Monday 24 April 2017

अनंता तुला रे कसे रे स्मरावे।अनंता तुला रे कसे रे नमावे ।।

अनंता तुला रे कसे रे स्मरावे ।। अनंता तुला रे कसे रे नमावे ।।
अनंत मुखांचा शिणे शेष गाथा । नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ।। १ ।।

खरेतर श्री मोहनीराज पंडित ह्यांनी लिहिलेल्या नमनाष्टकाची ही प्रथम ओवी , जी शिरडीनिवासी सदगुरु श्रीसाईनाथांसाठी आहे. परंतु  सदगुरुतत्त्व हे अनादि, अनंत आणि कायम एकच असते. त्यामुळे सदगुरु साईनाथांसाठी लिहिलेल्या ह्या ओवीतही सदगुरु अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ आजोबांचेच दर्शन घडते आणि स्मरतात त्या बखरीमधील कथा ज्या स्वामींच्या अनंतत्वाची खूण पटवितात. 
                                                                
सामान्य माणूस आपल्या पोटापाण्याची खळगी भरताना , उदरनिर्वाहाच्या मागे सतत धावत पळत असतो आणि ह्याच जीवनाच्या रामरगाड्यात त्याला आपल्यासमोर साक्षात परब्र्म्ह अवतरले आहे ह्याचे देखिल ना  भान राहात , ना जाणीव होत , ना अंतरीची खूण पटत मनाच्या तर्क -कुतर्क, वाद-विवाद, शंका-कुशंका ह्यांच्या गदारोळातून ... आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा "तो" भगवंत , परमात्मा सगुण साकार बनून मानवी रूपाने ह्या वसुंधरेवर अवतरतो तेव्हा तेव्हा सामान्य मानवाला ते पचनी पडणे खूप कठीण होऊन बसते. "तो" दिसतो माझ्यासारखा .माझ्यासारखा चालतो-बोलतो, खातो-पितो, उठतो-बसतो मग मी "त्या" ला कसे बरे माझा परमात्मा, माझा भगवंत , माझा परमेश्वर म्हणून मी स्विकारू हा गहन प्रश्न मानवाच्या मनाला वारंवार पडतच राहतो आणि संभ्रमात टाकीटाच राहतो. पण "लाभेवीण प्रेम " करणारी ही सदगुरुमाऊली इतुकी करुणानिधान असते की आपल्या लेकरांच्या अनंत चुकांना पदरात घालून , जराही न रागावता "ती" भक्तवत्सल सदगुरुमाय आम्हांला आपल्या चरणांशी ठाव देतेच देते, आणि आपल्या क्षमेच्या , अकारण कारूण्याच्या , अगाध प्रेमाच्या पदरात घेतेच घेते.

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)

आज २४ एप्रिल २०१७ -  मराठी कॅलेंडर मध्ये आज श्रीअक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी अशी नोंद आहे. अक्कलकोट निवासी, सद्गुरु दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १३९ व्या पुण्यतिथी उत्सवाची बातमी वाचली आणि जाणवले ते परम सत्य ! वास्तविक पाहता इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी समाधिस्त होऊन आपला सगुण साकार अवतार संपविला असे भासवले, परंतु आजतागायत प्रत्यक्षात स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून, भक्तांना "हम गया नही जिंदा है " याच आपल्या अभिवचनाची प्रचिती सातत्याने  देत आहेत.

" अनसूयो अत्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगंबरा | स्मर्तुगामी स्वभक्तानां उध्दरता भवसंकटात् ||"
शरणागतवत्सल, प्रणतपाळ, भक्तवत्सल असा "तो  परमात्मा " आपल्या भक्ताने स्मरण करताच धावून येतोच , नव्हे नव्हे "तो" स्मरणासवेच प्रकटतो - अशी समर्थांची ख्याती भक्तगण आजही अनुभवीत आहेत आणि म्हणूनच येथे आवर्जून स्मरते  ती संत एकनाथांची अभंग रचना -

"तुज सगुण म्हणू की निर्गुंण रे सगुण निर्गुण तूचि गोविंदु रे"

देहात राहून सगुण साकार स्वरूपाने विचरो वा निर्गुण निराकार बनून अनंतात विचरो सदगुरु हा कायम आपल्या भक्तांजवळच असतो.

"तेज रुपाने आजही जागृत, स्वामी समर्थ महाराज समाधीत | माथा ठेवुनी साद घालिता झणी मिळतो प्रतिसाद, अवलिया स्वामी समर्थ आजोबा , अवलिया स्वामी समर्थ आजोबा "

अक्कलकोटास श्रीस्वामी समर्थ निवास करीत असताना श्रध्दावान दर्शनासाठी येत आणि पुन्हा "सगुण साकार रूपातील " अवतरलेल्या साक्षात परब्र्म्हाला न जाणून "निर्गुण निराकाराला" भेटण्यासाठी धाव घेत. तेव्हा आपल्या लेकरांची ही वणवण पाहून स्वामी समर्थांचे अंत:करण कळवळत असे. "कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी , हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी " ही आर्तता आपल्या भक्ताला उमगावी म्हणून स्वामीच मदतीला धावून येत असत.

मंगेश पाडगांवकरांनी मानवाची हीच व्यथा अगदी यथार्थपणे आपल्या गीतातून मांडिली आहे.
झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी


सदगुरुमाऊली अशीच कल्पवृक्षापेक्षाही  अमूल्य असे तृप्तीचे , समाधानाचे , सौख्याचे वर्षांवरूपी मेघ
वर्षविण्या सदातुर  होऊन  अचिंत्यदान घेऊन आपल्या उशाशीच उभी असते , पण आपण तिला नाकारून दूर दूर तीर्थक्षेत्री वणवण करीत फिरतो, अशा आपल्या वागण्याने किती कष्टवितो आपण आपल्या सदगुरुरुमाऊलीला ?  ह्याची मात्र आपल्याला तमा नसते ना आपल्या खिजगणतीत असते.

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या बखरीत हीच गोष्ट आपल्याला प्रकर्षाने आढळते ४५ व्या कथेत . श्री गोपाळबुवा केळकर आपल्याला बखरीतील ह्या कथेतून सांगतात ती परशुराम सेवेकर्‍याची गोष्ट ! एक वेळ परशुराम सेवकरी याचे मनात आलें की आपण काशीस जावें. म्हणून ते श्रींची आज्ञा  घेण्याकरितां श्रींजवळ आले व त्यांनी प्रार्थना केली . श्रींनी उत्तर दिलें,: संतचरणांची माती तीच माझी भागीरथी." हे ऐकून परशुराम ह्यानें काशीस जाण्याचा बेत रहित केला.

परंतु ह्याच कथेत केळकर बुवा म्हणतात की प्रत्यक्ष निधान चोळाप्पाचे घरीं असून चोळाप्पाची तीर्थयात्रा किंवा पिराची शेरणी वाटणें चुकलें नव्हतें . चोळाप्पाची कुलदेवता तुळजापूरची देवी असून , एक वेळ चोळाप्पा कुटूंबासह यात्रेस निघाला. बाळाप्पास आपल्या बरोबर येण्यास त्यानें आग्रह केला. बाळाप्पा हा स्वामींचा नि:स्सीम भक्त असल्या कारणाने श्रींच्या आज्ञेवाचून तो कोणतीही गोष्ट करीत नसे. त्याने चोळाप्पास स्वामींची आज्ञा  घ्यावी म्हणजे आपण येण्यास तयार आहों असे सांगितले. चोळाप्पा बाळाप्पाचा हात धरून स्वामी आजोबांकडे गेला व तुळजापूरास जाण्याविषयीं आ  मागितली. स्वामी म्हणाले," डोंगरावर चढून उकिरडे उकरण्यास जा ." हे ऐकून श्रींची सेवा सोडून तुळजापूरांस जाण्यांत कांहीच अर्थ नाही , असे समजून बाळाप्पा गेला नाही. चोळाप्पा मात्र गेला.
येथे केळकर बुवा म्हणतात कर्म , उपासना ,  न-क्र्माक्र्मानें साधन साधकानें करावें उगीचच ढोंग करून पोट भरणें महाराजांस आवडत नसे.
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी


आपणही असेच सदगुरुच्या दारी शरण जातो आणि "तो "आपल्या कानी कपाळी ओरडून सांगत असताना "त्या" एकाचे ठायी अनन्य शरणागत होण्याचे सोडून निर्गुण निराकार परमेश्वराला शोधण्याचा अट्टाहास करून ऊर फुटेस्तोवर धावाधाव करतो कधी ह्या देवाच्या दारी तर कधी त्या देवाच्या दारी ! येथे आठवल्या त्या एका अभंगाच्या ओवी " बापूपायी ठेवू एकविध भाव नको धावाधाव अन्य कोठे "! किती सत्य वर्णिले आहे माझ्यासाठी माझा सदगुरुच माझी माय आणि माझा बाप आहे , तर मी कशाला अन्य दारी जाण्याची आटाटी करू ?

केळकर बुवा बखरीमधील ४४व्या कथेत मुंगी -पैठणच्या विठाबाईची गोष्ट सांगताना हेच तत्व प्रतिपादन करतात. ह्या विठाबाई मुंगीपैठणच्या राहणार्‍या अक्कलकोतास श्रींच्या दर्शनास येतात . पंढरपूरास आषाढी एकादशीस जाण्याचा त्यांचा बेत असतो व त्या आपला बेत स्वामींचे सेवेकरी गणपतराव व बाळाप्पा ह्यांना सांगतात , तेव्हा ते दोघेही श्रीसमर्थांची स्वारी राजवाड्यांत असून दर्शन मिळत नसल्याने, बाहेर कंटाळवाणे दिवस काढण्यापेक्षा पंढरीस जावें असा विचार करून जाण्यास तयार होतात. पुढें विठाबाई स्वामींच्या दर्शनास जातात तेव्हा स्वामी विठाबाईच्या तोंडाकडे पाहून म्हणतात ," काय ग , विठोबाचा लंड धरण्यास अजून गेली नाहीस?" तेव्हा बाईस आपली चूक उमगते व ती उघडपणें स्वामींपुढे तशी कबूली देते ," आपण चालतें-बोलतें विठोबा असून मी पंढरीस कशास जाऊं?"  नंतर विठाबाई बाळाप्पा व गणपतराव सेवेकर्‍यांस झालेली हकिगत सांगून पंढरपूरास जाण्याचा बेत रहीत करते.

१६८वी कथा सांगते की एका मराठी साधूस मंगळवेढ्यास स्वामी समर्थांनी दर्शन देऊन सांगितले ,"द्वारकेस जाऊन पैशाच्या आकृतीच्या खापरकुट्या कर, म्हणजे  तुला विठोबा भेटेल ! त्या प्रमाणें तो द्वारकेस जाऊन तसें करू लागल्यावर त्याला भगवंताने तीन वेळ प्रत्यक्ष विठोबाच्या रूपानें दर्शन दिलें

१६९ व्या कथेंतून अलवणीबुवांना जगन्नाथाला स्वामींनी कटीवर हात ठेवून सांगितलेले सत्य वचन की " सर्व स्थानें आमचीच आहेत ! " ह्याच गोष्टीची प्रचिती देतात की सदगुरुंच्या चरणांशीच सर्व तीर्थक्षेत्रे वास करतात. म्हणूनच आधी जराही प्रसिध्दी नसलेले अक्कलकोट श्रीस्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले, पावन झाले आणि मग तेथे यात्रा अहोरात्र वाहू लागली.

तीच गोष्ट शिरडी निवासी साईनाथांची - श्रीसाईसच्चरितात अध्याय २६ मध्ये हेमाडपंत वर्णितात -
दैव शिर्डींचें , म्हणूनि झालें । बाबा तेंथे आगमन आपुलें ।
 पुढें तेथेंचि वास्तव्य केलें । क्षेत्रत्व आणिलें त्या स्थाना ।।२१ ।।
धन्य शिरडीचें सुकृत । कीं हा साई कृपावंत ।
करी या स्थळां भाग्यवंत । अलंकृत निजवास्तव्यें ।। २२।।
ह्याच अध्यायांत हेमाडपंत ह्याचाच पुनरूच्चार करतात -
सन एकोणीसशें दहा सालीं । दासगणूंचीं कीर्तनें झालीं ।
श्रीसाईनाथांची कीर्ति पसरली । यात्रा वाढली शिरडीची ॥५९॥
कुग्राम परी भाग्यें थोर । शिरडी झाली पंढरपूर ।
महिमा वाढला अपरंपार । यात्रा अपार लोटली ॥६०॥ 


अशा ह्या माझ्या सदगुरुंच्या निवासी म्हणजेच शिरडीत , माझ्या साईबाबांच्या पायीच माझी सर्व तीर्थक्षेत्रें आहेत असा भाव हेमाडपंत अत्यंत प्रेमाने वदतात अध्याय ४ मध्ये -
शिर्डीच आम्हां पंढरपूर । शिर्डीच जगन्नाथ द्वारकानगर ।
 शिर्डीच गया काशी विश्वेश्वर । रामेश्वरही शिर्डीच ।।५९ ।।
शिर्डीच आम्हां बद्रिकेदार । शिर्डीच नाशिक - त्र्यंबकेश्वर ।

 शिर्डीच उज्जयिनी महाकाळेश्वर । शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण ।।६० ।।   

ह्यावरून आम्हांला सर्व सदगुरु एकच गोष्ट सातत्याने सांगतात की -
अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी


सदगुरुंच्या चरणींच माझी सर्व तीर्थक्षेत्रे आणि माझे इष्ट देव, दैवत आहे असा अनन्य शरणागतीचा भावच आम्हांला ह्या भवसागरातून तरून जाण्यास  पर्याप्त आहे, ह्याच भावनेने सदगुरुंना भक्तांनी पूजावे म्हणून अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री न जाऊ देऊनही श्रीस्वामी समर्थांनी आपल्या सेवेकर्‍यांच्या इच्छा अक्कलकोटलाच बसल्या जागी पुरविल्याचे बखर सांगते - १७१व्या कथेंत रामशास्त्री सेवेकर्‍याला कार्तिकस्वामींच्या दर्शनाला जाऊ न देतां स्वामींनी अक्कलकोटला  कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सहा तोंडे असलेल्या कार्तिकस्वामींच्या रूपाने दर्शन दिले. 

१३९ व्या कथेंत गारोडे येथे राहणारे सीतारामपंत नेने आपल्याला रामाचा साक्षात्कार व्हावा म्हणून राम-उपासना कडक रीतींने करीत होते व पुढे ते स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले असतां त्यांना एके दिवशी दोन प्रहरी स्वप्नांत स्वामींनी रामरूपाने दर्शन देऊन त्यांच्या शंकाही दूर केल्या.

७५ व्या कथेत पुष्कळ वर्षेंपर्यंत श्रीगुरुदत्तात्रेयांचे दर्शन व्हावें म्हणून अनुष्ठान करणार्‍या एका गोसाव्यास तीन शिरें, सहा हात, सर्व हस्तांमध्ये कमंडलु, त्रिशूळ वगैरे धारण केलेले असे श्रीगुरु दत्तात्रेयांचे दर्शन दिधले होते.   
तसेच आंधळ्या सूरदासाला स्वामी समर्थांनी कृष्णाचे दर्शन दिधले होते दिव्य दृष्टी प्रदान करवून ...

अशा ह्या सदगुरु श्रीस्वामी समर्थांच्या चरणीं  अनन्य भावे सदा असो दंडवत -
ऐशा स्वामी समर्थांना । सदा असो दंडवत  ।
ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत 
ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत 
ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत    

5 comments:

  1. || ओम अभयदाता श्रीस्वामीसमर्थाय नमः ||
    || ओम कृपासिंधू श्रीसाईनाथाय नमः ||
    || ओम मन:समर्थ्यादाता श्रीअनिरुद्धाय नमः ||

    ReplyDelete
  2. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या बखरीतील अनुभवांच्या आधारे आपण केलेले विवेचन उद्बोधक आहे. हे वाचताना मला आपल्या ५ सप्टेंबर २०१५ रोजीच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण उल्लेखिलेला गुरुगीतेतील हा श्लोक आठवला - गुरुभाव: परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम् । सर्वतीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठे च वर्तते ।।

    ReplyDelete
  3. हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.डॉ योगींद्र जोशी. आपण गुरुगीतेच्या श्लोकाच्या आधारे खूप महत्त्वाचे सार सांगितले आहे गुरुभाव: परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम् । सर्वतीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठे च वर्तते ।। गुरुभाव हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. गुरुदत्तांचा चरणांगुष्ठ ( पायाचा आंगठा ) सर्व तीर्थांचे आश्रय स्थान आहे.

    ReplyDelete
  4. Sadguru tatva EKACH ahe he tumchya lekhamule khup sahajsopya ritine LAKSHAT ale.I remember EKAM SAT VIPRE BAHUDHA VADANTI from your blog.
    Ambadnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog