Sunday 2 April 2017

राम नामाची गोडी मला लाविली हो किती दयाळू गुरु माझी माउली हो....

चैत्र महिन्याची शुंभकरा नवरात्र सुरु झाली की चैत्र प्रतिपदेच्या पहिल्या गुढी पाडव्याच्या दिवसानंतर भारतीय जनमानसाला ओढ लागते ती रामनवमीची. राम नवमी म्हणजे राम जन्माचा उत्सव !
रामनामाशी आम्हा भारतीयांचा अतूट संबंध आहे. राम नाम म्हणजे नवचैतन्य, नवजीवन , नव संजीवनी ! राम म्हणजे सत्य-प्रेम आनंद ह्या त्रयीचा सुंदर पावन संगम ! राम म्हणजे सच्चिदानंद, पावित्र्य हेच प्रमाण ह्याची साक्ष पटविणारे मर्यादा-पुरुषार्थ जीवनी रूजविणारे एकमेवाद्वितीय परमात्म्याचे स्वरूप!

राम नामाची गोडी मला लाविली हो किती दयाळू गुरु माझी माउली हो....
स्टेजवर हा गजर जोरात रंगला होता आणि मनात विचार आला की
किती उचित आहे हा गजर, नाही? आम्ही सामान्य माणसे रोजच्या प्रापंचिक अडी-अडचणींनी, व्यथांनी एवढे गांजलेले असतो आणि तरीही हा काळाच्या कसोटीवर उतरलेला साधा-सोपा असा हा रामनामाच्या स्मरणाचा मार्ग चोखाळण्याची बुद्धी आम्हाला होत नाही. सहस्रनामाच्या तुलनेचे असणारे ताकदवान रामनाम आम्ही घेत नाही. आपण सदैव काम्य भक्तीनेच त्या परमात्म्याकडे वा सद्‍गुरुकडे सतत काही ना काही मागण्याच करीत राहतो आणि ’ह्यांना आपले खरे हित कशात आहे हे कसे कळत नाही’ ह्या विचाराने त्या दयाळू सद्गुरुमाऊलीचे अंत:करण तीळतीळ तुटत राहते.

पुढे हीच हरिनामाची, रामनामाची आवड सर्वसामान्य जीवांना लागण्यासाठी ही दयाळू गुरुमाऊली, सर्वसामान्यांना ओळखीची असलेल्या ’बँक’ संकल्पनेची नव्या रूपात ओळख करून देते - ’रामनाम बँके’च्या रूपात. १८ ऑगस्ट २००५ साली सद्गुरु डॉ. अनिरुद्ध जोशींनी ’अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ ह्या संकल्पनेद्वारे कलिकाळावर मात करण्याचा, प्रारब्धाच्या तडाख्यातून सही-सलामत बाहेर काढण्याचा जणू रामबाण उपायच असलेले ’रामनामवही’रूपी एक शस्त्रच म्हणा, श्रद्धावानांच्या हाती सोपविले!


’रामनाम वही’ ही एक २२० पानांची वही आहे; ज्यात ’राम’, ’कृष्ण’, ’दत्तगुरु’, ’श्रीराम जय राम जय जय राम’, ’जय जय अनिरुद्ध हरि’ अशा वेगवेगळ्या नामांच्या द्वारे भक्ताला - सुखी, आनंदी करणाऱ्या सहजसोप्या नामस्मरणाची तोंडओळख करून दिली जाते.ह्या रामनामवहीच्या प्रत्येक पानावर भक्तिमार्गाचा अग्रणी श्रीरामभक्त हनुमंताचा वॉटरमार्क असतो, ज्यावर भक्त ही विविध नामे लिहीत असतो. ह्या हनुमंताच्या चित्राकृतीवर नाम लिहिण्यामागची खूप सुंदर कथाही सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशींनी विशद केली प्रवचनातून, ती म्हणजे - लंकेला जाण्यासाठी सेतू बांधताना हनुमंताने पाषाणांवर रामनाम लिहून त्या पाषाणांनी वानरसैनिकां करवी थेट ’श्रीरामेश्वर ते लंका’ असा अभेद्य सेतू समुद्रावर बांधून घेतला. सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी स्वबंधू लक्ष्मणासह पहिले पाऊल टाकताच ’श्रीराम जय राम जय जय राम’ ह्या गर्जनेने वानरसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा प्रसन्नचित्त श्रीरामांनी हा वर दिला होता की ’जो कुणी श्रीहनुमंताच्या रेखांकित चित्रावर रामनाम लिहील, त्याचे नाम दशगुणे वाढेल.’त्यामुळे साक्षात श्रीरामांनी दिलेल्या ह्या ग्वाहीचे स्मरण ठेवून रामनाम वहीची रचना तशीच केली गेली.
  
मनुष्याचे मन बहुतांश वेळा कुठलीही गोष्ट करू पाहते, ते केवळ फायद्यासाठीच. जसे व्यवहारात आपण पाहतोच की एखादा ’सेल’ लागला किंवा काही सवलती मिळणार असतील, तर ग्राहकराजा कशी धाव घेतो ते! मग ह्याचेही भान राखूनच ’रामनामवही लेखनाचे’ लाभ - श्रध्दावानांना समजावून दिले गेले. स्वत:च्या वैयक्तिक फायद्याबरोबरच रामनाम वही लिहीणार्‍या  श्रध्दावानांच्या गांठी दुहेरी पुण्य़ कसे जॊडले जाते ह्याची जाणीव करून देऊन.

ते म्हणजे रामनाम वहीचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा की ही वही भक्त स्वत:साठीही लिहू शकतो किंवा दुसऱ्यासाठीही लिहू शकतो. आपल्या आप्तांच्या वाढदिवस किंवा तत्सम महत्त्वाच्या दिवशी त्या आप्ताच्या नावाने रामनामबँकेत जमा करू शकतो. उदा. आजी, आजोबा आपल्या नातवासाठी लिहू शकतात, मुले आपल्या आईवडिलांकरता-भावाबहिणीकरिता लिहू शकतात. तसेच एखाद्या आजारी आप्ताच्या किंवा दिवंगत आप्ताच्या नावाने लिहूनही जमा करू शकतात. म्हणजे कोणीही कोणाकरिताही ही वही लिहू शकतो. ह्यामुळे अमूल्य लाभ मिळाल्याचे अनेक भक्तांचे अनुभव आहेत - वही लिहिणाऱ्या व्यक्तीलाही आणि ज्याच्या नावे वही लिहिली गेली त्या व्यक्तीलाही!!!
  
रामनाम वही लिहिण्याचा महिमा बघायचा झाला तर एक उदाहरण वाचनात आलेले आठवले ते नमूद करावेसे वाटते -
’कृपासिंधु’ ह्या मराठी मासिकाच्या नोव्हेंबर २०१२ च्या अंकात आलेला रेखावीरा जोशी ह्या स्त्री श्रद्धावानाचा बोलका अनुभव ह्याविषयी आपल्याला खूप काही सांगून जातो!

वाघोटण सिंधुदुर्ग येथे राहणाऱ्या रेखावीरा जोशी - ’रामनाम वहीनेच तारले’ ह्या आपल्या अनुभवात सांगतात की १३ मार्च २०१२ ला रात्री ९.३० च्या सुमारास त्यांच्या आजोबांची अचानक डाव्या हाताची व पायाची हालचाल होईनाशी झाली होती. डॉक्टरने सीटीस्कॅन करून संभाव्य अटॅकची शक्यता सांगून त्वरित उपाय केले आणि चौथ्या दिवशी आजोबा सुखरूप घरी आले. पण ही गोष्ट घडायच्या साधारण एक महिना अगोदर ह्या स्त्री भक्ताने १८ फेब्रुवारी २०१२ ला आजोबांच्या नावे एक रामनाम वही लिहून रामनाम बँकेत जमा केली होती. येथे त्या श्रद्धावान स्त्रीचा हा दृढ भाव आहे की ही रामनाम वही लिहिल्यानेच तिच्या आजोबांना रामनामाने तारले.

तसे पाहता ह्या ’पॉवरफुल’ रामनामाची गोडी जनसामान्यांना लावण्यासाठी सद्गुरुतत्त्व हे  युगानुयुगे झटत आलेले आहे असे आढळते .सद्गुरु नारदांकडून मिळालेल्या रामनामाच्या दीक्षेने ऋषिश्रेष्ठ वाल्मीकिंनी भक्तिमार्गावर एवधा मोठा पल्ला गाठला की प्रभू श्रीरामांच्या जन्माआधीच "रामायण" हे महान काव्य रचून रामचरित्र लिहिते झाले.

कालांतराने समाजाला रामनामाचे विस्मरण होते आहे असे दिसताच, साक्षात भगवान शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात दृष्टांत देऊन श्रीरामरक्षा रचवून घेतली.

संत रामदास स्वामींनीही गावोगाव फिरून श्रीरामनामाची गोडी जनमानसांत रुजविली. संत तुलसीदासांनीही ’श्रीरामचरितमानस’ ही रचना केली. हा एवढा अट्टाहास करण्याचे कारण ह्या सर्व संतांनी रामनामाचे महत्त्व जाणले होते.
  
रामनामाने पतित पावन होतात, रामनामाचा लाभ गहन - खूप मोठा आहे, रामनामाच्या आवर्तनाने तुम्हाला जन्ममरणांचे धरणे सोडवता येईल. ’एका रामनामाचे हे कोटींगुणे लाभ माझ्या लेकरांना लाभोत’ ह्या सद्गुरु डॉ. अनिरुद्ध जोशींच्या कळवळ्यापोटीच श्रद्धावानांच्या  जीवनी रामनामवही अवतरली.
 
सदगुरु हा  नेहमी साध्या सोप्या प्रकाराने भक्तांना प्रपंच न सोडताही परमार्थ करायला शिकवतात तो असा. म्हणूनच एरवी ज्यांनी कदाचित रामनाम घ्यायला कंटाळा केला असता, असे असंख्य श्रध्दावान भक्त आज न कंटाळता रामनामवही लिहीताना आढळतात . ते प्रारब्धाच्या तडाख्यांना न घाबरता तोंड देतात, संकटांना न डगमगता सामोरे जातात ते ह्याच रामनाम वहीच्या ताकदीने... फावला वेळ असो की प्रवास असो, सच्चा श्रद्धावान हा हाती रामनाम वही घेतोच. किती सहज सोपा मार्ग त्या दयाळू गुरुमाऊलीने आम्हाला दाखवला.

म्हणूनच तर गजरात बेधुंद होऊन श्रद्धावानांचा नामघोष दुमदुमत होता ----
    "रामनामाची गोडी मला लाविली हो, किती दयाळू गुरु माझी माऊली हो"

ही कृतज्ञता व्यक्त होत होती श्रद्धावानांची आपल्या सद्गुरुपोटीची.

देवाने माणसाला चांगल्या घरी जन्म दिला, शिक्षण दिले, नोकरी-धंदा देऊन पोटापाण्याची व्यवस्थित सोय लावली, लग्न लावून संसार थाटून दिला. हे सगळे जर देवाने आपल्याला तरुण वयात दिले आहे, तर त्याच देवाचे आपण आभारही तरुण वयातच मागू. ही कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच आपण देवाच्या चरणीं खर्‍या अर्थानें नतमस्तक होणे आणि हीच आहे ’अंबज्ञता’, जी देवाला अत्यंत प्रिय आहे - भक्ताचा भोळाभाबडा कृतज्ञतेचा भाव.

चला तर मग....आपणही  सारे रामनाम वही लिहून ही अंबज्ञता ’त्या’ रामाच्या आणि त्याच्या परमप्रिय आदिमातेच्या म्हणजेच रामनामाला तारक मंत्राचा वर देणा‍र्‍या श्रीरामवरदायिनीच्या चरणी वाहूया आणि ’अंबज्ञ’ होऊया...

सूचना: हा लेख पहिल्यांदा २०१४ मध्ये रामनवमीला http://ramnavamiutsav.aniruddhabapu.in/2014/04/aniruddhasuniversalbankoframanam.html ह्या बेवसाईटवर प्रसिध्द झाला होता. 

8 comments:

  1. ||Hari Om|| ||Shri Ram|| ||Ambadnya||

    ReplyDelete
  2. Sunitaveera khupach chaan lihile ahe ramnam vahiche mahatva. Ambadnya.Shreerm

    ReplyDelete
  3. Superb writing Sunitaji.....
    Really the presence of Ram in our everyone's life is totally unbelievable and most important for walking on right path.

    ReplyDelete
  4. Noteworthy Abstract about Ramnam Ambdnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog