (त्या काळच्या स्पृश्य-अस्पृश्य जातीभेदामुळे) तरीही विठूच्या प्रेमाने रंगून गाणारा
उंबरठ्यासी कैसी शिवू आम्ही जातीहीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग  म्हणून विठूला कोणताही दोष न देता उलट त्याचे, त्याच्या प्रेमाचे गोडवेच गाणारा चोखामेळा,
दर्शन घेऊनही विठूची महती न जाणणार्‍या समाजाला विठूच्या रूपाची , त्याच्या सावळ्या रंगाची आणि प्रेमाची महती समजाविणारी सोयराबाई -
अवघा रंग एक झाला  । रंगी रंगला श्रीरंग  ।
एक तत्त्व नाम दृढ धरी  मना   । हरीसी करूणा येईल तुझी  
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद   । वाचेसी सदगद जपे आधी 
 ही शिकवण देणारे तुकोबा,
हरी मुखे म्हणा । हरी मुखे म्हणा  । पुण्याची गणना कोण करी । म्हणून भक्तीच्या  वाटेवर बोट धरून चालविणारी   ज्ञानोबा माऊली अशा संतानी दाविलेल्या वाटेला आपले करणारे असंख्य वारकरी ह्याच "त्या"च्या चरणीच्या अनन्य भावाने शरणागत होऊन पंढरीची वाट दिंडीमधून चालतात अथकपणे, अविरत . अशाच
 बोल एका श्रेष्ठ वारकरी स्त्री भक्ताचे ( द्वारकामाई पाध्ये)  स्वानुभवाचे बोल मनाला स्पर्शून जातात -
 ज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास  । त्यासी कधी ना अपाय  । सदा सुखाचा सहवास  ।



किती निर्मळ मन असते ह्या वारकर्‍यांचे, त्याच्यांसाठी त्यांची विठू माऊली म्हणजे जगातील एकमेव श्रेष्ठ नाते, भलेही संसारात, व्यवहारात आपल्या नातेवाईकांशी संबंध तुटले, दुरावले तरी त्यांना एक मात्र पुरते पक्के ठाऊक असते ते अंतिम सत्य की त्यांची माऊली त्यांना कधीच टाकणार नाही कारण "त्या " सावळ्याच्या प्रेमाने , त्यांच्या मनात एकविध भाव जागवलेला असतो , तोच त्यांना धीर देतो की -
आता नको नाती सारी  त्याचे पायी माझी वारी ।

संताचा हाच भाव , अनन्य शरणागती आपल्या सदगुरुंच्या ठायी ठेवणारा अशीच एक महान विभूती अगदी नजिकच्या काळात होऊन गेली ती म्हणजे श्रीसाईसच्चरीत ह्या महान , अपौरूषेय ग्रंथाचे विरचिते - श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ साईबाबांचे लाडके हेमाडपंत !

आज १५ जुलै ! ८७ वर्षांपूर्वी १५ जुलै १९२९ साली हेमाडपंतांनी श्रीसाईबाबांच्या  चरणी  आपला देह समर्पित केला . आज ज्यांच्यामुळे परमार्थाची वाट गवसली, माझ्या जीवनाला सदगुरुंचा परीस स्पर्श लाधला त्या माझ्या अत्यंत लाडक्या हेमाडपंताची म्हणजेच श्रीसाईसच्चरितकार श्री.गोविंद रघुनाथ दाभोलकर उर्फ अण्णासाहेब ह्यांची पुण्यतिथी. त्यानिमित हेमाडपंताचे  पुण्यस्मरण करताना आजच्या दिवसाच्या योगायोगाचे नवल दाटले मनी ! 

संत जनाबाईसवे विठ्ठल दळ्ण दळू लागे अशा कथा लहानपणी आजीकडून ऐकल्या होत्या , तेव्हापासून विठ्ठल तर साक्षात देवबाप्पा ! मग तो कसा आपल्या भक्तासाठी धावून येतो आणि कसे त्याच्या कामात त्याला हातभार लावतो ह्याबद्दल अपार कौतुक मनात दाटले होते . कसा दिअसत असेल बरे हा पंढरीचा पाटील  ! हा तर वैकुंठाचा स्वामी , त्रिभुवनाचा जगजेठी , हा कसे बरे काम करेल , असे नानापरीचे कुतुहल मनात दाटे.

त्या सगळ्या गोष्टींचे साक्षात प्रत्यंतर मिळाले श्रीसाईसच्चरीत वाचताना ! हेमाडपंताच्या समर्थ , सदगुरुंच्या प्रेमाने आकंठ डुंबलेल्या लेखणीतून ! आपल्या सदगुरुची प्रत्येक गोष्ट, मग भले त्याचे हसणे, त्याचे बोलणे, त्याचे रागावणे, त्याचे चालणे ह्याचा आनंद कसा लुटाय़चा ह्याचे साग्रसंगीत रसाळ , मधुर अमृत पदोपदी चाखायला मिळतेच .

माझा सदगुरुचे चरण हेच माझ्यासाठी काशी, पंढरपूर , प्रयाग ! सर्व तीर्थक्षेत्रे माझ्या सदगुरु साईबाबांच्या चरणीच वास करतात हा अत्यंत सुंदर भक्तीचा अनन्य शरणागताचा भाव हेमाडपंताच्या प्रत्येक शब्दांतून अव्याहतपणे पाझरत राहतो. माझा गणपती तूच, , माझी सरस्वती तूच, माझा विठ्ठल ही तूच , माझा शंकरही तूच  ह्या अनन्य भावाला न्याहाळताना समोर त्या त्या देवतेचे आपसूक दर्शन सदगुरुंच्याच ठायी न घडले तरच नवल !

अशा हेमाडपंतांनी माझ्या साईनाथाने, माझ्या साईबाबाने गहू दळले कसे आणि त्या गव्हाच्या पिठातून चक्क शिरडी गावावर ओढावलेले महामारीचे संकटाचे कसे निरसन केले ह्याचे अगदी श्रीसाईसच्चरीताच्या पहिल्याच अध्यायात रसरशीत वर्णन केले आहे. मानवी पातळीवर अशक्य वाटणार्‍या गोष्टी सुध्दा माझे सदगुरु त्यांच्या  भक्तांवरील अथांग प्रेमापोटी कशा सहज लीलांद्वारे घडवून आणत व शक्यात उतरवीत ह्याची अल्पशी ओळख माझ्या सुमार बुध्दीला "त्या" घननीळ साईबाबांच्याच भक्तीने झाली होती .

तरी देखिल ह्या श्रीसाईनाथांच्या अगम्य लीलेत अजूनही अशा अगणित गोष्टींचे भांडार दडलेले असेल ह्याची पुसटशी जाणीव सुध्दा नव्हती कारण "त्या"च्या प्रेमाला पिण्याइतकी तहान लागली नव्हती, मनी ती आस, ती तृषा, ती पिपासा दाटली नव्हती. पण आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या पुण्यप्रद पावन दिवशी "त्या " विठ्ठलाचे आपणही वारकरी व्हावे असा भाव मनी तीव्रतेने दाटला आणि "त्या" सावळ्याच्याच प्रेमाने,  "त्या" च्या चरणी नि:शंक मनाचे, नि:संशयी प्रेमाचे, अनन्य नाते कसे स्थापयाचे , त्याला कसे न्याहाळायचे ह्याची अमूल्य शिकवण देणारा एक लेख वाचनात आला.

माझ्या साईबाबांची प्रत्येक कृती ही कृपाच असते.कृपा म्हणजे कृतीला , क्रियेला पूर्णत्व देणारी !
माझा साईबाबा हा अनन्य प्रेमाचा , कृपेचा सागर आहेच मुळी - "कृपासिंधु"
पण माझी ती कृपा स्विकारण्याची तयारी हवी , मला त्या दृष्टीने त्याला न्याहाळता आले तर हा अगणित मोलाचा अमृतकुंभ मला गवसेल.

आपल्याला वाटेल साधे गव्हाचे दळण तर साईबाबांनी दळले , त्याचे काय एवढे कौतुक आणि त्यातून काय शिकायचे ? पण हेच जाणून घेण्यासाठी मला जो लेख अत्यंत लाख मोलाचा वाटला तो तुम्ही पण वाचून पहाच एकदा!

रोजच्या जीवनात असंख्य गोष्टी करण्याचे , एखादे कार्य करण्याचे आपण ठरवितो, त्यासाठी लागणार्‍या अनेक गोष्टींची जमवाजमव करतो तरी कधी कधी आपले कार्य नीट पार पडत नाही किंवा आपल्या गोष्टीला अपेक्षित यश मिळत नाही  वा अपेक्षित फळ मिळत नाही आणि आपण दुं:खी होतो, निराश होतो, उदास होतो. हा सर्व दुष्ट चक्रातून सुटायला मला जाणून घ्यायला हवे ते कोणत्याही कार्याच्या खर्‍या यशाचे गमक ! त्यातील बारकावे जे स्वत: माझा साईनाथ स्वत: कृतीतून मला शिकविण्यास सदातुर आहे , पण मीच करंटेपणाने त्याची उपेक्षा करतो, त्याच्या कडे दुर्लक्ष करतो आणि मग माझी झोळी फाटकी, मी कमनशिबी, मी  दुर्दैवी असे स्वत:ला दूषणे देत बसतो, त्यापेक्षा एकदा आपण फक्त थोडा वेळ काढून हा लेख वाचल्यास मला माझ्या कृतीला पूर्णत्व देणारा एकमेव रामबाण उपाय सापडेल- अगदी १०८ % सत्य !
आणि आनंदही गवसेल -
" विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला " म्हणजे नक्की काय असते ह्याचा जिवंत अनुभव !

श्रीसाईसच्चरीतात गवळीबुवांची कथा हेच आपल्याला शिकविते . "त्या" एकाच्या चरणी अनन्य भाव ! पंढरीचे वारी करणारे , आठ महीने पंढरीत आणि चार महीने गंगातटावर निवास करणारे ९५ वर्षांचे गवळीबुवा शिरडीत साईनाथांना न चुकता दरवर्षी भेटायला येत आणि त्यांच्या दर्शनाने पावन होऊन स्वत:ला धन्य धन्य मानीत आणि उद्गारत -
हाच तो  मूर्त पंढरीनाथ ।  अनाथनाथ दयाळ । 
धोत्रें नेसूनि रेशीमकानी ।  होतील काय संत कोणी ।   करूं लागती हाडांचे मणी  । रक्ताचें पाणी निजकष्टें । 
फुकाचा काय होईल देव  ।  हाचि हो प्रत्यक्ष पंढरीराव  । जग वेडें रे वेडें हा दृढ भाव ।  ठेवूनि देव लक्षावा ।। 

कारण पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील गवळीबुवांना भेटायला शिरडीतही साईबाबांच्या ठायी प्रकटत असे, मला असा विठ्ठ्ल भेटावा म्हणून आस लागली असेल तर "त्या" एकाला मला माझ्या सदगुरु साईबाबां मध्ये सुध्दा दर्शन घडते कारण मी त्याला भेटायला जितका तळमळतो , आतुरतो त्याच्या कैक अनंत पटींनी "तो" मला भेटायला धाव घेतो .मी एक पाऊल त्याच्या दिशेने टाकतो तेव्हा तो बाकीची ९९ पाऊले स्वत:च चालत नव्हे तर धावत येतो आणि मला कडेवर घेतो...

चला तर भेटू या आजच विठू माऊलीला आणि दळण दळताना आपण त्याच्या प्रेमाची , भक्तीची गीते गाऊ या हा लेख वाचून -
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/shree-sai-satcharitra-adhyay1-part36/

Wednesday 6 July 2016

ऑपरेशन जल- राहत


आज पहिल्यांदा टेलिव्हीजन वरील बातमी पाहून आपला भारत देश आपत्ती निवारणासाठी उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना पाहून उर अभिमानाने भरून आला. तसा आपला भारत देश हा सतत दुष्काळ, पूर ह्या नैसर्गिक आपत्तींचे तडाखे सोसत असतो. परंतु तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापराच्या अभावी मदत आणि बचाव कार्य पार पडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे आणि परिणामी होणारी मनुष्यहानी, वित्तहानी ह्यांची आकडेवारी मनाला चटका लावून जात असे.   
     
आपल्या भारत देशात पूराच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व मदत आणि बचाव कार्य   प्रभावीपणे पार पाडण्याकरीता प्रथमच भूदल , नौदल , वायुदल , अशा तीन्ही सेना  आणि एनडीआरएफ़ आणि एसडीआरएफ़ ह्या संस्था सुसंघटीत झाल्या आणि "ऑपरेशन जल- राहत " आसाम येथील गुवहाटी येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किनार्‍यावर प्रथम खेपेस  यशस्वी रीत्या पार पाडण्यात आले. ह्या मागे अर्थातच आपल्या पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

वास्तविक पहाता डिसेंबर २०१५ मध्ये कंबाइंड कमांडर कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांनी आपत्ती निवारणाचे मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी तीन सेनांनी सुसंघटीत होऊन  एकत्रित प्रयास करावे ह्या विषयी सूतोवाच केले होते. त्यावेळी पंतप्रधानानी भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीन सेना आणि बाकी इतर एंजसींनी आपापसात सुसूत्रीकरण करून मदत आणि बचाव कार्याचे आयोजन करावे ह्यावर अधिक भर दिला होता. पूरामुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना झळ पोहचते आणि त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास आणि सराव आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदतीचा हात देऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात  आला होता. सेनेच्या हार्न डिव्हीजनचे मेजर जनरल राजीव सिरोही ह्यांच्या मते "ऑपरेशन जल राहत " मध्ये तीन सेनांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.ह्या ऑपरेशन दरम्यान चिता हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर त्याच बरोबरीने भारतीय वायुसेनेच्या "एम आई १७ : हेलिकॉप्टरच्या वापराने पूराच्या प्रभावाखाली असलेल्या पोहचण्यास  दुर्गम अशा  भागात जाऊन वैद्यकीय मदत देऊन सुटका करणे, बचाव करणे शक्य झाले आणि सोबत बचाव पुरवठा साहित्य पोहचविणे सुध्दा सुकर झाले. ह्या संपूर्ण बचाव कार्यात तीन सेनांबरोबर एनडीआरएफच्या तीन युनिट आणि आसाम   एसडीआरएफच्या टीमही सहभागी झाल्या आहेत. 

अशा प्रकारच्या सरावाने आपण नक्कीच निसर्गाच्या प्रकोपाला सुसंघटीतपणे ,सशक्त सबल होऊन सामोरे जाऊ शकतो ह्याची अनूभूती मिळाली आहे.  

मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे पार पाडण्यात आले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=jisouq7iaiI


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog