Monday 26 February 2018

वीरांगना मेजर कुमुद डोग्राला सलाम ...... दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!

दैनिक प्रत्यक्षच्या १६ फेब्रुवारीच्या अंकात एक बातमी वाचताना काळजात कालवाकालव झाली होती की आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत असलेल्या माजुली बेटावर भारतीय वायूदलाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत  जोरहाट येथील १० विंग एअर फोर्सचे विंग् कमांडर जय पॉल जेम्स आणि विंग कमांडर डी वॅट्स ह्या दोन वैमानिकांचा मृत्यु ओढावला. आसाम मध्ये ह्याच माजुली बेटावर लोक मनोरंजनासाठी , पर्यटनासाठी जातात आणि अशाच जागी ह्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यु ओढावावा ही किती दु:खद घटना आहे. त्या घटनेचे मनातून विचार सरत नाही तोवर ट्विटर ह्या सोशल मिडीयावर जे चित्र दिसले ते पाहून तर काळजाचे पाणी पाणी झाले. 
                                                                      

विंग कमांडर दुष्यंत वॅट्स ह्यांच्या वीरपत्नी मेजर कुमुद डोग्रा ह्या आपल्या शहीद पतीच्या अंतिम संस्कारासाठी ५ दिवसाच्या तान्ह्या मुलीला घेऊन भारतीय सैनिकी गणवेशात हजर झाल्या , तेव्हा प्रत्येकाचे हात ह्या वीरांगनेला सलामी देण्यासाठी उंचावले गेले. पित्याच्या मृत्युची बातमी आली तेव्हा विंग कमांडर डी वॅट्स ह्यांची नवजात कन्या अवघी चार दिवसांची होती. एरव्ही बाळ झाले म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाची व बाळंतिणीची  म्हणजेच त्या तान्ह्या बाळाच्या आईची किती किती काळजी  घेतली जाते , किती कौतुक केले जाते. बाळाच्या आईला आरामाची गरज असते. पण येथे नियतीने क्रूर डाव खेळला होता परंतु ह्या भारतमातेच्या शूर वीरांगनेने ना नियतीपुढे हात टेकले ना काळापुढे मान झुकविली. आपल्या लहानग्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजाच्या सैन्याला आपल्या तलवारीने पाणी पाजून,नामोहरम करणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई शिंदे ह्यांचाच जणू पाऊलावर पाऊल ठेवले होते मेजतर कुमुद डोग्रांनी ! अशा वीरांगनेला प्रसवून भारतमातेची कूस आज नक्की धन्यता मानीत असेल नाही?  

कोणत्याही पत्नीला आप ल्या पतीच्या निधनाची बातमी कळल्यावर आभाळच फाटते जणू, किती मोठा आघात असतो हा, किती मोठा दु:खाचा डोंगरच कोसळला असतो ...पण अशाही प्रसंगी जेव्हा एखादी वीरांगना आपल्या पतीला मानवंदना देण्यासाठी असे असामान्य धैर्य एकवटते आणि गाठते तेव्हा अर्थातच धैर्याची परिसीमाच ओलांडली असते तिने... अशा प्रसंगाला शब्दांत काय वर्णन तरी करणार ?

कवी बा,भ, बोरकर ह्यांच्या कवितेच्या ओळी स्मरतात आणि मानवंदनेसाठी हात नकळतच जोडले जातात हेच तर खरे दिव्यत्व !

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥


आदिमाता महिषासुरमर्दिनी आपल्या दुर्गा स्वरूपाने ह्या वीरांगनेला जणू जीवनाची लढाई खेळण्याची असीम प्रेरणा, शौर्याची देणगी १८ हातांनी बहाल करती झाली आहे जणू !

तिच्या मनोधैर्याला खरोखर मन:पूर्वक अनंतवार मानाची सलामी !!!
अशा वीरांगना जिच्या उदरी जन्म घेतात त्या भारतभूमीचा जयजयकार आसमंतात दुमदुमणारच हे निर्विवाद सत्य!
जय हिंद ! जय भारत !

Friday 16 February 2018

कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर २०१८ - प्रेम-आनंद, भक्ति, सेवेचा एकमेवाद्वितीय त्रिवेणी संगम !!!


कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य  शिबीर हा ग्रामीण भागातील लोकांचे अत्यंत हलाखीचे जीवन, त्यांच्या अत्यंत गंभीर समस्या, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे उद्भवणारे नानाविध आजार ह्याची पुरेपूर जाणीव करुन देणारा एक जिवंत आरसाच आहे वास्तववादी ग्रामीण जीवनाचे अत्यंत विदारक सत्यच प्रत्यक्षात अनुभवायला लावणारा असा हा हदयस्पर्शी अनुभव आहे जो प्रत्येकाने जरुर घ्यावाच. येथे कळते की "ANIRUDDHA'S Institute of Gramvikas" आणि "रामराज्य२०२५" ह्या संकल्पनांमागे माझ्या सदगुरु बापूंचा किती प्रचंड अभ्यास, दूरदर्शीपणा आहे.आम्हा शहरवासीयांना बापूंच्या अकरण कारुण्याने ह्या कशाचीच अंशत: झळ पोहचत नाही. मग आमचा किती प्रखर , अटळ विश्वास "त्या"च्या चरणी असावा ही शिकवण हे शिबीर देते...खरोखरी आपली संस्था ह्या वैद्यकीय शिबीरासाठी किती प्रचंड प्रमाणात शिस्तबद्ध आयोजन करते, वर्षभर स्थानिक सेवाभावी कार्यकर्ते कसे अविरत, अविश्रांत परिश्रम घेतात, अखंड राबतात आणि त्या सर्वाचे कसे यशस्वी फळ बापूकृपेने लाभते ह्याचे पावलोपावली प्रत्यंतर येते... असे हे अखिल भारतातील एकमेवाद्वतीय असेच वैद्यकीय शिबीर असावे असे मला तरी वाटते ज्यात सहभागी होण्याचे महत्भाग्य आणि सुवर्ण संधी मला माझ्या बापूंनी दिली आणि कृतकृत्य केले....

गावातील लोकांच्या समस्या मुळापासून जाणून घेऊन त्यासाठी योजलेल्या पाणी शुद्धीकरणाचे औषध, खाज-खरूज इत्यादी कातडीच्या रोगांवरचे औषध(antisacbies lotion), उवा-लिखांपासून मुक्त होण्यासाठीची फणी, कपडे धुण्याची-भांडी घासावयाची पावडर, आंघोळीचे साबण, नखे कापावयाला नेलकटर ह्यासारख्या अत्यंत छोट्या छोट्या परंतु तितक्याच प्रभावी विवीध उपाय योजना पाहून संस्थेचे कौतुक करावे तितके थोडेच वाटते.खूप मोठ्या प्रमाणावर General OPD, Student OPD, Dental OPD, Homeopathy OPD, ECG, Pathology tests अशा वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा, X- ray, emergecy minor surgery अशा महागड्या सेवा, औषधे, डोळे तपासून चष्म्यांचा नंबर काढून चष्मे पुरविणे अशा सर्वच प्रकारच्या सेवा पाहून अवाक झाले ...दैनंदिन जीवनातील नऊवारी साडी आणि अन्य कपडे, विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश,खेळासाठीचे किकेटचे संच, आणि त्याहीपुढे सर्वात कळस म्हणजे गावांतुन दूरवरून आलेल्या सर्व भक्तांसाठी साक्षात अन्नपूर्णा नंदाईच्या हातून अन्नाचे वाटप!!!

कोल्हापूर वैद्यकीय शिबीर २०१८ ....ज्या क्षणाची मन चातकपक्ष्याप्रमाणे आतुरतेने वाट पहात होते तो भाग्याचा क्षण येऊन ठेपला आणि फोन आला ..मन बुद्धी प्राण सारे एका अनोख्या आनंदाने ओसंडून वाहू लागले..

१९ फेब्रुवारी २००९ च्या प्रवचनात बापूंनी कोल्हापूर वैद्यकीय शिबीराबद्दल सांगितलेले शब्द अन् शब्द ह्यांची जिवंत प्रचिती घेण्या आसुलेले होते आणि गेली २ वर्षे मात्र हे क्षण नुसत्याच वाकुल्या दाखवित होते ....बापूराया रे का रे असा माझ्यावर रुसलास ? अपराध असा माझा काय झाला ? तुम्ही मला बोलवावे आणि पुन्हा पायात कर्तव्याच्या पोलादी शृंखला अशा पडाव्या ...पण माझ्या लाडक्या परम पूज्य सुचितदादांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ह्या वर्षी मात्र बापूरायाच्या असीम कृपेचे अमृत पिण्याची सुवर्ण संधी लाभलीच...अनंत वेळा अंबज्ञ आहे....

३ फेब्रुवारीला श्रीहरिगुरुग्राम येथे  बसेसची व्यवस्था करण्यात आली होती ...ठीक सकाळी ८.०० वाजायच्या आधीच तेथे जाऊन वर्णी लावली... त्यानंतर बसच्या संपूर्ण प्रवासात बापूंच्या अनुभवांचे गुणसंकीर्तन, अभंग, गजर,गाणी ह्याने कधी वेळ भुरकन उडून गेला समजलेच नाही... बापू,आई, दादांच्या प्रेमाची वेगळीच चव चाखायला,अनुभवायला मिळत होती..प्रत्येकजण "मला भेटलेला आणि भावलेला बापू " आपापल्या परीने सांगत होते, अश्रुंच्या भावतरंगाच्या झुल्यावर मन हिंदोळत होते....आणि रात्री आम्ही कोल्हापूरला पोहचलो...बापूरायाचे ज्या प्रेमाने स्वागत व्हावे त्याच प्रेमाने , अगत्याने आपले कोल्हापूरचे श्रद्धावान बंधू- भगिनी आम्हां सर्व मुंबईच्या श्रद्धावानांचे अत्यंत आपुलकीने , प्रेमाने स्वागत करीत होते..प्रवेशदाराजवळ सुंदर रांगोळी..अस्स्ल कोल्हापूरी साज म्हणजे मराठी शान - फेटे घालून स्वागत करणारे स्त्री-पुरुष श्रद्धावान.."अतिथीदेवोs भव " दारी आलेल्या पाहुण्यांचे कसे अगत्यपूर्वक स्वागत करावयाचे ह्या आपल्या संस्कृतीची जणू बापूच उजळणी करवून देत होते ... आणि हेमाडपंताचे बोल मनी स्मरले...
ज्यांचेनि पावलो परमार्थातें तेचि की खरे आप्त भ्राते सोयरे नाहींत तयापरतें ऐसें निजचित्ते मानीं मी ...

अरे आम्ही तर नुसते श्रीसाईसच्चरितात ओव्याच वाचल्या...पण येथे तर कोल्हापूरच्या बापू-परिवाराच्या आचरणांत नव्हे तर नसानसांत ,रक्तात हेच संपूर्णत: भिनलेच होते..ना ओळख ..ना पाळख ...पण हा माझ्या बापूंचा माणूस म्हणजे माझ्या देवाचा ..."त्या"च्या कडून धाडला गेलेला म्हणजेच हाच माझा खरा आप्त .. हेच माझे खरे नातेवाईक ह्याच आस्थेने, आपुलकीने, अकृत्रिम प्रेमाने प्रत्येकजण आवभगत करत होता...सत्संगाला सुरुवात झाली आणि "त्या" एकालाच कसे सर्वस्व वाहायचे, "तो" एकच माझा कसा , "एक विश्वास असावा पुरता... कर्ता हर्ता बापूच ऐसा" ह्याची जिवंत प्रचिती आली.. न करिता सगुणाचे ध्याना भक्तीभाव कदा प्रकटेना क्षणभर वाटले माझ्या देवाचे, माझ्या बाप्पाचे प्रेम किती अफाट, अपार आहे की हे शब्दही कोल्हापूरच्या भक्तांच्या प्रेमापुढे अपवाद ठरावेत...बापूराया तुझ्या "लाभेवीण प्रेमा"चा पान्हा खरेतर ह्यांनीच चाखला, अमृतपान खरे तर ह्यांनीच केले, तेही "प्रत्यक्ष दर्शन न घेता" .....मस्त थंडीत गरमागरम चहाचा आस्वाद चाखून होतो न होतो तोच सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आर्जव करण्यात आले.. लहान लहान मुलांनी गायला सुरुवात केली आणि जणू गंगायमुनाच भेटायला आल्या, बापू प्रेमाने न्हाऊ-माखू घालंण्या ....... एकवारही न भेटलेल्या बापूंना धाडलेला बालसुलभ भावातील सांगावा म्हणा वा निरोपाचे गीत... आणि खरी सेवा कोण करतो ह्याची जाणीव करवून देणारे ...माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई सेवा मानूनि घे आईsssss ......करीतो आम्ही इतुकी सेवा बापूसाठी धावाधाव जळूनी का हो जीभ न जाई ऐसे उच्चारीता शब्द ....बापू करीतो आमुची सेवा .... हे सत्य चोहोबाजूंनी दाटून आले...

एक भक्तीगीत आहे विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला ..त्यात येतात शब्द तुळशीमाळ घालूनी गळा कधी नाही कुटले टाळ पंढरीला चुकुनिया नाही गेले एक वेळ देव्हा‍‍र्‍याचे माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला...विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला ...त्याचेच प्रत्यंतर अनुभवत होते...मला भेटण्या आला बापू ...ह्या त्यांच्या आचरणांतुन ... आता जाणवू लागले ...माझा बापू का भुलतो "त्या" शबरीच्या उष्ट्या बोरांना आणि पारसवीच्या केळ्याच्या सालींना.. बापूराया असा निर्व्याज, निष्पाप,भोळा भक्ती भाव देशील का रे मला... सतत मला हे दे , मला ते दे.. ह्या मागण्यांच्या ओझ्याखाली खर्‍या देवाच्या प्रेमाला न पाहू शकलेल्या माझ्या स्वार्थी मी ची कीव आली..लाज वाटली.. खरे भोळेभाबडे प्रेम करावे तर असे ...उगाच नाही माझे आद्यपिपा मला सांगत पिपा शोधतो शबरीला सोडूनिया अन्नपाणी... Yes आज मला माझ्या बापूंची शबरी, पारसवी असंख्य वेगवेगळ्या रुपांतुन भेटत होत्या..आणि गमक उकलले ...श्याममेघ जीवन देई बापू ह्यासी भुलला म्हणजे... बापूराया.. तुझ्या भक्ती-प्रेमाची ही "सावळाई" माझ्याही जीवनी पुसटता का होईना स्पर्श तरी करून जाऊ दे रे बा अनिरुद्धा "आता तरी" ....सर्व मागणे संपून फक्त "त्या" एकालाच कसे मागायचे, कसे प्यायचे असते ह्याचा पहिला धडाच जणू बापू गिरवून घेत होते...मस्त थंडीत गरमागरम चहाचा आस्वाद चाखून होतो न होतो तोच सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आर्जव करण्यात आले

आता आठवले बापू का म्हणाले "असा मी मारलेला दम जे काय असेल ते पण लक्षात घ्या राजांनो, मनापासून सांगतो,अनेक मंडळी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. मुंबईच्या अनेक मंडळींना वाटतं की आम्हांला घेऊन जा, घेऊन जा. पण खरंच सांगतो की परिस्थिती अशी आहे मुंबईच्या एकाही व्होलेंटियरची तिकडे गरज नाहीये, अगदी खरंच सांगतोय. मंडळी self-sufficient आहेत. मी मंडळी इथून पाठवतो कां? तर माझ्या कोल्हापूरच्या मंडळींची नाळ Head Office शी जुळलेली रहावी म्हणून ! मुंबईच्या लोकांना कष्ट कसे असतात, शारिरीक श्रम, मानसिक श्रम आणि बौद्धिक श्रम हे कळावे म्हणून!

 YES MY DAD , atleast now I realised a little what really YOU want from all of us....and I make my this year resolution that at least now onwards by YOUR grace and blessings I will start to do PRAYAS for that ....now I really understood how to said ALL IS WELL DAD ALL IS WELL in true means .....AMBADNYA MOTTHI AAI , BAPU ... for giving me such lively experiences teaching me , guiding me what MY BAPU really want from me and how to make real complete progress and development of so precious human birth...

आणि खरोखरीची कडाडून भूक आणि तहानही लागली ती ह्या "काय गोड गुरुची शाळा" प्रत्यक्ष अनुभवण्याची ...माझ्या सावळ्याची कधीही न सोडावी वाटणारी शाळा...

अवघी रात्र अशीच तळमण्यात गेली कधी पहाट होते आणि "त्या" पुण्य-पावन करवीर भूमीचे ..माझ्या प्रेमळा नंदाई आणि सुचितदाऊच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या पेंडाखळेच्या भूमीचे दर्शन घेते... आणि तो क्षण आला.. आता ओढ लागली होती देवळातल्या महालक्ष्मीच्या दर्शनाची नाही तर साक्षात सगुण साकार रुपात दर्शन देण्या उभ्या ठाकलेल्या माझ्या महालक्ष्मीची आणि महाशेषाच्या दर्शनाची... मन नाचत होते ..पेंडाखळेच्या पावन भूमीला जायाचे ...जायाचे तेथे माझ्या आईला भेटायचे...माझ्या दाऊला भेटायचे ..माझ्या बापूला प्यायाचे... माझ्या बापूला श्वासात साठवायचे.. डोळ्यांतून न्याहाळायचे... आणि पाऊल ठेवताच ... सुमारे १० एकर एवढ्या भव्य जमीनीवर पसरलेले हे शिबीर ... तरीही जणू काही.. चोपण्यांनी नवथर चोपिली म्हणून जमिन होती ओली.. १३व्या अध्यायातील भीमाजी पाटीलांनी बाबांनी निदर्शीत केल्या स्थळी जाताच अनुभवली ती हीच तर भूमी असावी का बरे?..आणि पुढे तर काय.. तन-मन कृतार्थतेने न्हाऊन गेले..साक्षात दादा आणि आई - दोघेही त्यांच्या अत्यंत लोभस दिलखुलास हास्याने आणि आईच्या मंत्रमुग्ध करणार्‍या,रसाळ,मधाळ शब्दांनी ...

अल्पोपहार घेण्याआधीच पोट आकंठ तुंडूब भरले आणि मग प्रार्थना सुरु झाली... आई, दादांच्या समोर ...मोठ्या आईला, दत्तगुरु बाप्पाला आणि लाडक्या गुरुमाऊलीला बापूरायांला साद घालून ...

मला ग्रुप क्रमांक ८ मधून वाटपाला जायचे होते... टेंपोमध्ये सामान भरावयाची सूचना झाली ,बघता बघता ३  गावांतील सामान "एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" ह्या तत्वाने भरले गेले ... नंदाईचा अत्यंत मुग्ध करणार्‍या स्वरांनी सर्वांना जणू दहा हत्तींचे बळच संचारले होते ....आई व  दादा सर्व श्रद्धावानांना प्रेरणा देत होते  ....एकामागोमाग एक प्रेमळ सूचना ...आई लवकर निघण्याची घाई करीत होती आणि तिचे ते गोजिरवाणे , लोभस रुपडे मनाला भुरळ पाडत होते... कोणाचाच पाय निघायला मागत नव्हता तरी तिच्या प्रेमळ दटावण्याला कानी साठवत ... आई सतत हात हलवून cheer up करीत होती, बाळांनो निघा आता म्हणून लटकेच दटावत होती...आणि अत्यंत प्रेमळ आईच्या ..जग्नमाऊलीच्या वात्सल्याचा पान्हा पित पितच आमचा प्रवास सुरु झाला... कोल्हापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार गाडी मार्गक्रमणा करीत होती... त्यांच्याच मधुर रचना, गजर ह्यांच्या सत्संगात मन आणि तन दोन्ही न्हाऊन निघत होते ....अनुभवत होते..
श्यामल सुंदर हृदयी पळभर शुद्ध जाहली काया देई जीवनछाया...

वरती निळ्या आकाशाची साथ, कानी बापूंचे दुथडीभरून वाहणारे प्रेम आणि आजूबाजूला "त्या"प्रेमाच चिंब भिजविणारा हिरवा निसर्गराज....

ज्या गावात वाटप होते तेथे पोहचलो ...सर्व मुले, तरुण, वयस्क मंडळी डोळे लावून वाटच पहात होते जणू... वाटपाचे एवढे व्यवस्थित आयोजन कोल्हापूरच्या स्थानिक कार्यकत्यांनी केले होते की विस्मयाने नजरा विस्फारल्या गेल्या...आवाक झाले होतो आम्ही सारे.. आणि पटले खरोखरच हे शिबीर Management च्या students साठी एक खूप चांगले workshop आहे...अमुक गावात अमुक घरासाठी अमुक गाठोडं ...जबरदस्त planning and perfect management चे उत्कृष्ट उदाहरण !!!! जमलेली मंडळीही कुठेही अजून किती वेळ थांबायचे , किती उशीर लावता तुम्ही असे कंटाळवाणे सूर न आळवता , खूप छान असा सत्संग करून बापू-आई-दादांचे गोडवे गात होती...त्यात गजर अथवा गाणे कोण घेते हे शोधावे लागत होते...सामान्यत: गजर घेणारा हा पुढे बसतो..येथे तर ते आपला चेहरा दिसू नये म्हणून "त्या"च्या चरणी नजर खिळवून की झुकवूनच जणू काही गात होते... कोणत्याही कामानंतर त्याचे श्रेय स्वत:ला मिळावे म्हनून स्वत:चे नाव न दिसता व्याकूळ होणारी आमच्या स्वार्थी मनाची प्रचंड लाज वाटली..शरमेने मान झुकली....किती ही विनम्रता..किती ही शारण्यता... बापू तुम्ही बोललेले शब्द अन शब्द अनुभवले आणि खर्‍या शारण्याचा अर्थच जणू नव्याने गवसला....दळितां कांडिता गाईन तुज मी भगवंता ...साक्षात सामोरी प्रकटले ...अनुभवले... हेमाडपंताची आठवण झाली ...

त्या शिर्डीच्या बायाही धन्य धन्य त्यांची श्रद्धा अनन्य न्हातां दळितां कांडिता धान्य गाती असामान्य साईंते धन्य धन्य तयांचे प्रेम गीतें गाती अत्युत्तम ऐकतां तयांतील कांही मनास होतसे उपरम मनास ..

खरा भोळाभावच, निरागस , नि:स्वार्थी , निरपेक्ष प्रेमच, पराकोटीचा विश्वासच "त्या"च्या प्रेमाने कवने करु शकतो..त्या भावाला ना जरुरी भासते विद्वतेची ना ज्ञानाची, ना पदवीची, ना मानाची,ना सन्मानाची !!!
                                          
                                                                         
 हेचि दान दे गा बापू ... हेमाड्पंतानी सुतोवाच केलेल्या त्या शिर्डीच्या बायांची कवने कधीही श्रीसाईसच्चरितात मला तरी आजतागायत आढळली नव्हती पण त्यांचा मोह होता भारी आणि आज ती कोल्हापूरच्या बापूंच्या वेड्या बायांच्या रुपात भेटावयास आली....माझा अनिरुद्ध भोळा हाचि सिद्धांत एकला मी अडाण्याचा गोळा तरी सांभाळीतो मजला मायबापा अनिरुद्धा सोडीन न मी तुजला ...हाच भाव होता त्या बायांच्या मनी दाटलेला...आद्यपिपांचा अभंग तोंड्पाठ न करता आचरणांत आणायला शिक ग माझ्या बाळा ..हेच जणू माझा बापू दावीत होता...जणू माझे सुचितदादाच त्यांचेच प्रत्येक खेपेसचे बोल... एकतरी ओवी अनुभवा एक तरी जीवनात उतरवायला शिका हे का सांगतात त्याची हळूवार उकल करून देत होते...

संध्याकाळी बर्‍याच उशिरा वाटप करून परतलो आणि सत्संग अनुभवायला मिळाला खरा ...पण पुन्हा हेच प्रेम ,हीच अपार माया त्यांच्या भोळ्या भाबड्या रचनांमधून जाणवली...नंदाई ,दादा मंत्रमुग्ध होऊन डोलत होते...मातीचा प्रचंड धुरळा... त्यांचा आनंद ...बेभान होऊन भक्ती प्रेमात नाचणे ..सारेच अभूतपूर्व .... सारेच  अविस्मरणीय... नाथासंविध ह्या सदगुरु बापूंनी दिलेल्या मंत्राचा अर्थ, मंत्रमालिनी ह्या आदिमातेच्या अवतारावरील गाणे , बापूंना शिबिराला आणण्यासाठी आईची केलेली आळवणी , मोठ्या आईला गोंधळासाठी केलेलेले आंमत्रण ....एकापेक्षा एक सर्रास ...मंत्रमुग्ध झालो, भारावून गेलो सारेचजण ........
पुन्हा एकवार हेमाड्पंत स्मरले...
ज्यांचेनि लाधलों हा सत्संग सुखावलों मी अंग-प्रत्यंग तयांचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी....
माझ्या देवा खूप खूप दिलेस..अनंत हस्ते देता नंदावर घेशील किती दो कराने... दुबळी माझी झोळी रे अशी अवस्था झाली होती...

तिसर्‍या दिवशी Optometry मध्ये बापूंनी संधी दिली होती..आजवर विरार, पालीच्या वैद्यकीय शिबीरांत सहभागी होता आले होते परंतु कोल्हापूरला सामील होण्याची पहिलीच वेळ होती..येथेही बापूंनी खूप खाऊ दिला... जे जे वाचले ते न कळले मला जे जे आकळले ते न गमले मला हे म्हणायचा वावच मिळाला नाही कारण साक्षात बापूच त्यांचे डोळे तपासवून घेत होता आणि आपसूक नंबरही काढून देत होता... दूर दूरुन आलेल्या त्या जीवांना बापूंच्या ठाय़ी एवढा विश्वास होता की मला माझा बापूच आता बघायला देणारच..असे ना का डोल्यास नी फूल पडलेले (मोतीबिंदूला catract ला तेथे फूल पडणे असे म्हणतात गावाकडे काही लोक) ..काय बी बिघडत नाही..आमचा बापू हाय न्हव ..त्यो लई ग्वाड हाय..त्योच आमसनी हे जग दावल..काय दुर्दम्य आशावाद आणि अपार विश्वास ...का नाही देव बी धावणार सांगा आता तुम्हीच ...उगाच का म्हणतात ...देव दीनाघरी धावला... परंतु खरे सांगू का वास्तव तर हेच जाणवले की मी खरी दीन आहे "त्या"च्या जवळ राहूनही "त्या"च्या प्रेमाला न पाहू शकलेली,"त्या"च्या ठायी ठाम विश्वास न ठेऊ शकणारी "त्या" ला वारंवार पाहूनही न गवसू शकलेली मीच खरी नेत्रहीन आहे...खर्‍या तर ह्या सार्‍याचीच मलाच जास्त, अत्यंत निकडीची जरुरी आहे.....
                                                                         
बापूराया अनंत वेळा अंबज्ञ आहे....अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो ...अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो...अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो... प्रत्येक श्रद्धावानाला कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर २०१८ - प्रेम-आनंद, भक्ति, सेवेचा एकमेवाद्वितीय त्रिवेणी संगम हा अनुभव , ही आयुष्याची अत्यंत दुर्मिळ शिदोरी बापूकृपेने लाभो हीच "त्या"च्या चरणी प्रार्थना...
आद्यपिपांच्याच शब्दांत मागायचे तर ..
सुकले जरी रोप माझे समिधाच व्हाव्या रे तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठे तूच रे....

हे खर्‍या अर्थाने जगता येवो...

अंबज्ञ,अंबज्ञ,अंबज्ञ !!!!
नाथसंविध् ,  नाथसंविध् , नाथसंविध्  !!!

Wednesday 14 February 2018

भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’

काय नाव वाचून दचकलात ना? पहिल्यांदा ही बातमी वाचली तेव्हा मी ही बुचकळ्यातच पडले होते. आपण नेहमी विवीध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले विवीध खाद्य मेळावे ,महोत्सव ह्यांबद्दल  ऐकतो , पाहतो आणि मस्त पैकी तावही मारतो जसे आंबा महोत्सव ,, चिक्कू महोत्सव,  चॉकलेट महोत्सव इत्यादी. पण नुकतीच एका आगळ्या वेगळ्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे आमच्या ऑफीसमध्ये होणार्‍या जनरल नोलेज क्वीझमधील एका प्रश्नाने आणि त्या अनुषंगाने दिलेल्या बातमीने. भारतातील पहिला गारबेज फेस्ट "कचरा महोत्सव २०१८" हा कोणत्या राज्याने आयोजित केला होता? उत्तरामध्ये नाव मिळाले ते छत्तीसगडचे !

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ फेब्रुवारी २०१८च्या अंकात "राष्ट्रगंगेच्या तीरावर" ह्या सदरात "टूर द छत्तीसगड" हा लेख वाचला आणि आवडला देखिल होता. 

जगभरात छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याची नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख आहे आणि ही ओळख पुसून टाकण्यासाठी छत्तीसगड पर्यटन विभागाने कंबर कसली आणि "टूर द छत्तीसगड" म्हणून कार्यक्रम सुरु करून त्या अंतर्गत "सायकल एक्स्पेडिशन " आयोजित केली होती ही बातमी वाचनात आली.  त्या आधी "बेस्ट कॉप " ची बातमी वाचनात आली आणि त्यानंतर  ट्विटर ह्या सोशल मिडीयावर ’भारताचा पहिला ’कचरा महोत्सव २०१८’ हया रायगड डिस्ट्रीक्ट , छत्तीसगड ह्यांच्या ट्विटने छत्तीसगड ची नव्याने ओळख होत असल्याचे ध्यानात आले. छत्तीसगड राज्य असो वा बस्तर जिल्हा हा माओवाद्यांचा जिल्हा वा राज्य असल्याचा जो गैरसमज जगभरात  पसरला होता तो दूर होण्यास नक्कीच मोठा हातभार लागेल असा आशावाद निर्माण झाला आहे. 




रायपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनेने १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत द गारबेज फेस्टीव्हल "कचरा महोत्सव " चे छत्तीसगड मध्ये आयोजन केले होते. म्युनसिपल कॉर्पोरेशनच्यानुसार अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच उत्सव आहे. ह्या गारबेज उत्सवाचा मूळ उद्देश्य जागृती करणे , लोकांना वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषय़ाबाबत मार्गदर्शन करणे आणि गारबेज किंवा कचरा म्हणून संबोधित केल्या गेलेल्या वस्तूंपासून विवीध टेक्निकस वापरून त्याच फेकल्या जाणार्‍या वस्तू पुनश्च नव्याने वापरात  आणता येऊ शकतात ह्याचे प्रायक्षिक करून दाखविणे हा होता. ह्या ३ दिवसीय उत्सवामध्ये व्याख्याने,चर्चा , स्पर्धा आणि सांस्कृतिक प्रयोग आयोजित केले गेले होते. ह्या व्यतिरिक्त कचर्‍याचे (गारबेजचे) प्रभावी रीत्या ,व्यवस्ठित प्रकारे कसे व्यवस्थापन करता येऊ शकते  ह्यां बाबत लोकांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने विवीध प्रकारच्या कार्यशाळांचे ही आयोजन केले गेले होते.ह्या फेस्टीव्हल मध्ये वेस्ट ( टाकाऊ)  मधून युटिलीटी वस्तु कश्या बनविता येतील ह्या संबंधीच्या विवीध प्रकारचे स्टॉल्स देखिल सहभागी करण्यात आले होते. 


स्वच्छतेवर आणि आरोग्यावर शाळेतील मुलांनी लिहिलेल्या कविता, लेख ह्यांचा सुध्द्दा येथे समावेश केला होता. लहान मुले आपल्या वागण्यातून , कृतीतून स्वच्छतेचा संदेश सहजतेने समाजात  पसरविण्यास खूप मोठा हातभार लावतात , त्यामुळे ते खरे (ऍम्बेसेडार )प्रतिनिधी असतात. त्यांनी केलेल्या काही प्रतिकृती खरोखरीच खूप महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाज प्रबोधनाचे कार्यच  जणू करीत होत्या. 
                                        



अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या संकल्पनांचा वापर करून स्वच्छ्ते संबंधी आपण नक्कीच सुंदर उपक्रम राबवून कचरा निर्मूलन करून वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न सोडवू शकतो. 

टीप - " भारताचा पहिला ’कचरा महोत्सव’ " हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १२ फेब्रुवारी  २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता. 

Friday 2 February 2018

ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर - तेलंगणा सरकारचे पाऊल कौतुकास्पद !

ड्रोन हा शब्द आता  नवखा राहिलेला नाही, आबालवृध्द अशा सर्वांच्याच चांगलाच परिचयाचा झाला आहे. सीमेवरील सुरक्षेसाठी, निरीक्षणासाठी, सर्वेक्षणासाठी , टेहाळणीच्या कामासाठी अशी बरीच कामे करण्यासाठी ड्रोन वापरतात असे आपल्या वाचनात येते.                                                                     

आपला भारत देश हा मुळात शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर येथे लोकांचे शेती हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु येत्या काही वर्षांमध्ये कमी उत्पादकता , संसाधनातील संकटे आणि अनिश्चित हवामान (पाऊस) ह्यां सर्वांच्या एकत्रित परिमान स्वरूप शेतीतून मिळणारे उत्पन्न हे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर घटले आहे. पिकांच्या उत्पादनातील घट पाहता पिकांचे उत्पादन, त्यांच्या कापणीच्या वेळा, पिकांच्या होणार्‍या नुकसानाचा ठोकताळा, पिकांच्या विम्याच्या हफ्त्यांची परतफेड ह्या बाबींचा एकत्रित विचारविनिमय होणे अत्यंत निकडीचे आहे असे ध्यानात आले.          

पिकांच्या उत्पादनांचा अंदाज बांधताना  जिरायती शेती, बागायती शेती, खरीप हंगामातील शेती, रब्बी हंगामातील शेती अशी वेगवेगळी पिकांची वर्गवारी करून त्याचा तपशील ठेवावा लागतो. त्यातून शेती खूप मोठ्या भूभागावर (जमिनीवर) पसरली असल्यास पिकांच्या उत्पादनाचा आढावा घेणे ही कठीण काम होऊन बसते. 
                                                                                                                          








भारतात मोसमी वार्‍यांपासून प्रामुख्याने पाऊस पडत असला तरी देखिल पावसाच्या बेभरवशी वागण्याने म्हणा वा लहरी पावसाने खूपदा शेतीचे वारेमाप नुकसान होते. त्या नुकसानाचा अंदाज घेणे हे खूप महत्त्वाचे काम असते. अशा वेळेला ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करता येऊ शकतो ह्यावर विचार केला जाऊ लागला. जर प्रमाणित पध्दतीचा  अवलंब केला तर ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून पिकांच्या उत्पादनाचा व त्याच बरोबरीने नुकसानाचाही अंदाज बांधता येऊ शकतो असे निदर्शनास आले. त्यामुळे तेलंगणा सरकार आपल्या भारत देशामध्ये बहुधा पहिल्यांदाच अशा प्रकारे ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करण्याबाबत नियोजन करत आहे, जेणे करून पिकां बाबतच्या विम्याच्या दाव्यांची (इन्शुअरन्स क्लेमस) जलद गतीने आणि पारदर्शक पध्दतीने  परतफेड करण्यास खूप मोठा हातभार लागेल.  त्यांच्या मते विम्याच्या दाव्यांची परतफेड व विसंगती सुधारण्याकरिता, सर्व भागधारक (स्टेकहोल्डर्स) ह्यांना ही बाब स्विकारार्ह नक्कीच वाटेल. 

सध्या अस्त्तित्वात असलेली पध्दत ही मानवी कामांवर अवलंबून असल्यामुळे पिकांच्या नुकसानाबाबत अंदाज बांधणे हे वेळखाऊ व किचकट पध्दतीचे काम बनते आणि त्यामुळेच विमा परतफेड करण्यास उशीरही लागतो.
  
कृषी (शेतकी) विभागाने  नुकत्याच झालेल्या ह्या रब्बी/यासंगी हंगामात , एका बंगळूर स्थित कंपनीवर ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गावामध्ये प्रायोगिक तत्त्वावर  पिकांच्या नुकसानाचा अंदाज वर्तविण्याचे काम सोपविले आहे , ज्यांनी हे प्रात्यक्षिक विनामूल्य करून देण्याचे मान्य केले आहे. त्या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ," आम्ही रंगारेड्डी तालुक्यातील कंडुकुर मंडलच्या नेडुनुर गावातील २० शेतकर्‍यांच्या मालकीची ६६ एकर शेती ह्या कामासाठी निवडली आहे."  त्याच गावाच्या निवडीबाबत बोलताना त्या अधिकार्‍याने माहिती दिली की एक तर ते गाव शहराच्या जवल आहे आणि दुसरे कारण म्हणजे निवड केलेल्या जागेत भाजीपाला, फुले, अन्नधान्य , नगदी पिके(कॅश क्रॉप्स), आणि काही फळांच्या लागवडी अशी विवीध प्रकारची पिके घेतली जातात. तसेच त्या प्रायव्हेट कंपनीने ह्या अभिनव ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच कारले, वांगी, शेंगा, टॉमेटो, भेंडी, मिरची, गुलाब, आंबा, कापूस, मका, वाटाणा (लहान आकाराचा) , गहू, ज्वारी, बाजरी अशा उभ्या शेतातील पिकांचा फोटो काढून काही प्रकारे सराव अभ्यास देखिल केला आहे. त्या कंपनीने पिकांच्या उत्पादनासोबतच , मातीचे आरोग्य, कीटक.किटाणू समस्या आणि इतर काही महत्त्वाच्या बाबी ह्यां बाबत माहिती मिळवून देण्यासही संमती दर्शविली आहे ही बाबही निदर्शनास आणून दिली आहे. 

कृषी मंत्रालयाने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधण्यासाठी पिकांच्या कापणीच्या प्रयोगांबाबत तर्कशक्तीयुक्त सुधारणा करण्यासाठी एका समितीची आधीच स्थापना करून ठेवली आहे.  कृषी मंत्रालयाच्या एका अधिकार्‍या- नुसार ह्या संदर्भात महालानोबिस नेशनल क्रॉप फॉरकास्ट सेंटर (एमएनसीएफसी) बनविंण्याच्या योजनेला स्वीकृती मिळाली आहे. गेल्या वर्षी मंत्रालयाने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथील सर्वेक्षणासाठी एक ड्रोन भाडे-तत्त्वावर घेतला होता. मंत्रालयाच्या योजनेनुसार प्रत्येक राज्यासाठी एक ड्रोन विकत घेण्याची योजना आहे.

ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर करण्याची योजना आखणे हे  तेलंगणा सरकारचे पहिले पाऊल खरेच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.

खरोखरीच अभिनव, अत्याधुनिक तंत्रज्ञान - ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीबाबत प्रगती केल्यास भारताच्या विकासाला , प्रगतीला गती लाभण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही हे  निर्विवाद सत्य आहे !

सूचना - "ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी वापर - तेलंगणा सरकारचे पाऊल कौतुकास्पद !" हा लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २ फेब्रुवारी  २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता. 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog