Wednesday 29 June 2016

" तू फक्त माझाच आणि मी फक्त तुझाच "

दोन जीवलग सख्यांमध्ये संवाद चालला होता - 
अग स्वराली , माझ्या बछडीची एक गंमत तुला कधी सांगते असे झाले... तिचे वाक्य अर्धवट असतानाच स्वराली मुग्धाचा हात  हातात धरत म्हणाली ," अग सांग ना लवकर काय नवीन गंमत केली आपल्या प्रिन्सेसने.... गोडच आहे भारी सानिका आपली. आता काय नवीन पराक्रम केला ...

बहुधा लहान मुले म्हणजे घरातील , मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यातील अत्यंत आवडीचा , जिव्हाळ्याचा विषय असतो. आपली छकुली, सोनुली , बछडी ही प्रत्येक आई-बाबांची राजकन्या असते तर आपला सोनुला हा राजकुमार असतो जणू. आजकालच्या घड्याळाच्या धावत्या काट्यांसोबत सतत धावत राहणार्‍या ,नोकरी सांभाळत घर , संसार करणार्‍या स्त्रियांना तर आई झाल्यावर दिवसाचे २४ तास पण कमी पडतात असे भासू लागते. त्यात घरात लहानग्यांना सांभाळायला हक्काचे आजी-आजोबा असेल तर सुटकेचा नि:श्वास टाकता येतो नाहीतर पाळणाघर , बालसंगोपन केंद्र ह्यांच्या मागे धावताना  जीवाची प्रचंड घालमेल तर होतेच पण अनाहूत काळजी , चिंता ह्यांची टांगती तलवारच मानेवर कुणी धरली आहे अशी बिकट परिस्थिती रोजच अनुभवावी लागते. 

आजी-आजोबांसाठी आपल्या मुला-मुलींची मुले - त्यांची नातवंडे - नात असो वा नातू ही दूधावरची सायच असते. अगदी प्रेमाने , मायने,लाडा-कोडात ती लहान बाळे सांभाळतात-स्वत:च्या उतरत्या वयाची , थरथरत्या हाता-पायांची , थकलेल्या शरीराची पर्वा न करताही ! त्यामुळे आई-बाबा सुध्दा निर्धास्त होतात...

तर अशा ह्या लहानग्या बछड्यांना त्यांची आजी - आजोबा हे खूपच आवडतात , त्यांना त्यांच्या प्रेमाच्या वाट्यात दुसरा कोणी वाटेकरी झालेला मुळीच पंसद नसते. तीच सानिकाची गंमत स्वरालीला मुग्धाला कधी सांगते असे झाले होते...

सानिकाला तिची आजी खूप खूप खूप आवडते. आजीला कोणी माझे म्हटले की सानिकाने जोरात रडायला सुरुवात केलीच. मोठ्याने भोकाड पसरून छोटीशी सानिका रडून रडून घर डोक्यावर घेते. आजी फक्त माझीच आहे, मी नाही कुणाला देणार तिला ... 

त्या दिवशी सकाळी सानिकाच्या भावाने तिला चिडवायला आजी माझी माझी म्हणून डिवचले आणि ह्या बाईसाहेबांनी रडून रडून एकच आकांत मांडला . आजी फक्त माझीच आहे, आजी फक्त माझीच आहे , ए आजी तू सांग ना दादाला तू त्याची नाहीस , तू फक्त माझी आणि माझीच आहेस. आजीने किती समजावले , सानिकाच्या दादाला दमही दिला खोटा खोटा पण नाहीच मुळी... 
सानिका आजीबरोबर तिच्या महिला मंडळात संध्याकाळी गेली तरी तिचे पालुपद चालूच होते .. आजी तू फक्त माझीच आहे. महिला मंडळातील बाकीच्या दुसर्‍या आज्यांशी सानिका भांडली देखिल.. ही फक्त माझीच आजी. तुमची नाही कुणाची. शेवटी सगळ्या आजींनी कबूल केले ही फक्त तुझीच आजी , तेव्हा आमच्या सानिकाच्या चेहर्‍यावर हसू आले. आता काय म्हणायचे ह्या पोरीला ... किती लहान आहे ती .. काय समजवणार तिला ... आजीची पुरती वाट लागली तिला समजवताना...

खरेच किती सुंदर असते हे आपुलकीचे नाते, "तू फक्त माझा आहेस आणि तू फक्त माझीच आहेस. "
किती हक्क, किती आपलेपणा, किती प्रेमाचे नाते हे घट्ट रेशीम धाग्यांनी विणलेले असते ना , हळूवारपणे... प्रेमाची बांधिलकी मनाने ,बुध्दीने आपणहून स्विकारलेली, कुठेही जबरदस्ती नसते, कुठेही अट नसते, जर-तर ची व्यवहारी गणिते नसतात... 

लहान मुले म्हणजे देवाघरची फुलेच जणू त्यांच्या भोळ्या,निष्पाप, निर्व्याज भावाने माणसाचे मन गहिवरून गेले नाही तरच नवल ! कुठेही लबाडी नाही , कुठेही कपट नाही , कसलीही कटुता नाही, कोणताही आडपडदा नाही, किती सरळ , साध्या , सोप्या मोकळ्या मनाने ती नाती बनवतात.      

ह्यावरून आठवली ती भक्त बाळ प्रल्हादाची गोष्ट! भगवान विष्णूंची भक्ती करणार्‍या कयाधू आणि राक्षसकुळातील हिरण्यकश्यपू ह्यांचा प्रल्हाद हा पुत्र! खरेतर 
कयाधूच्या भक्तीभावातूनच ह्याचा जन्म झाला म्हणल्यास वावगे ठरणार नाही. जन्मत:च प्रल्हाद हा नारायणाच्या , हरीच्या भक्त्तीत आकंठ बुडालेला ! आता झाली का पंचाईत , येथे हिरण्यकश्यपूला तर कोणी देवाचे नाव उच्चारलेले सुध्दा चालत नसे आणि त्याचा स्वत:चा मुलगा प्रल्हाद तर देवाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झालेला. प्रल्हादाच्या तोंडी सतत देवाचे नाव असायचे , शेवटी राजा हिरण्यकश्यपूने स्वत:च्याच मुलाला प्रल्हादाला शिक्षा करायचे ठरविले , काळजाचा थरकाप उडविणार्‍या एकाहून एक कठोर शिक्षा होत्या , उकळत्या तेलात टाकले, हत्तीच्या पायाखाली दिले , उंच डोंगराच्या कड्यावरून कडेलोट केला , होळीच्या सणाच्या दिवशी होळीच्या आगीत घातले तरी प्रल्हादाचा केसालाही धक्का पोहचला नाही कारण बाळ प्रल्हादाचा अनन्य भाव आणि भक्ती होती त्या महाविष्णूवर
"तो फक्त माझाच आहे आणि मी फक्त त्याचाच आहे " तुझ्यावाचून मला आणखी दुसरे कुणीच नाही. माझ्यासाठी माझे सर्व काही तूच आहे... अशी कळवळ्याची हांक ऐकून  "तो" भक्तवत्सल , करूणासिंधु, दया-कृपा सागर नाही हेलावला तरच नवल ! 
प्रत्येक संकटात माझा देवबाप्पाच माझा आहे , "तो"च माझा सांभाळ करेल हा भाव होता प्रल्हादाच्या मनात . जेथे प्रेम आणि अपार विश्वास असतो ना तेथे भीतीचा लवलेशही उरतच नाही मुळी. 
जेव्हा जेव्हा नात्यात "तू माझाच आणि मी तुझाच " हा "च " येतो ना तेव्हा तो प्रेमाचा , आपुलकीचा रेशीम बंध कोणी कोणी तोडूच शकत नाही. 
म्हणूनच संत मंडळी पण आपल्या भगवंताशी असेच घट्ट प्रेमाचे , आपुलकीचे नाते विणायला शिकवतात . 


संत मीराबाईच्या श्रीकृष्ण भक्तीचा महिमा काय वर्णावा " मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई "
संत जनाबाई रोजच्या घरकामांतून शेणाच्या गोवर्‍या थापताना, धुणी धुताना , भांडी घासताना, दळण दळताना तिच्या लाडक्या विठू माऊलीचे नाव सतत प्रेमाने आळवीत राही " देव माझा विठू सावळा , माळ त्याची माझिया गळा " 
संत नरहरी सोनार देवाला साद घालतात - देवा तुझा मी सोनार , तुझे नामाचा व्यवहार ..

आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या कुलदैवत असणार्‍या तुळजापूरच्या भवानी मातेशी अशाच प्रेमाच्या नात्याने , अनन्य भावाने बांधले गेले होते " हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा ! असेच उद्गार ते नेहमी काढीत . "जय जगदंब " म्हणून ते आपल्या भवानी मातेचा , जगदंबा मातेचा उदोउदो करीत. 

श्रीसाईसच्चरितात साक्षात सदगुरु साईबाबा स्वत: सांगतात माझ्या सदगुरुंनी मला दुसरे काही शिकविले नाही. ना त्यांनी माझे कान फुंकले ना त्यांनी मला कोणता गुरुमंत्र दिला . "तू मजकडे अनन्य पाही , पाहीन मी तुज ऐसेच " म्हणजेच तू मला अनन्य भावाने पाहा , मला तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही , तू एकमेव माझा आणि फक्त माझाच आहे ." आणि मग मी (सदगुरु ) पण तुला त्याच अनन्य भावाने पाहीन . 

आपण आपल्या देवाशी असे नाते जोडायला शिकले पाहिजे. संकट समयी , कठीण प्रसंगी आपण त्याला साद घालतोच. पण एरव्ही सुध्दा मी माझ्या देवाला प्रेमाने हाक मारली , त्याचे नाव घेतले तर त्याला ते खूप आवडते. मला तू हे दिलेस तर मी तुला सोन्याचा मुकूट देईन, चांदीचे तबक देईन, ११ नारळाचे तोरण वाहीन , पाच किलो मोदक देईन ...कशाला असला देवघेवीचा व्यवहार ... 
त्यापेक्षा आपण प्रेमाने नाव घेत राहू "तो" प्रेमाचा भुकेला श्रीहरी भोळ्या भावालाच भुलतो 
शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला , हावरा हा भक्ती प्रेमा विके कवडी मोला 

ह्या शब्दांनी माझ्या मनाला अधिकच भुरळ घातली आणि देवाशी आपले नाते कसे असावे ह्याचा मार्ग दाविला

नको गोकुळीचे लोणी नको द्वारकेचे हिरे 
मज हवे माझ्या देवा फक्त सर्व तुझे होणे 

काय अप्रतिम मागणे आहे ह्या शब्दांमध्ये , हे माझ्या लाडक्या देवा मला तुझे वैभव नको , मला ना कसल्या अन्नाची , पक्वानांची आस , पण माझ्या देवा मला फक्त तुझेच आणि सर्वस्वी तुझेच होऊन राहायचे आहे .... 

चला तर मग देवाशी असे अनन्य भावाचे नाते घट्ट विणू या ..." तू फक्त माझाच आणि मी फक्त तुझाच ..." 


  

3 comments:

  1. "नको गोकुळीचे लोणी नको द्वारकेचे हिरे मज हवे माझ्या देवा फक्त सर्व तुझे होणे कारण तू फक्त माझा च आणि मी फक्त तुझा!!" अप्रतिम भाव सुनीता.

    ReplyDelete
  2. एक उत्कृष्ट लेखनशैली !!!
    एखादा विषय कसा कुठून वळवावा , कसा फुलवावा आणि उचित मुद्द्यावर येऊन कसा पूर्ण करावा हे तुमच्या लेखनशैलीमधून समजते .
    दोन सख्यांच्या उदाहरणातून देवाशी नाते कसे असावे हे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मांडले आहे .
    अप्रतिम ...

    ReplyDelete
  3. मंजुषा वीरा टप्पू6 July 2016 at 04:37

    खूपच छान लिहीलंय सुनिता वीरा , अंबज्ञ
    तू मजकडे अनन्य पाही पाहीन तुज कडे तैसाच मीही
    बापूंना अभिप्रेत असलेला भाव तुमच्या लेखामधे पुरेपुर उतरलाय

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog