Monday, 16 March 2015

चोरी ही फक्त पैशाचीच असते का?




चोरीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये तशा नेहमीच वाचतो. कोणाचे मंगळसूत्र ओढले, कोणाची सदनिका फोडली (घर फोडले), कधी कोणा बॅंकेवर दरोडा पडला, जवाहिर्‍याची वा सोनारांची दुकाने फोडली वगैरे. बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर इंटरनेटवरून दुसर्‍याचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करणे, दुसर्‍याचे क्रेडिट कार्ड चोरून वापरणे वगैरे गुन्हे करणार्‍या बुद्धीमान चोरट्यांबद्दल आपण नेहमीच वाचतो.तर क्वचित  कोणाचा पासपोर्ट तर कधी मौल्यवान रत्ने चोरीला गेल्याचीही बातमी वाचतो. आजकाल तर राजरोसपणे विजेचीही चोरी केली जाते सर्रास असे वाचनात येते.




चोरीवरून एक गोष्ट  अनाहूतपणे आठवली . 
महात्मा गांधीजी - मोहनदास करमचंद गांधीजी हे नाव प्रत्येक भारतीयाला चांगलेच परिचीत असते. ह्या महान थोर भारतमातेच्या सुपुत्राचे आत्मचरित्र वाचताना काही गोष्टींची कबूली एवढ्या प्रांजळपणाने त्यांनी दिली आहे की आपोआप नतमस्तक व्हावयाला होते.... आता हेच बघा ना गांधीजीच्या लहानपणीची गोष्ट. एकदा मोहनदासच्या एका भावाला कर्ज फेडायला वा उधारी चुकवायला पैशाची गरज असते आणि म्हणून गांधीजी त्यांच्या दुसर्‍या भावाच्या सोन्याच्या दागिन्यातील थोडेसे सोने चोरी करतात. पण शेवटी घराच्या संस्कारमय वातावरणामुळे त्यांचे भिडस्त मन , बुद्धी त्यांना चैन पडू देत नाही.मनाची शांती, समाधान ते गमावतात. शेवटी ते वडिलांकडे आपण चोरी केली असल्याचे कबूल करायचे ठरवितात, पण धाडस होत नाही. म्हणून पत्र लिहून वडिलांच्या उशाखाली ठेवतात. आता आपले वडील खूपच चिडणार आणि कदाचित आपल्याला चांगला बेदम मार ही मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात घडते विपरीतच... त्यांचे पत्र पाहून वडीलांच्या डोळ्यांतून आसवे ओघळतात आणि त्या आसवांनी गांधीजीच्या जीवनाला एक मोठी कलाटणीच मिळते जणू काही. 

गांधाजी म्हणतात येथे माझ्या जीवनात अहिंसेचे बीज रोवले गेले. पुन्हा कधीही आयुष्यभर चोरी न करण्याचा निर्धार तर झालाच होता मूकपणे मनात !!! पुढे ह्याच अहिंसेच्या पाठबळावर ब्रिटीश साम्राज्याला हादरवून टाकण्याचे आणि मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे अपार सामर्थ्य त्याना गवसले.  
    
ही गोष्ट वाचून मनात विचारांचे काहूर माजले.
लहानपणापासून चोरी करणे हे पाप असते अशी शिकवण दिली जाते. मग चोरी ही फक्त पैशाचीच असते का? मला असे वाटते की नाही चोरी ही फक्त पैशाची असूच शकत नाही.
चोरी म्हणजे केवळ धन, संपत्ती   लुबाडणे नव्हे असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.
एखाद्याच्या अमूल्य वेळेची चोरी , एखाद्याच्या कीर्तीची चोरी, एखाद्याच्या मान-सन्मानाची चोरी ही सुध्दा चोरीच असू शकते.

    
आता हेच बघा आपल्याला माहीत असते की एका डॉक्टरला डॉक्टर म्हणून पदवी संपादन करण्यासाठी किती वारेमाप पैसा आणि वेळ खर्चावा लागतो. आयुष्याचा किती मोठा वेळ आणि पैसा ही त्याच्या वैद्यकीय पदवी पूर्ण होई पर्यंत त्याला वेचावा लागतो. पण उद्या जर का एखादा त्याचा नातेवाईक वा मित्र स्वत:च्या फायद्याखातर वारंवार तू माझा किती चांगला मित्र आहेस वा किती हुषार डॉक्टर आहेस म्हणून वैद्यकीय सल्ल्यासाठी वा रोग-चिकीत्सेसाठी वा कोणत्याही आजाराच्य निदानासाठी त्या डॉक्टरचा भरपूर वेळ विनामूल्य म्हणजे चक्क फुकट वापरत असेल तर तीही एक प्रकारची चोरीच आहे ना?

दुसर्‍याची मालकीची कोणतीही गोष्ट त्याच्या परवानगी शिवाय फुकट वापरणे हे चोरी करणेच होय असे मला तरी निदान वाटते.

साधे रोजच्या दैनंदिन जीवनातले उदाहरण बघायचे झाले तरी किती तरी गोष्टी आढळतील. एखादा माणूस स्वत:च्या अंगणात वा बागेत अत्यंत आवडीने, प्रेमाने सुगंधी फुलांची झाडे लावतो, त्यांना रोज पाणी घालून , वेळप्रसंगी खते घालून त्यांची निगराणी राखतो आणि ती फुलझाडे चांगली बहरतात, फुलांनी लगडतात आणि त्याचे शेजारी म्हणा वा रस्त्याने ये-जा करणारी अनोळखी माणसे त्याच्या झाडावरची फुले देवपूजेच्या नावाखाली न विचारता कादून घेतात.... काय म्हणावे आता ह्या दरिद्री कर्माला --- ही तर शुध्द चोरीच झाली ना-- मला वाटते आपल्या म्हणी ह्या अशाच प्रचलित झाल्या असाव्या - मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर वा कुंपणाने शेत खाल्ल्ले - हा वाक्प्रचार.

खरेच विचार करा जरा देवाला तरी आवडतील का अशी चोर्‍या करून वाहिलेली फुले ?  नक्कीच नाही, ना. 

कधी कधी आपण पहातो की एखादे काम अत्यंत मेहनतीने, परिश्रमाने कोणी तरी " क्ष" व्यक्ती करते आणि दुसरीच " य़" व्यक्ती त्याचा गैरवापर करवून स्वत:च्या नावाने ते काम खपविते आणि प्रसिध्दीचे , मान-सन्मानाचे श्रेय बळकावते/ढापते. मग भले ती एखादी सुंदरशी कविता असो वा छानसा लेख असो वा कोणतेही छोटे-मॊठे कार्य असो,.ह्या गोष्टी सुध्दा चोरी म्हणूनच गणल्या जातात.

कधीच कोणतीही चोरलेली वा लुबाडलेली गोष्ट माणसाला शांती, तृप्ती , समाधान मिळवून देत नाही, उलट त्या माणसाचे पाप मात्र तुमच्या माथी येऊन आदळते, कर्माच्या अटळ सिध्दांतानुसार. "करावे तसे भरावे" हेच सत्य परखडपणे दावते.
ह्या संदर्भात श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची एक कथा वाचनात आली होती. टेंबे स्वामी हे कर्म-मार्गाचे कट्टर पुरस्कर्ते होते. ते सहसा कोणाच्या घरी एकापेक्षा जास्त वेळा भोजना साठी आणि रात्रीच्या विश्रामासाठी थांबत नसत. एकदा एका रात्री यजमानाच्या अत्यंत आग्रहापोटी ते थांबतात खरे. दुसया दिवशी मात्र भोजनानंतर निघताना त्यांना तेथील चांदीचे पात्र चोरण्याचा अनावर मोह होतो.वासुदेवानंद स्वामींना काही केल्या कोडे उलगडत नाही. तेव्हा तपासाअंती स्वामींच्या ध्यानात येते की ज्या घरी त्यांचा मुक्काम होता त्या घरचा यजमान हा चोरी करत असे. त्या घरचे अन्न फुकट खाल्ल्याने स्वामींच्यामाथी त्याचे अर्धे पाप येऊन आदळले आणि चोरी करण्याचा अनावर मोह झाला.
काय मग मनात प्रश्न उद्भवला असेल नाही तुमच्या? माझ्या मनात तर लगेच प्रश्न आला की जेवणाने कसे बरे चोरी करण्याचा मोह झाला.

ह्या संदर्भाबाबत अधिक स्पष्टीकरण माझे सदगुरु बापू अर्थात डॉक्टर अनिरुध्दसिंह जोशी ह्यांच्या "श्रीमदपुरुषार्थ:" ह्या ग्रंथसंपदेतील "सत्यप्रवेशः" ह्या प्रथम खण्डात वाचावयास मिळाले. माझे सदगुरु म्हणतात की कोणाकडूनही काही फुकट करणे हीसुध्दा चोरीच आहे. व्यावहारिकदृष्टया जे माझे नाही, ते लबाडीने त्याच्या मूळ मालकाच्या कळत वा नकळत, त्याच्या इच्छेविरुध्द व परवानगीशिवाय वापरणे म्हणजेच चोरी.
पुढे बापू म्हणतात की एखाद्याला वेळ देऊन ती न पाळणे व त्याचा वेळ फुकट घालविणे ही त्याच्या वेळेची चोरीच आहे. मूर्तिपूजा करण्यासाठी स्वत: फुले विकत न आणता ,दुसर्‍याच्या जागेतून चोरणे . फुले चोरण्याची व्यावहारिक चोरी यशस्वी होते परंति फल मात्र पापाचेच देते. तसेच बसच्या रांगेत पुढे घुसणे , मंदिरात जाताना रांगेत घुसणे ही सुध्दा दुसर्‍याच्या अधिकाराची चोरीच आहे.

माझ्या सदगुरुंनी ज्ञानाचे हे भांडार अगदी सर्वांसाठी  मुक्त हस्ते लुबाडण्यासाठी..खुले केले आहे... ह्या अमाप दानाबद्दल एक श्रध्दावान स्त्री (सुशीलाताई इनामदार) त्यांच्या पद्य रचनेत उल्लेख करतात -
ह्या बागेतील वेलीवरली फळे नाही राखिली मुक्तपणाने श्रीअनिरुध्दांनी सकल होऊनी फळेही संपविली
        
सदगुरु श्रीसाईनाथ म्हणजेच साईबाबा देखिल ह्याच तत्त्वाची जाणीव करून देतात. ह्या संदर्भातील कथा "श्रीसाईसच्चरित" ह्या ग्रंथात १९व्या अध्यायांत आपल्याला वाचावय़ाला मिळते. बाबा म्हणत दुसर्‍यांचा वेळ फुकट वापरणे म्हणजे चोरीच करणे होय आणि म्हणूनच अशी चोरी आपल्या हातून घडू नये म्हणून साईबाबा सांगतात की कधीही कोणाकडून कोणतेही काम फुकट करवून घेऊ नये, त्याला त्याच्या कामाचा , वेळेचा मोबदला जरूर दयावा. साईबाबा नेहमी स्वत:च्या आचरणातून भक्तांना शिकवण देत, तशी ह्या गोष्टीचे माहात्म्य भक्तांवर ठसविण्यासाठी साईबाबा एकदा राधाकृष्णामाई ह्या एका भक्ताच्या घराच्या छपरावरून दुसया बाजूला त्यांना जायचे असते म्हणून एका निसणवाल्याकडून शिडी लावून घेतात वर चढण्यासाठी आणि परत खाली उतरण्यासाठी. दिसायला हे काम किती साधे कमी श्रमाचे वाटते.  तरीही बाबा त्या निसणवाल्याला त्याचे मोल देतात दोन रुपये अतिदक्षतेने, अविलंबे तात्काळ जमिनीवर पाय ठेवताच. अर्थातच लोकांना जिज्ञासा असते की साईबाबा एवढा पैसा का देतात.तेव्हा धीर करून एक बाबांना विचारतो. बाबा प्रत्युत्तर देतात
कोणाच्याही श्रमाचा भार ।  फुकट लवभार घेऊं नये ।। २४६ ।। 
कोणाहीपासूनि घ्यावें काम । परि जाणावे तयाचे श्रम । 
लावावा जीवास ऐसा नियम ।  फुकट परिश्रम घेऊं नये ।। २४७ ।।

वारकरी संप्रदायात विठ्ठलाबद्दल एक कहाणी सांगतात की भीमेच्या काठच्या त्या काळ्या भामट्याकडे कधी निरखून पाहू नका, विशेषत: त्याच्या डोळ्यांकडे पाहूच नका , एकदा का तुम्ही त्याच्या डोळ्यात बघितले की "तो" तुमचे हृदयच चोरतो. असा हा भक्ताचे हृदय चोरणारा एकमेव चित्तचोर म्हणजे पंढरीचा सावळा विठ्ठल. म्हणूनच संत श्रेष्ठ जनाबाई तिच्या अभंगात गाते -
 "गळा बाधूनिया दोर धरिला पंढरीचा चोर" 

देवासाठी दुसयाच्या दारातील फुले, कोणाचा वेळ , तर कोणाचा पैसा अशा क्षणभंगुर गोष्टी चोरून पापाचे धनी होण्यापेक्षा जनी म्हणते तसे "त्या" एकमेव कधीही दगा न देणार्‍या पंढरीच्या "चित्तचोराला" एकतर आपण चोरू या किंवा "त्या"च्या कडून आपले चित्त चोरून घेऊ या ह्यातच खरे आपळे परम कल्याण आहे ---- मनाचे हरण करणारा "तो" हरी --- किती सुंदर भाव आहे "त्या" देवाप्रती, नाही बरे?
चित्त चोरटा विटेवरला तो हरी माझ्या मनी भरला .... तो हरी माझ्या मनी भरला....            

- सुनीतावीरा करंडे      

4 comments:

  1. अंबज्ञ post Sunitaveera.

    ReplyDelete
  2. अध्यात्म आणि दैनदिन जीवनाच्या मर्यादा ह्यांचा खूप सुंदर मेळ दिसून येतो तुमच्या ह्या लेखात .
    अतिशय रूपक मांडणी

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog