७ जानेवारी २०१६च्या दैनिक प्रत्यक्षमधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी ! आणि जगात खळबळ उडविणार्या ह्या बातमीने हायड्रोजन बॉम्ब हा एवढा संहारक, अणु बॉम्बपेक्षा महाविनाशकारी का बरे मानला जात असावा ह्याची मनात अपार उत्सुकता दाटली.
उत्तर कोरियाने बुधवारी ६ जानेवारी २०१६ रोजी तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता अणुचाचणी केंद्रानजीक अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने, आंतरराष्ट्रीय सर्वच स्तरांवर प्रचंड खळबळ माजली आहे. ह्या चाचणीने उत्तर कोरियातील भूकंप केंद्राने ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे.
जागतिक शांतता धोक्यात आणल्यावरून उत्तर कोरिया हा फक्त जागतिक टीकेचा विषय बनला नसून त्याला आणखी कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी उत्तर कोरियाने २००६ , २००९ आणि २०१३ मध्ये अणु चाचणी घेतली होती.
हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अधिक प्रमाणात संहार करण्याची क्षमता असलेला मानला जातो. उत्तर कोरियाने आपले आण्विक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल सर्व जगाला चिंता व्यक्त करण्यास का भाग पाडत आहे ? ह्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करताना काही माहिती मिळाली ती देण्याचा हा प्रपंच !!
आता आपल्याला साहजिकच असे वाटू शकते की आपल्या सारख्या सामान्य माणसाला काय करायचे हे हायड्रोजन बॉम्ब किंवा अणु बॉम्ब असे सगळे समजून घेऊन ? आणि दुसरे म्हणजे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे मग आम्हाला कशाला चिंता ?
"तिसरे महायुध्द" हे डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांचे पुस्तक वाचनात आले आणि लक्षात आले की आपला हा विचार किती चुकीचा असू शकतो. ह्या पुस्तकात आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती करून देताना डॉक्टर जोशी म्हणतात माहिती करून घेणे ह्याचा उपयोग नक्कीच आहे कारण अज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम टाळू शकते.




