Sunday 24 December 2017

दगडफेक करणारे हात आता फूटबॉलचा गोल रोखत आहे....

आज सद्य परिस्थितीत आपल्या जवानांनी, सुरक्षा दलांनी राबविलेल्या धडक मोहीमा, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना संपविण्यात यश आले आहे. परंतु गेली कित्येक महिने आपल्या भारतीय जवानांवर होत असलेली दगडफेक आणि तेथील  स्थानिकांचा अतिरेकी, दहशतवाद्यांना मिळणारा पाठींबा ह्यामुळे सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढण्यास हातभारच लागत होता. ह्या दगडफेकीच्या बातम्या वाचतानाच मागच्या वर्षी नॅशनल मिडीयावर एक संतप्त काश्मीरी तरूणीचे जम्मू अणि काश्मीर पोलीसांवर दगडफेक करतानाचे चित्र सर्वत्र प्रसिध्द झालेले पाहण्यात आले होते. त्यामुळे  अल्पावधीत्च अफशान आशिक हे नाव सर्वांना परिचितही झाले होते.  परंतु आज त्याच अफशान आशिकचे नाव ट्विटर सारख्या मिडीयावर जम्मू -काश्मीरच्या स्त्री फुटबॉल  संघाची  कप्तान , गोलकिपर म्हणून झळकत आहे. ती मुंबई संघातर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनीधीत्व करत आहे २२ जणांच्या फुटबॉल टीमचे !
खरोखरीच ही खूप सुखावह ,आनंददायक बाब आहे ! 
                                                                   
अफशान सांगते मागच्या वर्षीच्या तिच्या दगडफेक करणार्‍या जम्मु-काश्मीरच्यासंतप्त युवतीच्या फोटोमुळेच तिच्या आयुष्याला एक नवीनच कलाटणी मिळाली. मुळातच त्याच फोटोची सत्यता पडताळून पाहताना अफशान ही एक मूळ फुटबॉल प्रेमी असल्याचे उघडकीस आले. तिच्या मते त्या फोटोनेच तिच्या वैयक्तिक जीवनातील तिच्या स्वत:च्या खेळातील करिअरला सुध्दा एक नवीच सुसंधी उपलब्ध झाली आणि त्याच मुळे जम्मु-काश्मीर मधील कित्येक मुलींना ती फुटबॉल ह्या पुरुषप्रधान खेळाची ओळख करून देऊ शकली.  आपल्या रागाला व्यक्त करण्यासाठी दगडफेक करतानाचा तिचा फोटो प्रसिध्द झाल्यामुळे ती एक खेळासाठी हपापलेली, उत्सुक क्रीडाप्रेमी असल्याचे तिचे मूळ स्वरूप जगासमोर आले. त्यानंतर जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्यांनी अफशानला जम्मु-काश्मीर तर्फे फुटबॉल खेळण्यासाठी आणि जम्मु-काश्मीरमध्ये महिलांचा फुटबॉल खेळातील समावेश वाढवैण्यासाठी प्रेरीत केले, प्रोत्साहनही दिले आणि खूप मोठे पाठबळ पुरविले. मेहबूबा मुफ्तींनी स्पोर्टस  सेक्रेटरींना अफशान व तिच्या सहखेळाडू महिला फुटबॉल टीमला सर्वतोप्रकारे सहाय्य पुरविण्याचे आदेश दिले आणि राज्य प्रशासनाने सुध्दा जराही दिरंगाई न करता वा आदेशाकडे काणाडोळा न करता महिला फुटबॉलपटूंना खेळाचे सर्व साहित्य देखिल पुरविले आणि त्यामुळेच अवघ्या एका वर्षात एक संपूर्ण टीम बनविता आली.  

नुकतीच मंगळवारी अफशान व तिच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी २२ जणांची फुटबॉल टीम , त्यांचे कोच सतपाल सिंग काला आणि मॅनेजर त्सेरींग अंगमो ह्यांनी युनियन होम मिनीस्टर राजनाथ सिंग ह्यांची भेट घेतली. स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India (SAI) ह्या इंस्टिट्युटची काश्मीरमध्ये सुरुवात व्हावी आणि त्या योगे काश्मीरमधील तरूण मुलींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण मिळावे ह्याबाबत संमती मिळविण्यासाठी ही भेट घेतली गेली होती.  अफशानने  एका वृत्तपत्राला (TOI) बातमी देताना अशी प्रतिक्रिया दिली की युनियन होम मिनीस्टरांनी आमच्या फुटबॉल खेळासंबंधीच्या समस्या शांतपणे जाणून घेतल्या , ज्याने मी अत्यंत प्रभावित झाले. आम्हांला जम्मु-काश्मीरमध्ये आता खेळासाठी पायाभूत सुविधा अजून उत्तमरीत्या पुरविल्या जातील असा विश्वासही तिने व्यक्त केला. होम मिनीस्टरांनी अफशान आणि तिच्या सहकारी खेळांडू समोरच जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून त्यांना ते श्रीनगरला पोहचल्यावर त्यांना भेट देण्याविषयी सुचविले असे तिने सांगून आपले समाधान व्यक्त केले.

२३ वर्षांची अफशान आशिक ही श्रीनगर मधील कॉलेजमधून बीएचे शिक्षणही घेत आहे. थोड्याच कालावधीत बॉलीवुड मध्ये तिच्या  जीवनातील खेळातील प्रवासाबाबत एक फिल्मही बनविली जाणार आहे असे वाचनात आले. 

                                                                         


                                                                   
पोलिसाच्या चुकीच्या वागणे नसते तर आपण दगड उचलला नसता असे सांगून मागील वर्षी झालेल्या दगडफेकीच्या बद्दल आपल्या मनात पश्चात्ताप नसल्याचे अफशानने मत व्यक्त केले . परंतु आज मला प्रतिष्ठा मिळाली आहे आणि मला सन्मान मिळाला आहे , तो मला जपायचा आहे. मला माझ्या फुटबॉलवर माझे लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि मला माझ्या राज्याला आणि माझ्या देशाला अभिमानास्पद कामगिरी करायची आहे असे अफशानने उद्गार काढले.     

आपत्ती व्यवस्थापनामध्ये जातीय दंगली , वैमनस्यातून उद्भवलेले दंगे ह्यांना मानवी आपती ( Man made disasters) असे संबोधिले जाते, ह्या आपत्तींना तोंड देण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून बचावात्मक उपाय योजले जाऊन त्याची तीव्रता, होणारे भयावह परिणाम कमी करता येऊ शकतात असे वाचनात आले होते. त्यामुळे जम्मु-काश्मीर मधील जातीय दंगली , दहशतवाद्यांची, अतिरेक्यांची घुसखोरी ह्यांवर तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजणे हे अत्यंत आवश्यक पाऊल होते. तरूण पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांचे जीवन अनुचित दिशेने भरकटत चालले होते व युवा शक्तिचा गैरवापर करून जातीय दंगली घडविल्या जात होत्या. जम्मु-काश्मीर मध्ये युवा -वर्गाला त्यांची कर्तबगारी दाखविण्यास योग्य पध्द्तीने वाव दिल्याने, तेथील शांतता, तेथील समजाचा विकास हे शक्य होऊ शकते असे चित्र दिसू लागले आहे. 

खरोखरीच सरकारने उचलेली ही खूप स्तुत्य बाब आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. 

खेळाडूंना प्रोत्साहन देऊन , त्यांना पाठींबा दिल्यास ऑलिम्पिकमधील वा अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमधील भारताची कामगिरी अधिक उज्ज्वल होऊ शकते हे निर्विवादास्पद सत्य कोणीच नाकारू शकत नाहीत.  


    
सूचना -  हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १० डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता.

2 comments:

  1. छान लेख...
    अजून एक युक्ती करू शकते भारत सरकार,
    फक्त 1 शिपिंग कंटेनर भरून फुटबॉल्स (म्हणजे खूप, 2000-3000) काश्मीर मध्ये फुकट वाटून टाकायचे.
    नक्कीच 1000-2000 मुले मुली दगड फेक सोडून त्यांची ताकद सत्कारणी लावतील...

    ReplyDelete
  2. This is an example of conversion of darkness into LIGHT.but a strong good will like afshan is what is needed...
    Govt authorities did their job brilliantly...
    Revenge is not the solution to any problem..If anger is utilised for some constructive work it does wonders like this...

    Lots of thanks to daily pratyaksha n writer of this article who has thrown LIGHT on this social topic...

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog