Saturday 30 April 2016

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे- आधुनिक युध्दातील वाढता प्रभाव !


दैनिक प्रत्यक्षमधील  हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी  लागोपाठ आलेल्या दोन बातम्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यातील पहिली बातमी होती - रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्रासह ’हायपरसोनिक’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि त्या पाठोपाठ दुसरी बातमी होती - की रशिया नंतर  लगेच दुसर्‍या दिवशी चीनने एका तासात अकरा हजार किलोमीटर अंतर पार करू शकणार्‍या त्यांच्या ’डीएफ -झेडएफ’ (DF-ZF) ह्या अणवस्त्रवाहू हायपरसोनिक क्षेपणास्त्राची सातवी यशस्वी चाचणी घेतली. ह्या दोन्ही बाताम्यांनी सर्वत्र मोठी चर्चेची झोड उठवून दिली. काही विश्लेषकांच्या मते ह्या दोन्ही हायपरसोनिक क्षेपणांस्त्रांच्या यशस्वी चाचण्या रशिया, चीन आणि अमेरीकेमध्ये हायपरसोनिक शस्त्रांत्रांबाबत सुरु असलेली स्पर्धा दर्शवित आहे.  


या बातम्यांच्या अनुषंगाने क्षेपणास्त्र , आधुनिक युध्दातील त्यांचे वाढते वर्चस्व याबाबत कुतुहल चाळवले गेले आणि सध्याच्या काळातील ह्या आधुनिक शस्त्रात्रांचा वाढता प्रभाव , तिसर्‍या महायुध्दाचे पडघम वाजू लागल्याचे वारंवार दिले जाणारे संकेत, सार्‍या जगाला ग्रासून टाकणारी एक अनामिक भीती, बद्दल जे वाचनातून जाणवले ते मांडण्याचा हा प्रयास- 

’क्षेपणास्त्र ’ म्हणजे मिसाईल ( missile) . क्षेपणास्त्र हा शब्द तसा आजकाल वारंवार कानावर पडत असतो . परंतु आपण सामान्य माणसे ह्या युध्दाच्या गोष्टी जाणून आपल्याला काय करायचे आहे अशा काहीशा तटस्थ भूमिकेमुळे क्षेपणास्त्रे म्हणजे नक्की काय असते , खरेच त्यांचा एवढा प्रभाव भयावह आहे का? आणि असल्यास का ह्याची उत्तरे शोधण्याचा ना प्रयास करत , ना आपली जिज्ञासा दाटून येत असे बहुतांशी कमी-अधिक फरकाने चित्र आढळते. 

पूर्वीच्या काळापासून युध्द हे फक्त देशाच्या सीमेवर दोन वा अधिक देशांच्या सैनिकांमध्ये लढले जाते असे चित्र आढळत असे. पण  ह्या विचारसरणीला तडा गेला जेव्हा ४ डिसेंबर २००६ साली डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांनी लिहिलेले " तिसरे महायुध्द" वाचनात आले आणि डोळे खाडकन उघडले. सध्याची युध्द ही फक्त सीमांपुरतीच मर्यादीत राहिली नसून त्या देशातील शहरांतील, गावांतील नागरीकांपर्यंत आणि  थेट घराघरांमध्ये ह्यांची व्याप्ती पोहचलेली आहे असे प्रकर्षाने आढळले.  त्यामुळे बदलत्या काळाबरोबर पावले न उचल्यास माणसाचा घात हा खूपदा अज्ञानामुळे संभवू शकतो ह्याची जाणीव प्रखरतेने मनाला भिडली. 

"Survival of the fittest" ह्या नियमाला अनुसरून आपण बदलत्या काळाची पावले ओळखून स्वत:ला बदलले नाही तर आपण ह्या काळात तग धरून राहूच शकत नाही  हे ह्या पुस्तकाच्या वाचनाने प्रकर्षाने जाणवले आणि मग दिवसागणिक येऊन धडकणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बातम्यांच्या आधारे आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयास सुरु केला... ज्याला मोलाचा हातभार लावला गेला दैनंदिन आंतरराष्ट्रीय घडामोडींना प्राधान्य देणार्‍या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून !

क्षेपणास्त्रे ही बहुत करून आण्विक अस्त्रे त्याच्या टप्प्यापर्य़त पोहचविण्यास सहाय्य करणारी यंत्रणा असते असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. पहिले महायुध्द झाले , दुसरे महायुध्द झाले आणि तिसरे महायुध्द सुध्दा सुरु झाल्याच्या बातम्य़ा आणि त्याला दुजोरा देणारी वक्तव्ये सध्या वारंवार कानी येतात. आज येऊ घातलेल्या वा सतत दार ठोठावणार्‍या तिसर्‍या महायुध्दाच्या बातम्यांनी ध्यानी येते ते प्रखर वास्तव की पहिल्या दोन महायुध्दांपेक्षा होणारा विध्वंस , जीवीत हानी, वित्त- हानी ही कैक पटींनी वाढणार आहे. आज देशांमध्ये स्वत:चे सामर्थ्य वाढवून केवळ स्वत: अधिक बलशाही होण्याचेच ध्येय उरले नसून , स्वत:च्या देशाच्या सीमा विस्तारण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसते. आज येऊ घातलेल्या तिसर्‍या महायुध्दामध्ये हवेतून बॉम्बफेक करणार्‍या विमानांपेक्षाही ही आंतरराष्ट्रीयच नव्हे तर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अधिक विध्वंस सहज , सोप्या पध्दतीने घडवून आणू शकतात असे निदर्शनास आले. 

’क्रूज मिसाईल’ हे या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आघाडीचे पाऊल ! पहिल्या महायुध्दाच्या वेळी म्हणजे १९१७ साली सर्वात प्रथम ’केटरींग बग’ ह्या शास्त्रज्ञाने ही क्रूज मिसाईल पहिल्यांदा विकसित केली खरी, पण त्याचा युध्दात काही वापर झालाच नाही आणि पहिले महायुध्द संपले. त्यानंतर मात्र  हिटलरच्या नाझी जर्मन सैन्याने दुसर्‍या महायुध्द्दाच्या वेळीस इ.स. १९४४ साली जगात सर्वप्रथम ह्या क्रूज मिसाईलचा वापर केला होता. ह्या पहिल्या क्रूज मिसाईलचे नाव ’व्ही -वन ’ (V-1) होते. ह्या प्राथमिक क्रूज क्षेपणास्त्रांचा टप्पा आणि दिशा अचूक नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यांना फेकणार्‍या मशिनचा प्रचंड मोठा कर्णकर्कश आवाज होत असे आणि त्यामुळे त्यांना ’बझ बॉम्ब ’ (Buzz bomb) असे नाव मिळाले. 

पुढे अमेरीकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्बहल्ल्यामुळे दुसरे महायुध्द संपले खरे, पण दुसर्‍या महायुध्दाच्या अनुभवाने भीतीपोटी म्हणा वा स्वत:च्या सुरक्षेपोटी सावध झालेली राष्ट्रे स्वत:ला अधिकाधिक शस्त्रात्रांनी सुसज्ज , संपन्न आणि बलशाली करण्यासाठी पावले उचलू लागली. अमेरीका व सोविएत युनियन म्हणजेच सध्याचा रशिया ह्या दोन महासत्त्तांनी आण्विक शस्त्रांत्रामध्ये जोरदार प्रगती करून प्रचंड प्रमाणावर आण्विक शस्त्रात्रांचा साठा केला व त्यामुळे ह्या दोन महासत्तांमध्ये शीतयुध्द सुरु झाले आणि त्यामुळे जगभरात अनेक राष्ट्रांनी आपआपले उघड व गुप्त गट तयार केले. ह्या दोन महासत्तांच्या पाठोपाठ जगभरातील  साम्राज्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा‍र्‍या चीनने ह्या आण्विक शस्त्रांत्रांच्या चढाओढीत हिरीरीने सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर आज तर चीनची ही आण्विक क्षमता अमेरीकेला  भयकारक बनून राहिली आहे आणि रशियाला सुध्दा  दखल घेण्यास भाग पाडीत आहे असे चित्र दिसत आहे.

रशियाने २०१३ साली हायपरसोनिक यंत्रणा तसेच क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर भर देण्यात येईल असे संकेत दिले होते आणि त्यानंतर २०१५साली रशियाने आपल्या ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ ची पहिली यशस्वी चाचणी घेतली होती आणि त्यानंतर वर्षभरातच, २३ एप्रिल २०१६ रोजी रशियाने ध्वनीच्या ५ ते १० पट वेग असणार्‍या ’हायपरसोनिक’ यंत्रणेसह प्रगत क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याच्या वृत्ताला रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था ’इंटरफॅक्स’ ने संमती दर्शविली. रशियाने विकसित केलेली ही हायपरसोनिक यंत्रणा लवकरच सध्या रशियात अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यातील दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांवर तैनात करण्यात येईल अशी माहितीही रशियाने दिली .

हायपरसोनिक यंत्रणा वापरताना प्रचंड प्रमाणात उष्णता व दाब निर्माण होतो , ज्यामुळे लक्ष्य करणे ही अत्यंत अवघड आणि कठीण बाब असते. जगात सध्या उपलब्ध असलेल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा अशा प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम नाहीत. अमेरीकेने २०१४ साली हायपरसोनिक यंत्रणेचे परीक्षण केले होते ते अयशस्वी झाले होते. त्यामुळे सध्या परिस्थीतीत अमेरीका मात्र याबाबतीत पिछाडीवर पडला असल्यामुळे अमेरीकेच्या वरीष्ठ संसद सदस्य माईक रॉजर्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  या पार्श्वभूमीवर रशियाची ही चाचणी अमेरीकेसमोर नवे आव्हान असल्याची चिंता अमेरीकी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नसल्याचे लक्षात येते.  

रशियन संरक्षणदलाच्या ’ स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’ ने कझाकस्तान सीमेजवळील ओरेनबर्ग प्रांतातून ’आरएस १८ए’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करताना ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ (Hypersonic Glide Vehicle) वापर केला होता. कमीत कमी ४ ते जास्तीत जास्त ८ हजार मैल प्रति तास वेग असणारे हे हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल अणवस्त्रे तसेच पारंपारीक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. 

गायडेड मिसाईल्स म्हणजे संगणक नियंत्रित क्षेपणास्त्र ! आक्रमण करून येणार्‍या ( शत्रूदेशाच्या ) विमानांच्या ताफ्यावर बचाव करणारं सैन्यदल, ही क्षेपणास्त्र सोडतं. मग त्या विमानांनी क्षेपणास्त्रांना चुकविण्याचा किंवा चकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. ते क्षेपणास्त्र आपल्या संगणकाने ठरवून दिलेल्या लक्ष्यावर जाऊन धडकल्याशिवाय थांबतच नाही.

ध्वनीचा वेग हा सर्वात अधिक आहे असे आपल्याला वाटते. पण आता ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारी ही मिसाईल असतात. 
कोणत्याही गोष्टीचा वेग मोजण्यासाठी त्या गोष्टीचा वेग हा ध्वनीच्या किती पट आहे हे सापेक्षतेने  मोजले जाते त्या एककाला "मॅक" असे म्हणतात . 
MACH NUMBER is defined as a speed ratio, referenced to the speed of sound, i.e 
MACH NUMBER = Velocity of Object / Velocity of Sound (at the given atmospheric conditions)

थोडक्यात एखाद्या वस्तूचा एखाद्या वातावरणातला वेग आणि ध्वनीचा वेग ह्यांचा रेशिओ म्हणजे त्या वस्तूचा मॅक नंबर. 
सुपरसोनिक वेग हा १.२ ते ५ मॅक असतो तर हायपर सोनिक वेग हा ५ ते १० मॅक नंबर एवढा असतो.  

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ५ ते १० मॅक ह्या वेगाने म्हणजेच अंदाजे ३८३६ मैल ते ७६७३ मैल  प्रति ताशी ह्या वेगाने प्रवास करू शकतात. 

आता आपण वेगवेगळ्या देशांनी विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांविषयी थोडक्यात जाणून घेऊ या -

अमेरीकेकडे आणि  ब्रिटनकडे "टॉम हॉक"  पध्द्तीची सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जलद क्षेपणास्त्रे आहेत. भारताचा कटटर हाडवैरी असणारा आणि सदैव शत्रू असणार्‍या पाकितानने ’बाबर ’ मध्यम पल्ल्याची आणि मध्यम क्षमतेची क्रूज क्षेपणास्त्रे तयार केली आहेत जी "टॉम हॉक" पध्द्तीच्या क्षेपणास्त्रांची कमी दर्जाची व छोटी प्रतिकृती मानली जाते. 

आपल्या भारताने विधायक कार्यासाठी अणुतंत्र विकसित करत असतानाच स्वसंरक्षणाची सर्व काळजी घेतलेली आहे. "ब्रम्होस" ही सुपरसोनिक पध्द्तीची क्षेपणास्त्रे रशियाच्या सहकार्याने आपण विकसित केली आहेत.

भारताच्या "मिसाईल मॅन " म्हणून गौरविल्या जाणार्‍या डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांचा हायपर सोनिक मिसाईल बाबतचा दृष्टीकोन: 

८ नोव्हेंबर २०११ ला इंडो-रशियन जॉईंट व्हेंचरच्या अधिपत्याखाली  ब्रम्होस ऍरोस्पेस ह्या कंपनीचे इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स येथे उद्घाटन करताना डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी एक आगळाच दृष्टीकोन भारतीय शास्त्रज्ञांसमोर मांडला होता - आज मॅक २ च्या वेगाचे मिसाईल बनवायला सुमारे २०० करोड एवढा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारच्या मिसाईलची पुन्हा पुन्हा निर्मीती करून अधिक पैसा खर्च करता कामा नये. ह्या सेंटरने  ८ ते १० मॅकचे  re-usable (पुनर्वापर करू शकणारे ) मिसाईल २०२० पर्यंत निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.

ह्यावरून डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी हायपरसोनिक मिसाईल निर्मीती साठी स्विकृती दिली असली तरी त्याचा वापर विधायक कार्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी व्हावा यावर किती भर दिला होता हेच सिध्द होते.


भविष्यात भारत ब्रम्होस-२ ह्या हायपरसोनिक मिसाईलची निर्मीती करण्याच्या वाटेवर प्रगती करीत आहे ज्याचा वेग ७ मॅक असेल आणि ६००० किलोमीटर प्रती-तास वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा ते भेद घेऊ शकेल. परंतु ह्यापेक्षा जास्त दूरच्या अंतराची मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या निर्मीतीमध्ये  भारताला रशियाचे सहकार्य लाभू शकत नाही . रशियाने Missile Technology Control Regime(एमटीसीआर) करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ३०० किमी पेक्षा अधिक मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या विकासासाठी रशिया दुसर्‍या देशांना मदत करू शकत नाही.
थोडक्यात ब्रम्होस -२ ची निर्मीती ही भारताची स्वदेशी निर्मीती असेल असे दिसते.


चीनने ’डीएफ- झेडएफ’ ह्या त्यांच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी कमालीची गुप्तता पाळली होती. तरी देखिल वॉशिंगटन येथील ’फ्री बिकॉन’ ह्यांना त्याचा सुगावा लागलाच होता. पॅंटेगॉनने ' WU-14' सांकेतिक नाव चीनच्या ह्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राला दिले होते , जे आज ’डीएफ- झेडएफ’ ह्या नावाने ओळखले जाते. नोव्हेंबर २३,ऑगस्ट १९,जून ७,२०१५ आणि जानेवारी ९,ऑगस्ट ७, व डिसेंबर २, २०१४ रोजी सहा वेळा चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या पार पाडल्या होत्या आणि आता एप्रिल २०१६ मध्ये पुन्हा एकदा सातवी चाचणी चीनने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. 

ह्यावरून ’हायपरसोनिक क्षेपणास्त्र " यंत्रणांचा आधुनिक युध्दातील वाढता प्रभाव ध्यानात येतो.

संदर्भ -
१. तिसरे महायुध्द - डॉक्टर अनिरुध्द  धैर्यधर जोशी
२. दैनिक प्रत्यक्ष
३.http://www.popularmechanics.com/military/research/a20604/china-successfully-tests-hypersonic-weapon-system/
४.https://www.quora.com/What-is-the-difference-between-hypersonic-supersonic-and-cruise-missiles
५. http://freebeacon.com/national-security/russia-tests-hypersonic-glide-vehicle/
६.http://www.realcleardefense.com/2016/04/23/russia_tests_hypersonic_glide_vehicle_on_icbm_281305.html


Saturday 2 April 2016

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज?

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज? हा विषय वाचून चक्रावून गेला असाल नाही का? आपण नेहमी Business Management (व्यापाराचे व्य्वस्थापन ), Finance Management, (आर्थिक व्यवस्थापन), Disaster Management (आपत्ती व्यवस्थापन) ह्या बाबतीत बहुतांश प्रमाणात वाचतो आणि हे विषय आपल्या थोडया-फार प्रमाणात परिचयाचे असतात, परंतु आजकाल घन कचरा व्यवस्थापनाची चिंता मोठ-मोठ्या शहरांनाच नव्हे तर सर्व जगालाच भेडसावू लागली आहे. त्यामुळे ह्या घन कचर्‍याचे व्यवथापन करणे ही काळाची नितांत गरज होऊन बसली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


नुकत्याच मुंबईच्या देवनार कचरा डेपोमध्ये एका पाठोपाठ एक लागलेल्या भीषण आगी आणि त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात उडालेला धुराचा उद्रेक, आरोग्याच्या दृष्टीने उद्भवलेला भयानक जीवघेणा परिणाम हे एक जिवंत उदाहरण ह्या घन कचरा व्यवस्थापनाची गरज दाखवून देण्यास पुरेसे आहे असे वाटते. 

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे आरोग्यास घातक अशा मिथेन वायूच्या विळख्यात सापडल्यामुळे भोवतालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले , श्वसनाच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करावे लागले, वातावरणातही धुराचे साम्राज्यच पसरले असल्याने हवेच्या प्रदूषणाची समस्या अजूनच बिकट बनली, आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने पाण्याच्या तुटवड्यात आणखीनच भर पडली. ह्या वरून घन कचर्‍याचे व्यवस्थापन उचित प्रकारे न झाल्यास किती  भयंकर दुष्परिणामांना तोंड दयावे लागू शकते ह्याची जणू झलकच बघायला मिळाली. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरूप धारण करीत असताना आग विझवण्यासाठी १४.४ लक्ष लिटर्स वापरावे लागलेले पाणी हे पाण्याचा अनाठायी वापरच दाखविते. म्हणतात ना ’दुष्काळात तेरावा महिना" तशीच परिस्थिती उभी ठाकते.   

आता जाणून घेऊ या घन कचरा म्हणजे नक्की काय?
      घनकचरा म्हणजे माणसाच्या रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निर्माण होणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार मोठी समस्या भेडसावत नव्हती; कारण लोकसंख्या त्यामानाने फार कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता जरी लोकसंख्या भरमसाठ वाढली असल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होत असला तरी जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळे घनकचरा ही एक बिकट समस्या तोंड आ वासून उभी ठाकत असल्याचे चित्रच सर्वत्र दिसते. 

घनकचरा वाढण्या मागची संभाव्य कारणे - 
पूर्वीच्या काळी प्लास्टीकचा वापर हा खूपच कमी प्रमाणावर होत असे. भाजीपाला, धान्य, किराणा सामान, जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी सामान्यत: लोक कापडी पिशव्यांचा वापर करीत असत. आजकालच्या जमान्यात कापडी पिशव्या जणू ह्द्दपार झाल्या आहे आणि त्याची जागा मनमोहक रंगीत स्वरूपात आकर्षक दिसणार्‍या वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टीकने घेतली आहे. प्लास्टीक ही एक अशी गोष्ट आहे की जी एकदा फॅक्टरीत निर्माण झाली की कमीत कमी ३०० वर्षे ती टिकून राहू शकते. त्यामुळे सहसा नाश न पावणारे प्लास्टीक हे एक घनकचरा वाढविण्यास खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. तसेच घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिकच्या वस्तूंचा सढळ हस्ते होणारा वापर , उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा.  अशा प्रकारे साचत जाणार्‍या या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस फार अवघड होत चालले आहे. घनकचरा वाढल्यामुळे त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. एकट्या मुंबईत गेल्या ५० वर्षात सुमारे १२ दशलक्ष टन इतका घनकचरा साठला असून त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे ही अत्यंत तातडीची बाब बनली आहे असे वाचनात आढळले. तसेच The Ministry of Environment, Forests and Climate Change ह्यांच्या माहितीच्या आधारे जवळपास १७ लाख टन ई-कचरा हा दरवर्षी साधारणत: (प्रतीवर्षी ५% वाढीच्या अंदाजाने) भारतात जमा होऊ शकतो असा अंदाज आहे. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. 

गावामध्ये शेतातील, घरातील कचरा किंवा शहरांमध्ये कचरा उचलण्याची नगरपालिकेची सोय नसलेल्या भागांमध्ये घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. माणसाचे राहणीमान जसे सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे ध्यानात ठेवणे जरूरीचे बनते. आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून शक्य असल्यास काही रोजगार निर्मिती करणे. समाजातील संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही असे वाचनात लक्षात आले.  

घनकचरा व्यवस्थापन
सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर म्हणजेच आपल्या स्वत:च्या राहत्या घरापासून याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला खरी सुरुवात करायची आहे. हे झाले तरच सार्वजनिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे काम सुलभे रीत्या हाताळता येऊ शकते.
यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर-शहर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण करणे, वेगवेगळा केलेला कचरा जमा करून आणणे, त्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वीरीत्या पार पाडता येऊ शकते. 
काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, गावोगावी भरणारे आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा,कॉलेज, हॉटेल, खाणावळी, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करणे जरूरीचे आहे.

न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी अनिरूध्दाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था "गांडुळ खत प्रकल्प" ही योजना राबविण्याबाबत विनामूल्य मार्गदर्शन करून समाजातील घन कचरा व्यवस्थापनाच्या कार्याला मोलाचा हातभार लावताना आढळते. 
घरगुती स्वरूपाचे गांडूळ खत 
VJTI कॉलेज मधील प्रकल्प 
घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन प्रामुख्याने तीन तत्त्वांवर अवलंबून असते असे वाचनांती आढळले - 
१. वापर कमी करणे (Reduce Method)
२. पुनर्वापर (Reuse Method )
३. चक्रीकरण (Recycle Process) पुनर्प्रक्रिया
वापर कमी करणे सध्याचा काळ वापरा व फेका ( Use and throw) अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. पाणी पिण्यासाठी धातूची भांडी ( स्टीलचा ग्लास ), चहासाठी प्लास्टिक कप वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.
पुनर्वापर करावा म्हणजे  त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या,बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.
पुनर्प्रक्रिया उदा. लोखंड भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

मुंबईमध्ये घनकचराव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी " टाटा कन्सलटंसी" ह्या नामांकीत कंपनीला अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची बातमी वाचनात आली. त्याच प्रकारे आधुनिक तंत्राच्या आधारे घनकचरा व्यवथापनच्या कार्याला आयआयटी, बीएआरसी, डीआरडीओ  ह्या मान्यवर संस्थाही आपले अमूल्य योगदान देऊन हातभार लावू शकतात असे वाटते. 

घनकचरा व्यवस्थापन हे संभाव्य  मानवनिर्मित आपतीच्या  व्यवस्थापनाचे एक पाउलं आहे जणू !  
नागरीकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून घनकचरा व्यवस्थापन उचित दिशेने , उचित वेळीच करणे हीच काळाची नितांत गरज आहे,ह्या भूमिकेशी प्रत्येकजण नक्कीच सहमत असेल.      

संदर्भ :
१.http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Government-has-taken-Deonar-fire-very-seriously-Prakash-Javadekar/articleshow/51659970.cms
२.http://www.aniruddhafriend-samirsinh.com/solid-waste-management-crisis-major-challenge-mega-cities/
३.http://indianexpress.com/article/cities/mumbai/deonar-dumping-ground-fire-for-them-rummaging-through-smouldering-yard-not-an-option-but-source-of-livelihood/
४.http://www.hindustantimes.com/mumbai/deonar-fire-under-control-but-toxic-smoke-refuses-to-wane/story-AvpTfIOKxu3i0EeMrmkj3I.html
५. http://www.aniruddhasadm.com/



प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog